
शिवसेना पक्षाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी महायुती सरकारच्या खातेवाटपाबद्दल मोठी अपडेट दिली आहे. उदय सामंत म्हणाले, मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं आहे की, दोन ते तीन दिवसांत खातेवाटप होईल. दुसरा दिवस आज रात्री बारा वाजता संपणार असून तिसरा दिवस उद्या 12 वाजता संपणार आहे. त्यामुळे सांगितलेल्या आश्वासनाला उद्या 12 वाजेपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे उद्या 12 वाजण्यापूर्वी खातेवाटप जाहीर होईल याची खात्री बाळगा असं सामंत यांनी सांगितलं आहे.
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित दोन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओत या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि निलंबनाची कारवाई झालेले पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या हॉटेलमधील भेटीचा आहे. दुसऱ्या व्हिडीओमध्ये घुले, राजेश पाटील आणि त्यांच्यासोबत संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हे दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये धनंजय देशमुख हे त्या दोघांसोबत चर्चा करताना दिसत आहेत.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या भेटीवरून तर्कवितर्क लढवले जात आहे. त्यावर आता नार्वेकरांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पाहुणे आले की पाहुणचार केला जातो, असे ते म्हणाले आहे. ही सदिच्छा भेट होती. ते एका पक्षाचे नेते आहेत. सर्वच नेते भेटत असतात, असेही नार्वेकरांनी सांगितले.
नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाला मंगळवारी दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर होते. त्यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सुरूवातीला मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला अन् आता खातेवाटपालाही विलंब होत असल्याने तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. तर शिवसेनेतील काही नेतेही मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झाले आहेत. त्यातच दोन्ही नेत्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे.
मुंबईतील सिद्धिविनायक मंदीर न्यासवरील सदस्यांचा कालावधी 3 वर्षावरुन 5 वर्षे करण्यात आला आहे. सदस्य संख्याही 9 वरुन 15 करण्याच्या सुधारीत विधेयकाला मंगळवारी विधानसभेत मंजुरी देण्यात आली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी नागपूरात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळावे, यासाठी ठाकरेंनी नार्वेकरांची भेट घेतल्याची चर्चा आहे. अधिवेशनाला सुरूवात होऊनही अद्याप विरोधी पक्षनेतेपदाबाबत कोणतीही चर्चा नसल्याची स्थिती आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. ही सदिच्छा भेट आहे, असे म्हटलं तरी सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता ठाकरे-फडणवीस यांच्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंंचावल्या आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये सात मिनिटे महत्वाची विषयावर चर्चा झाल्याचे समजते. या भेटीवर ठाकरे यांनी बोलणं टाळलं आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या फायर ब्रॅड नेत्या सुषमा अंधारे यांना एका अनोळखी व्यक्तीकडून धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहेय नागपूर विमानतळावर ही घटना घडली. नागपूरहून पुण्याला येत असताना एक अनोळखी व्यक्ती त्यांच्यासमोर आला. माज आला का? नीट राहायचं!अशी धमकी त्याने सुषमा अंधारे यांना दिली. सुषमा अंधारेंनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत याबाबतची माहिती दिली आहे. 'साधारण 6 फूट उंचीचा गोल आकाराचा गंध लावलेला, समोरून अर्धे टक्कल असणारा माणूस बोलण्याचा प्रयत्न करत होता. नेहमी प्रमाणे कुणीतरी ओळखीचा असावा म्हणुन वर बघितले तर तो जिवे मारण्याच्या धमक्या देत होता. गेट वरील सुरक्षा रक्षक थोडे पुढें सरसावले तसा तो जय श्रीराम च्या घोषणा देत भरधाव गाडीने निघून गेला.
देवेंद्र जी, आपण आपल्या यंत्रणेकडून या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही तपासून वस्तुस्थिती तपासावी. हा घटनाक्रम इथे लिहू नये असे खुपदा वाटले. माञ दहशत आणि दबावतंत्राचे हे गलिच्छ राजकरण मुख्यमंत्री म्हणुन आपल्यापर्यंत पोचवणे ही नागरिक म्हणुन माझी जबाबदारी आहे असे वाटले, असे अंधारे यांनी पोस्टमध्ये म्हटलंं आहे.
नाराज सुधारले तर बघू, असे सांगत शिवसेनेतील बंडखोरांबाबत नरमाईची भूमिका असल्याचे दिसते. नाराजांना आता आमची भूमिका पटत आहे, असे ठाकरे म्हणाले. शिवसेनेतील बंडखोरांबाबत नेहमीच आक्रमकपणे बोलणारे ठाकरे आज पहिल्यादांच शांतपणे बोलत होते. मंत्रिपद नाकारलेल्या छगन भुजबळ यांच्याबाबत वाईट वाटलं, ते अधूनमधून माझ्या संपर्कात असतात, असे ठाकरे म्हणाले.
निवडणूक आयुक्तांची निवड थेट न करता निवडणूक घेऊन त्यांची नेमणुक करावी, अशी मागणी त्यांनी केली. 'वन नेशन वन इलेक्शन'ला ठाकरे यांनी विरोध केला. मतदानाची प्रक्रिया पारदर्शक असली पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. एक देश एक निवडणूक होता कामा नये, असे ठाकरे यांनी सांगितले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनात ईव्हीएमवरुन टीका केली. जनतेच्या नजरेत हे ईव्हीएम सरकार आहे, असा टोला त्यांनी लगावला. लाडकी बहीण योजनेची पुढील रक्कम लवकरच त्यांच्या खात्यात जमा करा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. अजून खातेवाटप झाले नसल्याने बिनखात्यांच्या मंत्र्यांवर काय जबाबदारी आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अद्याप खातेवाटप झाले नाही मग गंमत म्हणून अधिवेशन घेतले का? असा सवाल त्यांनी केला. मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ नाराड आहे, यावरुन त्यांना विचारले असता त्यांच्याबाबत वाईट वाटते, असा टोला ठाकरे यांनी लगावला.
राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन् यांच्या अभिभाषणावर सध्या हिवाळी अधिवेशनात चर्चा सुरु आहे. राज्यपाल पक्षसदस्य असल्याचा उल्लेख सभागृहात करण्यात आला. हा मुद्या रेकॉर्डवरुन काढून टाकावा, यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यात खडाजंगी झाली.
भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षाकडून शिस्तभंगाची कारणे नोटीस बजावण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश कार्यालयातून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. भाजपचे कार्यालयीन सचिव मुंकुद कुलकर्णी यांच्या सहीने ही नोटीस मोहिते पाटील यांना देण्यात आली आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम केल्याने पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. माजी आमदार राम सातपुते यांनी केलेल्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे.
लोकसभेत आज वन नेशन वन इलेक्शन विधेयक सादर करण्यात आले. यासाठी भाजपने आपल्या खासदारांना उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला होता. केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन मेघवाल लोकसभेत हे विधेयक मांडले. काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी विधेयकाला विरोध केला आहे. संविधानाच्या मुळावर घाव घालण्याचा हा प्रयत्न आहे, असे तिवारी म्हणाले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे विधानभवन परिसरात दाखल झाले आहेत. ते आज कोणत्या मुद्यांवरुन सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार, कोणत्या मुद्यांवर सभागृहात आक्रमक होणार याकडे लक्ष लागले आहे.
मंत्रिपद न मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मतदारसंघात जाऊन जनतेशी संवाद साधणार आहे. सगळ्यांनी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. 'मी मंत्रिमंडळात असावं,' असा आग्रह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरला होता, पण तरीही मला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही, असे भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले. मंत्रिपद कुणी नाकारलं, हे शोधावं लागेल, असे सांगत भुजबळांचा रोख कुणाकडे आहे, याबाबत राजकीय वर्तुळात प्रश्न विचारण्यात येत आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तारानंतर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. येत्या 25 जानेवारीपासून ते अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसणार आहेत. आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. उपोषणाला बसण्यासाठी कोणावरही बंधन नाही, तुम्हाला घरातून उपोषणास बसण्यास विरोध असेल तर बसू नका. उपोषणाला कोणी नाही जरी बसलं, तरी मी एकटाच बसणार असल्याचं जरांगे यांनी सांगितले.
संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात अटक करण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या घटनेनंतर पडसाद आज हिवाळी अधिवेशनात उमडले. याप्रकरणी नितीन राऊत यांनी स्थगन प्रस्ताव ठेवला. आजच या विषयावर चर्चा करा, अशी मागणी महायुतीच्या आमदारांनी केली. परभणीची घटना सुनियोजित कट होती आणि पोलीस कस्टडीमध्ये ज्या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला ती हत्याच होती. पोलीस त्यास जबाबदार असल्याचा आरोपही काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी केला आहे. परभणी, बीड मुद्यांवर विरोधक आक्रमक होत त्यांनी सभात्याग केला. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाला असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधक सभागृहाच्या बाहेर पडले आहेत.
काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनिथला आज नागपुरात येत आहे. ते काँग्रेसच्या आमदारांशी संवाद साधणार आहे. त्याच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आणि काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना हटवण्याबाबत चर्चा होणार आहे. विधानसभा गटनेता निवडीवर आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.
महायुतीचा मंत्रिपदाचा शपथविधी रविवारी झाला. मंत्रिमंडळात जुन्या काही मंत्र्यांना पुन्हा संधी न दिल्याने ते नाराज असल्याचे चित्र आहे. विशेषत:राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अजित पवार यांनी डच्चू दिला आहे. मंत्रिपद न मिळाल्याची खंत भुजबळांनी बोलून दाखवली आहे. भुजबळ नाराज असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या २४ तासांपासून कुणालाच भेटले नसल्याची माहिती समोर येत आहे. नागपुरातील विजयगड या त्यांच्या निवासस्थानी ते नसल्याचे त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीही अजितदादा सभागृहात उपस्थित नव्हते, असे वृत्त साम टीव्हीने दिले आहे. आज दुसऱ्य दिवशी ते सभागृह उपस्थित नाहीत.
महायुती सरकारमध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्याने ते नाराज आहेत. त्यांनी आपली बोलून दाखवली आहे. ते अजित पवार यांची साथ सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ते आज कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. मला काय लहान पोरासारखं खेळवता? मी खेळणं आहे का तुमच्या हातातील? अॅडजस्टमेंट करायची म्हणून राजीनामा द्यायला सांगता? मान नाही तिथे सोन्याचं पान दिलं तरी काय करायचं मला? असा भावनिक सवालही त्यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना केला. आज ते कार्यकर्त्यांशी चर्चा करुन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. ओबीसी समाजाची मोट बांधत भुजबळांनी जरांगेंविरोधात रान पेटवलं होतं. राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र तरीही त्यांना डावलण्यात आलं आहे, असे अन्य पक्षातील नेत्यांचेही मत आहे. मनोज जरांगेंना भिडल्याचं बक्षीस मिळाल्याची उद्विग्न प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे त्यामुळे ते आज काय निर्णय घेतात, याकडे सरळ्याचे लक्ष लागले आहे.
नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे नागपुरात दाखल झाले आहेत. लोकसभेत आज वन नेशन वन इलेक्शन विधेयक सादर केले जाणार आहे, यासाठी भाजपने आपल्या खासदारांना उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला आहे. केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन मेघवाल आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारात लोकसभेत हे विधेयक मांडणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.