

निवडणूक महाग होत आहे, एक एक मतदाराला पाच हजारांत विकत घेण्याची ताकद राजकारण्यांनी उभी केली आहे. निवडणुका आता पैशाने विकत घेण्याचा कालखंड सुरू आहे, हा पूर्णपणे विकत घेणारा आणि देणारा असा कालखंड आहे, अशा शब्दांत नागपूर इथं एका प्रचार सभेत बोलताना वंचित बहुनज आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सध्याच्या निवडणुकांवर बोचरी टीका केली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवतीर्थावर ११ जानेवारीला राज-उद्धव ठाकरे बंधूंची तोफ धडधडणार आहे. ठाकरे बंधूंच्या सभेला परवानगी मिळाल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी युती आणि आघाडी अंबरनाथ नगरपालिका आणि अकोट नगरपालिकेत झाली होती. मात्र, याबाबत वरिष्ठांना समजताच भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे, संबंधित स्थानिक नेत्यांकडून ही युती मागे घेतली जात असल्याचंही पाहायला मिळालं. अकोला जिल्ह्यात भाजप आणि एमआयएम यांच्यात युती झाली होती. मात्र, आता एमआयएम अकोटमधील भाजपच्या नेतृत्वाखालील 'अकोट विकास मंचा'तून बाहेर पडले आहे. तर, भाजप प्रदेशाध्यक्षांकडूनही विधानसभा आमदार प्रकाश भरसाखळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर, अंबरनाथमधील भाजप नेते नरेंद्र पवार यांनी ही युती नसून काँग्रेसने भाजपला विकासासाठी समर्थन दिले आहे, तरीही पक्षाचा आदेश आम्हाला मान्य आहे, असे स्पष्टीकरण दिलं.
काळे झेंडे, धक्काबुक्की आणि आता थेट गाडीवर हल्ला झाल्याने एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे आक्रमक झाले आहेत. पोलीसांनी या गुंडांना रोखावे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई केली तर ठीक नाहीतर आम्हीही वाकड्यात शिरू, असा निर्वाणीचा इशारा इम्तियाज यांनी हल्ल्याच्या घटनेनंतर दिला. हल्ले करणारे हे मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संजय शिरसाट यांचे गुंड आहेत, असा आरोपही इम्तियाज जलील यांनी केला आहे.
पीएमसी आणि पीसीएमसीमधील ढासळत्या नागरी पायाभूत सुविधांबद्दल नागरिकांचा वाढता असंतोष ओळखून, ही मोहीम शहरातील पाण्याच्या टँकरपासून ते वाहतुक कोंडीपर्यंतच्या नागरिकांच्या रोजच्या संघर्षावर केंद्रित आहे, केवळ नागरिकांची गैरसोय नाही तर महापालिका यंत्रणा अपयशी ठरल्याचा इशारा या मोहिमेतून देण्यात आलेला आहे.
अकोट नगरपालिकेत भाजपने 'एमआयएम'शी आघाडी केली आहे. नगरपालिकेत बहूमत नसलेल्या भाजपने 5 नगरसेवक असलेल्या 'एमआयएम'ला सोबत घेतले होते. यावरून राज्यात चर्चा सुरू झाली आहे. ज्यानंतर आता एमआयएम'ने समर्थन मागे घेतले असून भाजपने स्थापन केलेल्या 'अकोट विकास मंचा'तून एमआयएम बाहेर पडली आहे. भाजपच्या 'अकोट विकास मंच'मध्ये दोन्ही सेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि बच्चू कडूंची 'प्रहार जनशक्ती पार्टी सहभागी झाली होती.
राज्यात एकीकडे महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू दुसरीकडे अंबरनाथ नगरपरिषदेत काँग्रेसला खिंडार पडले आहे. येथे भाजपशी युती करणाऱ्या १२ नगरसेवकांचं निलंबन काँग्रेसने केलं आहे. आता हे सर्व नगरसेवक आणि अंबरनाथचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील हे भाजप प्रवेश करण्याची शक्यता आहे.
नुकताच एका कार्यक्रमात नारायण राणे यांची तब्ब्येत बिघडली होती. त्यांना कार्यक्रमात भाषण करतानाच भोवळ आली होती. ज्यानंतर राज्यभर खळबळ उडाली. यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी, राजकारणात काम करताना अनेकदा मतभेद होतात, काही गोष्टींमुळे कटुता येते, मात्र मनात कुठेतरी जिव्हाळा कायम असतो, असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
वैचारिक मतभेद असले, तरी मुंबईत मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या ठाकरे बंधूंची महापालिकेत सत्ता यावी, त्यांना पाठिंबा असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलं. राज्यात इतर महापालिकेत काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या, राजू शेट्टींनी मुंबईत मराठी महापौर असावा, असं म्हणत ठाकरेंना पाठिंबा दिला.
शिर्डीतील तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या करत मृतदेह टायर आणि डिझेलच्या सहाय्याने जाळून टाकल्याची धक्काद्यक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सराईत गुन्हेगार दिपक पोकळे, प्रवीण वाघमारे आणि त्यांच्या साथीरांच्या अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत.
नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदुर्डी गावात दारूबंदीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. एकूण 4 हजार 406 मतदारांपैकी 1 हजार 955 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून, मतदानाची टक्केवारी 44.37 इतकी नोंदविण्यात आली. या मतदानात दारूबंदीच्या समर्थनार्थ म्हणजेच दारूची बाटली आडवी करावी या पर्यायासाठी तब्बल 1 हजार 790 मतदारांनी मतदान केले, तर दारूची बाटली उभी ठेवावी या विरोधी पर्यायासाठी 81 मतदारांनी मतदान केले. दरम्यान, 83 मते बाद ठरली आहेत.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तब्बल सहा दाम्पत्य निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष, एकनाथ शिंदे शिवसेना, काँग्रेस, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि अपक्ष, म्हणून पती-पत्नी निवडणूक लढवत आहेत. पॅनल पद्धतीने निवडणूक होत असून चौघा उमेदवारांच्या पॅनलमध्ये पती-पत्नी उमेदवारीच्या रिंगणात उतरले आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू, नये म्हणून पोलिस सज्ज आहेत. कल्याण कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नेतीवली परिसरात अवैधरित्या पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. करण जितू निशाद (वय 21) डोंबिवली पूर्व, असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आज आयोजित पहिल्याच जाहीर सभेला ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांची अनुपस्थिती. चार जानेवारीला मुख्यमंत्री फडणवीस यांचा रोड शो झाला. त्यावेळी रथावर हजर असलेले मुनगंटीवार आज पहिल्याच जाहीर सभेला उपस्थित नसल्याने भाजपमधील गटबाजी पुन्हा समोर आल्याची दिसते आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आजच्या सभेने चंद्रपुरात जाहीर सभांना सुरुवात झाली. मात्र या पहिल्याच सभेला मुनगंटीवारांची अनुपस्थिती कार्यकर्त्यांना खटकणारी ठरली. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, 'माझ्या सभांना त्यांनी येणे, हे अपेक्षित नाही. ते आमचे नेते आहेत. त्यांच्या वेगळ्या सभा होणार आहेत.'
महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही विजयी संकल्प सभा असल्याने या ठिकाणी फक्त भाजपच्या उमेदवारांच्या बॅनरवर फोटो लागले. महायुतीमधील एकनाथ शिंदे शिवसेनेच्या एकाही उमेदवारांचे फोटो न लागण्याने चर्चेला उधाण आलं आहे.
भाजपसह सर्व पक्षांनी महापालिकेतून ओबीसी हद्दपार केलेला आहे. ओबीसीच्या नेतृत्वाची भ्रूणहत्या या निवडणुकांमध्ये झाल्याचा गंभीर आरोप ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला आहे. भाजपच्या खांद्यावर विश्वासाने ओबीसीने मान ठेवली. परंतु त्यांनी सुद्धा ओबीसी संपवलेला आहे. आमचे नेतृत्व संपवण्यात ते यशस्वी झाले आहेत. मात्र आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये योग्य तो धडा, त्यांना शिकवला जाईल, असा इशारा हाके यांनी दिला आहे.
खोपोली इथल्या मंगेश काळोखे हत्या प्रकरणावर एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मुरुड इथं तटकरेंनी मैं हू डॉन डान्स केला. तटकरेंनी केलेला हा डान्स म्हणजे निर्लज्जपणा आहे. असा डान्स करुन तटकरे यांनी रायगड, महाराष्ट्राचा डॉन मी असल्याचा म्हटलं आहे. सत्तेतील वरिष्ठांचा मला पाठबळ असल्याचं तटकरेंना दाखवायचं होत, असा आरोप थोरवे यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी भाजपला 'दूतोंडी गांडूळ' असे संबोधत त्यांच्या राजकारणावर घणाघात केला आहे. मीरा भाईंदरमध्ये भाजपने एमआयएमला पाठिंबा दिल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. तिथे 'फडणवीस आणि ओवेसी भाई-भाई' असल्याचे चित्र दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात अजित पवारांचा भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले होते.
स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्य आठवणी लातूर शहरातून शंभर टक्के पुसल्या जातील ,अस विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं. दरम्यान त्यांच्या या विधानानंतर आज लातूर बंदची हाक देण्यात आली आहे, तर विलासरावांचे मूळ गाव असणाऱ्या बाभळगाव मध्ये देखील सकाळपासनं कडकडीत बंद पाळण्यात आलाय.
पूर्व वैमन्यस्यातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर मंगळवारी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी पटेल यांचा आज पहाटे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यविधीला काँग्रेसप्रदेश अध्यक्ष उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
अकोटमधील मोहाळा येथे जुन्या वादातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर मंगळवारी दुपारी सुमारे दीड वाजता धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी पटेल यांचा आज पहाटे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
राजकीय हेतूने महिला निवडणूक अधिकाऱ्याने मनसे उमेदवारा अर्ज बाद केल्याची तक्रार मनसे नेते अविनाश जाधव यांनी निवडणूक आयुक्तांकडे केली होती. मंगळवारी ठाणे पालिका आयुक्त आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडेही लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे. यावेळी पालिका आयुक्तांनी , पुढील २४ तासांत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. चौकशी करून त्याच कालावधीत नवीन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले.
माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यांना निवडणूक आयोगाने नोटीस दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीत ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी धमकीचे फोन केल्याचा आरोप दानवेंनी घाटी हॉस्पिटलचे डीन डॉक्टर शिवाजी सुक्रे यांच्यावर आरोप केले होते. त आयोगाने या प्रकरणी डॉ. सुक्रे आणि दानवे यांना नोटीस बजावली आहे. यावर आता शुक्रे आणि दानवे खुलासा करणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.