सावंतवाडी : येथील पालिका 23 वर्षांनी जनतेने आमच्या ताब्यात दिली आहे. मला लोकांची बांधिलकी महत्त्वाची असल्याने त्यांना अपेक्षित विकास येथे करून दाखवायचा आहे. पालिकेत नगराध्यक्षांचा कारभार व्यवस्थित चालतो की नाही यासाठी मी दर महिन्याला येऊन आढावा घेणार असून कोणालाच सोडणार नाही, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी येथे पार पडलेल्या भाजपच्या विजयी मेळाव्यात स्पष्ट केली.
येथील गांधी चौकात जिल्हा भाजपच्या वतीने बांदा, आंब्रड व सावंतवाडी येथील निवडणुकीत मिळविलेल्या यशानंतर विजयी मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी श्री. राणे शहराच्या विकासावर बोलत होते. या वेळी व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी खासदार नीलेश राणे, भाजप प्रदेश सरचिटणीस राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, पालिका सभापती अॅड. परिमल नाईक, बांदा संरपंच अक्रम खान, जिल्हा परिषद सदस्य लॉरेन्स मान्येकर आदी उपस्थित होते.
श्री राणे म्हणाले, "नगराध्यक्षपद हे मिरविण्यासाठी नाही तर मेहनत करून येथे राहणाऱ्या जनतेला नागरी सुविधा देण्यासाठी आहे. राज्यात नगरपंचायत नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांचा जन्मच मुळात शहरात राहणाऱ्या नागरिकांना आल्हाददायी जीवन जगण्यासाठी, आवश्यक सोयी सुविधा मिळण्यासाठी झाला आहे. 23 वर्षांनी येथील जनतेने आमच्या ताब्यात ही पालिका दिली आहे. त्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. यापुढे या शहराच्या विकास करताना पर्यटनावर भर देण्यात येणार असून पर्यटक या शहरात येण्यासाठी इथला व्यापार, व्यवसाय वाढण्यासाठी आम्ही भर देणार आहोत. दोन वर्षात जनतेसमोर कोणतेही कारण पुढे न करता जेवढ्या गोष्टी करता येईल तेवढ्या देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. कित्येक वर्षांनी ताब्यात आलेली ही पालिका पुन्हा ताब्यातून जाता कामा नये यासाठी प्रत्येक नगरसेवकांकडून काम करून घेण्याबरोबर दर महिन्याला मी नगराध्यक्षांच्या कामाचा आढावा घेणार आहे.''
या वेळी श्री. परब यांनी श्री. राणे यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करेन व त्यांना अपेक्षित काम करून दाखवेन, असे सांगत सावंतवाडीकर जनतेने निवडून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
श्री. राणे यांनी केसरकर यांचे नाव न घेता टीका केली, ते म्हणाले, "जिल्हासाठी एवढे दीडशे कोटी आणले म्हणता मग हे पैसै गेले कुठे ? गेली दहा वर्षे या जिल्ह्याचा लोकप्रतीनिधी म्हणून काम करताना जिल्ह्याला विकासाकडे नेणे हे त्यांचे कर्तव्य होते; मात्र हे कर्तव्य पुरे केले नाही म्हणून आम्ही बोलणारच. 1990 पासून या जिल्ह्याच्या राजकारणात आहे. येथील जनतेसाठी विविध योजना राबविल्या. या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविले, कोकणात पाऊस पडूनही पाणीटंचाई भासत होती; मात्र जिल्हा टॅंकर मुक्त केला. रस्त्याचे जाळे पसरविले; मात्र गेल्या पाच वर्षात सत्ता असतानाही यांनी येथे कोणते दिवे लावले ते सांगावे. सी-वर्ल्ड, चिपी विमानतळ प्रकल्प मी आणले; पण अद्यापही हे प्रकल्प मार्गी लागले नाहीत. या जिल्ह्यात डॉक्टर येत नव्हते म्हणून मी मेडिकल कॉलेज उभारले; मात्र हे सावंतवाडीत उभारणार होते ते मेडिकल कॉलेज गेले कुठे?''
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.