ज्यांचं क्रेडिट त्यांना मिळालं...कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराजांचं नाव!   

ज्यांचं क्रेडिट त्यांना मिळालं...कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराजांचं नाव!   

कोल्हापूर : उदासीबुवाचा माळ... उजळाईदेवीवाडी ते आता छत्रपती राजाराम महाराजांच्या नावाने कोल्हापूर विमानतळ ओळखला जाणार आहे. साधारण 78 वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या भविष्याचा विचार करून खुद्द राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत या विमानतळाचे काम पूर्ण झाले. राजाराम महाराजांच्याच हस्तेच उद्‌घाटन झालेल्या या विमानतळावरून पहिले विमान आकाशात झेपावले. आज या विमानतळास राजाराम महाराजांचेच नाव दिले गेले आणि या विमानतळाच्या इतिहासाचे एक दडलेले पान पुन्हा नव्या पिढीसमोर उलगडले गेले. 

आता जिथे विमानतळ आहे ती जागा म्हणजे सरनोबतवाडी, मुडशिंगी आणि तामगाव यांना जोडणाऱ्या उदासीबुवाच्या माळाची जागा. या जागेवर काही सतपुरुषांच्या समाध्या एका ओळीत आहेत. जवळच मारुतीचं छोटंसं मंदिर. माळ एवढा विस्तीर्ण की लांब अंतरावर चरत असलेलं शेरडूही लांबून स्पष्ट दिसायचं. श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी या माळावर जत्रा भरायची आणि गोसाव्यांचे जथेच्या जथे येथे यायचे. रुद्राक्षाच्या वाटपाचा विधी येथे व्हायचा आणि एकदा गोसाव्यांचे जत्थे या माळावरून गेले की या माळावर फक्त भन्नाट वाराच राज्य करायचा. 

कोल्हापुरात शाहू महाराजांनी रेल्वे आणून दळणवळणाचा मोठा टप्पा पूर्ण केला होता. त्यात राजाराम महाराजांनी विमानतळाचा प्रकल्प हाती घेतला. 1930 ते 35 च्या दरम्यान विमानतळाचं काम सुरू झालं. सुरवातीला 170 एकर जमीन ताब्यात घेतली गेली. असं सांगतात की सक्तमजुरीची शिक्षा झालेल्या कैद्यांना विमानतळाच्या कामावर आणले जायचे. 

त्याकाळात सिंगल इंजिन व्हिंटेज टाईप एअरक्राफ्ट असे तीन आसनी विमान होते. विमानाला पंख्यावर दुसरा पंखा असे दोन पंखे होते. ब्रिटीश अधिकारी व संस्थानिकच अशी विमाने वापर होते. तारखेबद्दल अनिश्‍चितता आहे पण चार मे 1940 रोजी राजाराम महाराजांच्या हस्ते विमानतळाचे उद्‌घाटन झाले. "सिटी ऑफ भावनगर' हे विमान विमानतळावरून अवकाशात झेपावले. उजळाईदेवीच्या परिसरातील माळावरील विमानतळ म्हणून ते उजळाईवाडी विमानतळ म्हणूनच ओळखले जाऊ लागले. अर्थात या विमानतळावरून विमानाचे नित्य उड्डाण फारसे झाले नाही. 

1978-79 साली विमानतळासाठी पुन्हा जागा संपादित करण्यात आली. विमानतळावरील एका छोट्याशा कौलारू इमारतीतून त्या-त्या परिस्थितीत विमानतळाचे व्यवस्थापन चालत होते. आता धावपट्टी मोठी झाली. कोल्हापूर-मुंबई व मुंबई-कोल्हापूर विमान सेवा दहा वेळा सुरू झाली; पण या विमानसेवेत सातत्य राहिले नाही. किंबहुना विमानतळ अधिक काळ बंद अवस्थेतच राहिले. विमानतळाचा परवाना रद्द झाला. अलीकडे तो पुन्हा मिळाला; पण विमानसेवेचा मुहूर्त कायम हुकत गेला. 

आता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रयत्नाने विमानसेवा पूर्ववत सुरू होईल, असे वातावरण तरी तयार केले गेले आहे. दरम्यान, विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव देण्याची मागणी मान्य झाली आहे. आज राज्य मंत्रिमंडळात तसा निर्णयही झाला आहे. मात्र आता विमानाचे येथून नियमित उड्डाण होत राहिले तरच छत्रपती राजाराम महाराजांच्या नावाला ते साजेसे ठरणार आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com