राजापूर : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आमदार शेखर निकम हे राष्ट्रवादीचे एकमेव आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान देत मंत्री म्हणून काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाचल विभागातर्फे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. त्या बाबतचे पत्र पाटील यांना देण्यात आले आहे.
गतवेळच्या पराभवातून खचून न जाता आमदार निकम यांनी गेली पाच वर्ष लोकांशी संपर्क ठेवला होता. त्यातच, विविध माध्यमातून लोकांची विविध प्रकारची कामेही केली होती. त्यांनी लोकांची केलेली कामे आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे चिपळूण विधानसभा मतदारसंघातून निकम हे आमदार म्हणून निवडून आले. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात भविष्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला बळकटी देण्यासाठी निकम यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यात यावे, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडे केली आहे.
प्रदेशाध्यक्ष पाटील यांना पाठविण्यात आलेल्या या पत्रावर जिल्हा सरचिटणीस अण्णा पाथरे, पाचल विभाग अध्यक्ष गोविंद हुंदळेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य उमेश दळवी, तालुका सरचिटणीस सुनील जाधव, उपाध्यक्ष जयप्रकाश उर्फ बाळा चव्हाण, अर्बन बॅंक संचालिका धनश्री मोरे, बाळा सावंत, धनंजय पाथरे, विनोद पवार, विनय सक्रे, सुभाष नारकर, अशोक वरेकर आदींनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
आमदार निकम हे सुसंस्कृत, उमदे व अजातशत्रू व्यक्तिमत्व असून त्यांच्या रूपाने रत्नागिरी जिल्ह्याला मंत्रिपद मिळाल्यास जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला संजीवनी मिळेल, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.