

मुंबईत मंत्रालयातील दूषित पाणी प्यायल्यानं सरकारी कर्मचाऱ्यांंना उलट्या झाल्याचं समोर येत आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयातील पाण्याच्या टाकीत मांजर पडलेली निदर्शनास आलं. हेच पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांना त्रास झाला. या धक्कादायक प्रकारानंतर मंत्रालयातील पाण्याची टाकी योग्यरीतीने स्वच्छ करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मीरा रोडवरील जैब जुबेर अन्सारीने केलेल्या धर्म विचारुन सुरक्षारक्षकावर केलेल्या चाकू हल्ल्याच्या घटनेवर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘मी मीरा रोड येथील घटनेचा जाहीर निषेध करतो. देवेंद्र फडणवीस राज्याचे अत्यंत सक्षम गृहमंत्री व मुख्यमंत्री असल्याचं सांगितलं. तसेच ज्याने हे नीच कृत्य केले आहे, कठोरातील कठोर शिक्षा त्याला देण्यासाठी सरकार सक्षम आहे. धर्म विचारून वार करणं म्हणजे यांची मग्रुरी मोठ्या प्रमाणावर वाढली असून ती आता थांबवावी लागणार असल्याचा इशाराही पडळकर यांनी यावेळी दिला.
आमदार संजय गायकवाड यांच्या घराबाहरे डाव्या संघटनांने मंगळवारी आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकारानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी मंगळवारी सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली. मतदारांमध्ये उत्साह पहायला मिळाला, पण दुपारी गावातील दोन गट एकमेकांसमोर येऊन वाद झाल्याने काही काळ मोठा गोंधळ उडाला होता. काही अनुचित प्रकार घडण्याआधीच पोलीसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाला दूर केले. दिवसभरात मस्साजोग ग्रामपंचायतीसाठी ८४ टक्के मतदान झाले आहे.
अमरावती परतवाड्यातील लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता कोल्हापूरच्या शिरोली पुलाची परिसरात एक संतापजनक प्रकार उघडकीस आलाय. आरोपी शाहीद सनदीनं सोशल मीडियाद्वारे 15 हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून त्यांच्यावर अत्याचार केलाय. आरोपी शाहीद सनदीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात या घटनेत लव्ह जिहादचा संशय हिंदू संघटनांनी व्यक्त केलाय. आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. या नराधमावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज शिरोली पुलाची गावात कडकडीत बंद पाळण्यात आलाय.
बीडचे शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या उभ्या असलेल्या कारवर एक भरधाव दुचाकी येऊन धडकल्याने अपघात झाला. यात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनवणे यांच्या कारचे या अपघातात किरकोळ नुकसान झाले.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा कमी झाल्यामुळे, 15 मे पासून शहरात 10 टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी घेतला आहे.
कोल्हापूरच्या शिरोलीतील भीषण अत्याचार प्रकरणात SITद्वारे चौकशी करण्यात यावी अशी मागणी सकल हिंदू समाजाकडून करण्यात येतेय.
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडूनही हिरवा कंदील मिळाला आहे. केईएम ह़ॉस्पिटलचे जूने नाव बदलुन 'कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक' रुग्णालय असे करण्याकरिता मंगलप्रभात लोढांनी महापौरांना पत्र दिले होते. आरोग्य समितीकडे हा प्रस्ताव आल्यानंतर तो मंजूर करुन आयुक्तांकडे अभिप्रायाकरता पाठवला गेला. आता आयुक्तांनीही या नामांतर प्रस्तावाला हिरवा कंदील दिला आहे.
हिंगोली जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाल्याने येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषतः 0 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांवर उष्णतेचा परिणाम दिसून येत आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये उष्माघातासारख्या तक्रारींमुळे रुग्णसंख्या वाढली असून, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना उपचारासाठी दाखल केले जात आहे.
नागपुरात गॅस एजन्सीचे कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. नोंदणी करूनही सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहकांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. हे वाद पोलिसांपर्यंत पोहोचला आहे.
मराठी सक्तीच्या मुद्यावरून काही रिक्षा व टॅक्सी संघटनांनी संपाचा इशारा दिला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संपाच्या धमक्यांना भीक घालत नाही, असे विधान केले आहे. तसेच मराठी सक्ती सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील रिक्षा व ट्रक्सी चालकांसाठी येत्या एक मेपासून मराठी बंधनकारक असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले. मात्र, त्यांच्यावर थेट कारवाई होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. एक मे ते १५ ऑगस्ट या कालावधीत नियमभंगाविरोधात कारवाई सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी शिकावीच लागेल, असेही त्यांनी सांगितले.
आमदार संजय गायकवाड यांच्या निवासस्थानासमोर डाव्या विचारांच्या संघटनांनी आंदोलन छेडले. कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याने पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने एक हाती सत्ता मिळवली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवनियुक्त महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष , नगरसेवक , सभापती आणि नगराध्यक्षांचा सत्कार करून मार्गदर्शन करणार आहेत.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची आज परिवहन विभागातील अधिकाऱ्यांसोबत सकाळी साडेदहा वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत 1 मे पासून ऑटो रिक्षा चालकांना मराठी भाषा सक्ती करायची की मुदतवाढ द्यायची यावर चर्चा केली जाणार आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आयकर अपील न्यायाधिकरणाकडून दिलासा मिळाला आहे. अजित पवार यांच्या विरोधातील आयकर कायद्याच्या कलम 153C अंतर्गत सुरू केलेली कार्यवाही रद्द करण्यात आली आहे. तसंच अघोषित उत्पन्न म्हणून जोडलेली 32.14 कोटी रुपयांची रक्कमही रद्द केली आहे. त्यामुळे हा सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा मानला जात आहे.
कोल्हापुरातील पुलाची शिरोली येथील शाहिद सनदे याने तरूणीवर अत्याचार करून तिचे व्हिडीओ बनवून मित्रांना शेअर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पिडीत तरूणीने राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संशयिताला अटक केले. आरोपी शाहिद सनदे याच्याकडे आणखी 8 ते 9 तरुणींचे व्हिडीओ असल्याचा पोलिसांना संशय आहे.
विधानपरिषदेसाठी महाराष्ट्रातील भाजपच्या कोअर कमिटीने जवळपास 30 जणांच्या नावांची यादी दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठवली होती. मात्र, अवघ्या 6 जागांसाठी 30 जणांची याजी पाठवल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडे या यादीमधील डझनभर नावे कमी करून पुन्हा सुधारित यादी पाठवायला सांगितल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता महाराष्ट्र भाजपने विधानपरिषदेसाठी एकूण 14 जणांची यादी पुन्हा दिल्लीश्वरांकडे पाठवली आहे.
शिवाजी कोण होता? या पुस्तकावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख हटवावा किंवा पुस्तकावर बंदी घालावी, या मागणीसाठी जालन्यातील राजूर इथं आंदोलन करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख तात्काळ हटवावा अन्यथा राज्यभरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला आहे.
अमरावती परतवाडा इथं नीतेश राणे उद्या सभा घेणार होते. या सभेला अमरावती पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. परतवाडा इथलं लैंगिक अत्याचाराचे फोटो अन् व्हिडिओ प्रकरण राज्यात गाजत आहे.
मिरा रोड चाकू हल्ल्याचा मुख्य आरोपी जुबेर अंसारीचा फोटो समोर आला आहे. जुबेर अंसारी याने मुंबई इथल्या मिरा रोड परिसरातील नयानगर हद्दीत दोन सुरक्षा रक्षकाला धर्म विचारून चाकू हल्ला केला होता. त्याला चार मे रोजीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. मिरा रोड चाकू हल्ला करणारा आरोपी जुबेर अंसारी याचे धागेदोरे ISIS संबंधित असल्याचे समोर येत आहे. मिरा रोड चाकू हल्ला प्रकरणात आता महाराष्ट्र दहशत विरोधी पथकाची एन्ट्री झाली आहे.
बीड जिल्ह्यातील 27 ग्रामपंचायतींमधील 31 रिक्त जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. यामध्ये 12 सरपंच आणि 19 सदस्य पदांचा समावेश आहे. या मतदान प्रक्रियेला 7.30 सुरुवात झाली असून 59 मतदान केंद्रांवर सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार आहे. तसेच केज तालुक्यातील मस्साजोग सरपंच निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. तर त्यांच्या विरोधात त्यांच्याच भावकीतील स्वरूपानंद देशमुख हे प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत. गेल्या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांचा अवघ्या नऊ मताने पराभव झाला होता.
मुंबईच्या रेल्वे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धकमीचा फोन आला आहे. इरफान नावाच्या व्यक्तीने हा फोन केला असून, त्याने पाच कोटींची मागणी केली आहे. यासाठी सरकारशी बोलणं करून देण्याची मागणी केली आहे. रेल्वे, आर्मी आॅफिस आणि हाटेल्स यांना लक्ष करण्यात येईल, असे धमकी देताना म्हटलं आहे. धमकी देणाऱ्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज दिल्ली दौऱ्यावर आहे. ते तिथं त्यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेट घेणार आहेत. राज्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. पुढील महिन्यात 12 मे रोजी त्यासाठी मतदान होणार आहे. हर्षवर्धन सपकाळ मविआची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी दिल्लीत प्रयत्न करताना दिसत आहे.
चाकण परिसरात प्रधानमंत्री आवास योजनेच्या बांधकाम साईटवरून अॅल्युमिनियम प्लेट चोरी प्रकरणात, चाकण उत्तर पोलिसांनी चार मुख्य आरोपींसह चोरीचा माल खरेदी करणाऱ्या तीन जण, अशी एकूण सात जणांना अटक केली आहे. यात 31 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन आरोपी फरार आहेत. राक्षेवाडी इथल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या 210 घरांच्या साईटवरून अॅल्युमिनियम प्लेट चोरी झाली होती.
बुलढाणा शहरात ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे वाचन कार्यक्रम कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून कम्युनिस्ट विचारसरणीचे अनेक कार्यकर्ते बुलढाण्यात दाखल झाले असून, शहरात या कार्यक्रमाची चर्चा रंगली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी पुस्तकाच्या आशयाबाबत तसेच या वाचनामागील उद्दिष्टांबद्दल आपली मते मांडली.
करमाळ्याचा भोंदू बाबा मनोहर भोसले याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. त्याने घोटी गावातील शासकीय पाझर तलावाच्या 17 एकर जमिनीमध्ये अतिक्रमण करून सहा एकर जमिनीवर कब्जा मिळवला आहे. या अतिक्रमण केलेल्या जमिनीमध्ये फार्महाऊस, जनावरांचा गोठा, नारळाची बाग आणि भलीमोठी विहीर खोदली आहे. यात आणखी कहर म्हणजे पाझर तलावातून बेकायदेशीर पाणी उपसा करून तो स्वतःच्या शेततळ्यात साठवतो, अशी माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे.
मावळच्या वडगाव मध्ये एका विवाहित महिलेच्या खुनाच्या घटनेने खळबळ उडाली असून चारित्र्यावर संशय घेत पतीनेच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद कणसे याला अटक करण्यात आली आहे. तर दुसरी घटना 27 एप्रिलला घडली आहे. तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जाधववाडी गावात जमिनीच्या वादातून एका व्यक्तीची हत्या झाली आहे. पुतण्यानेच आपल्या काकावर कोयत्याने वार करून त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. मृत व्यक्तीचे नाव रवी जाधव आहे. पुतण्याचे नाव सुखदेव जाधव, असे आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि खासदार विशाल पाटील यांच्यात सांगलीमध्ये चांगलीच टोलेबाजी रंगली. विशाल पाटील हे अपक्ष खासदार नाहीत, ते सर्वपक्षीय खासदार आहेत, त्यांना सगळ्या पक्षांनी मदत केली. कोणी वरून, कोणी आतून, अशी फटकेबाजी मंत्री रामदास आठवलेंनी केली. विशाल पाटलांनी यांनी, महिला विधेयका दरम्यान संसदेत रामदास आठवले यांना बोलू दिले नाही. पण ते बोलले असते, तर कदाचित त्यांनी आम्हाला समजून सांगितलं असतं, ज्यामुळे आम्ही प्रेरित होऊन चुकीचं बटन दाबलं असतं, अशी भीती आमच्या मनात निर्माण झाली होती, असा खोचक टोला खासदार विशाल पाटलांनी लगावला.
‘मराठीच्या मुद्द्यावर तडजोड नाही. चार मे रोजी जे कोणी बळजबरीने रिक्षा बंद पाडण्याचा प्रयत्न करतील, त्यांना धडा शिकवा आणि जे रिक्षाचालक स्वेच्छेने सेवा सुरू ठेवतील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा,’ अशा सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.