Maharashtra Politics Live Update : 'देवाच्या इच्छेने, मी मंत्रिमंडळातून बाहेर' : माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार

Marathi Breaking Live Headlines Updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यात घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट, जयंत पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट यासह राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

देवाच्या इच्छेने, मी मंत्रिमंडळातून बाहेर : माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार

राज्याच्या विधिमंडळात अनेक प्रश्न मांडत असताना देखील आपण मंत्रिमंडळातून बाहेर आहे. याचे कारण मुनगंटीवार यांना विचारताच "देवाची इच्छा" असे उत्तर त्यांनी दिले. यावेळी कुठला देवा असाही प्रश्न पत्रकारांनी करताच देवाचीच इच्छा असेल त्यांनी सांगितले. त्यामुळे मुनगंटीवार यांचा रोख फडणवीस यांच्याकडेच असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले.

वाढती गुन्हेगारी आणि हॉटेल व्यावसायिक तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ श्रीरामपूरमध्ये भव्य मोर्चा

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात वाढती गुन्हेगारी आणि हॉटेल व्यावसायिक तरुणाच्या हत्येने संतापाची लाट उसळली आहे. शहर तीन दिवस बंद ठेवल्यानंतर आज नागरिक, व्यावसायिक, सर्वपक्षीय राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी भव्य मोर्चा काढत गुन्हेगारी विरोधात रोष व्यक्त केला. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसह नागरिकांनी, शहरातील बेग टोळीसह त्यांना सहभागी असणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी या मोर्चाद्वारे केली आहे. तर आकाश यांचे वडील शेखर दुबय्या यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन करत, गुंडाला पक्षातून काढून टाकण्याची मागणी केली आहे.

नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी कक्षाची मोठी कारवाई; १.३३ कोटींचे अमली पदार्थ जप्त

नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने मोठी कारवाई करत हायड्रो गांजाच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल १ कोटी ३३ लाख रुपयांचा हायड्रो गांजा, कोकेन आणि १२ मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपासात थायलंडमधून हायड्रो गांजाची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे.

भाजपने एकनाथ शिंदे यांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केल्यास जनतेला खपणार नाही : माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार

भाजप कधीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्त्व कमी करणार नाही. परंतु भाजपने तसा प्रयत्न केला तर तो जनतेला ही खपणार नाही अस मोठं विधान माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज पंढरपुरात केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एनडीए मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. शरद पवारांना एनडीए सोबत घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू असतानाच भाजपचे नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र एकनाथ शिंदे यांचे समर्थन करत भाजप कदापिही त्यांचे महत्व कमी करणार नाही परंतु तसा प्रयत्न केला तर जनतेला तो खपणार नाही, असा इशारा दिला आहे.

अकोल्यातील जठारपेठ चौकातल्या सुप्रसिद्ध गणेश स्वीट मार्टवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाची धाड

अकोल्यातील जठारपेठ चौकातल्या सुप्रसिद्ध गणेश 'स्वीट मार्ट'वर आज अन्न आणि औषध प्रशासन विभागाने धाड टाकलीय. या धाडीमध्ये हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून आलीय. गणेश स्वीट मार्ट हे अकोल्यातील जठारपेठ भागातील जुने आणि ग्राहकांची मोठी गर्दी असणारे नाश्त्याचे हॉटेल आहेय. मात्र, आजच्या धाडीमध्ये स्वीट मार्टमधील स्वयंपाक घरात पथकाला अनेक अनियमितता आणि अस्वच्छता आढळून आलीय. विशेष म्हणजे एफडीएने याआधी या हॉटेलला यासंदर्भात सुधारण्याची नोटीस दिली होती. त्यानंतरही आजच्या धाडीत या ठिकाणी अनेक अनियमितता आणि अस्वच्छता आढळून आलीये. आवश्यक बाबींची पूर्तता होईपर्यंत हे हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश विभागाने दिले आहेत.

Mahayuti News : सामान्य प्रशासन विभागाने काढले अधिकृत परिपत्रक

राज्याचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या राजकीय प्रवासाला आता थेट ऐतिहासिक आणि शासकीय मान्यता मिळाली आहे. सन 2026 मधील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत शासकीय जयंती कार्यक्रमांच्या यादीत आता स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने १५ जुलै २०२६ रोजी या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.

बियाणे तपासणीच्या उत्तरदायित्वाच्या कार्यपद्धतीत बदल करणार

बियाणे तपासणीच्या उत्तरदायित्वाच्या कार्यपद्धतीत बदल करून नवीन मानक कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध करून देणे, निकृष्ट अथवा बनावट बियाण्यांमुळे होणारे नुकसान टाळणे तसेच बियाणे उत्पादन, साठवणूक, तपासणी आणि विक्री प्रक्रियेत अधिक पारदर्शकता व उत्तरदायित्व निर्माण करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व संबंधितांच्या सूचना आणि शिफारशींचा विचार करून शासन सर्वसमावेशक धोरण तयार करणार असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले.

Bullet Train news : बुलेट ट्रेन मार्गातील वाहून गेलेला पुल कच्चा

उल्हास नदीतील बुलेट ट्रेन मार्गातील वाहून गेलेला पुल कच्चा होता, असे स्पष्टीकरण नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉप्रोरेशनने दिले आहे. हा पुल कर्मचारी आणि मशिनिरीची ने-आण करण्यासाठी उभारला होता. मागील आठवड्यातील पावसात हा पुल कोसळल्याचे कंपनीने सांगितले आहे.

मतदारसंघ पुनर्रचनेला शरद पवारांच्या पक्षाचा पाठिंबा नाही - सपकाळ 

मतदारसंघ पुनर्रचने संदर्भात सकाळी ज्या बातम्या होत्या, त्याचं सुप्रिया सुळे यांनी खंडन केलेलं आहे आणि 'इंडिया अलायन्स'च्या सोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असा त्यांनी जो खुलासा केलाय, त्यावर आपल्याला आता विश्वास ठेवायला हवा.

बारामतीतील कण्हेरी वन उद्यानाचे अजितदादा पवार यांच्या नावाने नामकरण..

बारामती : बारामती तालुक्यातील कण्हेरी येथील निसर्ग पर्यटन वन उद्यानास "स्व. मा. अजितदादा पवार निसर्ग पर्यटन वन उद्यान" असे नामकरण करण्यास महाराष्ट्र शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय वन विभागाने आज (ता. 15) जारी केला असून, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), पुणे यांना पुढील आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बारामती परिसरातील पर्यटनाला चालना देणारे हे निसर्ग पर्यटन वन उद्यान पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेची जपणूक आणि पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेण्यासाठी महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. शासनाच्या या निर्णयामुळे उद्यानाला नवी ओळख मिळणार असून, स्थानिक नागरिक आणि पर्यटकांसाठीही हे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

नाशिक रिंगरोड भूसंपादनावरून शेतकऱ्यांचा संघर्ष तीव्र; आजपासून आमरण उपोषण सुरू

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित रिंगरोड प्रकल्पाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. योग्य मोबदला आणि मार्गात बदल करण्याची मागणी करत शेतकरी आंदोलन करत आहेत. प्रशासनासोबत झालेल्या चर्चेत तोडगा न निघाल्याने आंदोलकांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केले असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.

कोस्टल रोड बोगद्यात कारला आग; धुरामुळे वाहतूक बंद, नागरिकांमध्ये घबराट

मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्यात एका कारला अचानक आग लागल्याने मोठी धावपळ उडाली. आग इतकी भीषण होती की वाहन पूर्णतः जळून गेले. बोगद्यात धूर पसरल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही दिशांतील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली असून परिसरात मोठी कोंडी झाली आहे.

मुंबई कोस्टल रोड बोगद्यात कारला आग; वाहतूक बंद, नागरिकांमध्ये घबराट

मुंबई कोस्टल रोडच्या बोगद्यात एका कारला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. वाहन पूर्णपणे जळून नष्ट झाले तर बोगद्यात दाट धूर पसरला. सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही दिशांची वाहतूक तातडीने थांबवण्यात आली. या घटनेमुळे वाहनचालकांमध्ये भीती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणात परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे.

डिलिमिटेशनवर राष्ट्रवादीची भूमिका अद्याप ठरलेली नाही; सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण

केंद्र सरकारने डिलिमिटेशनचा अधिकृत प्रस्ताव आणि फॉर्म्युला जाहीर केल्यानंतरच भूमिका स्पष्ट केली जाईल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. कोणत्याही राज्यावर अन्याय होऊ नये, सर्व पक्षांशी चर्चा व्हावी आणि जागावाढीबाबत सरकारने स्पष्टता द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

Supriya Sule : 'डिलिमिटेशनचं बिल आमच्याकडे आलं नाही, सुप्रिया सुळे 

'डिलिमिटेशनचं बिल आमच्याकडे आलं नाही, बिल आल्यावर २४ तासात अभ्यासकरून भूमिका मांडू, सरकारकडून आलेल्या विधेयकात ५०% जागा वाढत असताली तर विचार करू अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली आहे.

पुणे जिल्हा परिषदेत 7 नव्या सदस्यांची भर पडणार

पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात आता केवळ लोकनियुक्त लोकप्रतिनिधीच नव्हे, तर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीही आपला आवाज उठवताना दिसणार आहेत. राज्य शासनाने स्वीकृत सदस्य नियुक्तीची नवीन अधिसूचना प्रसिद्ध केली असून, यामुळे पुणे जिल्हा परिषदेत आता तब्बल ७ स्वीकृत सदस्यांची भर पडणार आहे. या नव्या नियमांमुळे वकील, डॉक्टर, सेवानिवृत्त प्राध्यापक, प्राचार्य आणि विविध क्षेत्रांतील अनुभवी तज्ज्ञांना जिल्हा परिषदेचे सदस्य होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ आधीच ठरली होती - जयंत पाटील

जयंत पाटलांची पत्रकार परिषद सुरू झाली असून ते कालची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट ही इस्लामपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेसंदर्भातघेतल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांना भेटीची वेळ आधीच ठरली होती त्याच वेळेत भेटलो, असं स्पष्टीकरण पाटील यांनी दिलं.

६ लाख शिक्षकांचे भवितव्य ठरवणारा पेपर अवघ्या ८ हजारांत विकला

नीट पेपरफुटी प्रकरणाची धग अद्याप कायम असतानाच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल ६ लाखांहून अधिक उमेदवारांचे भवितव्य ठरवणारी प्रश्नपत्रिका छापखान्यातून अवघ्या ८ हजार रुपयांत बाहेर काढून विकण्यात आल्याचा मोठा खुलासा तपासातून झाला आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून, आतापर्यंत १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पुण्यात निलेश घायवळची टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली?

पुण्यात निलेश घायवळची टोळी पुन्हा एकदा सक्रिय झालीय का हा प्रश्न उपस्थित होतोय. कारण काल कोथरुडमध्ये ज्या अमित शिंदे वर कोयत्याने वार करण्यात आला तो निलेश घायवळच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या एका गुन्ह्यातील फिर्यादी आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे निलेश घायवळने अमित शिंदे यांच्या कोथरुड मधील मोबाईल दुकानातून सीम कार्ड घेतले होते.पोलिस तपासात ही बाब लक्षात आल्यानंतर अमित शिंदेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच अमित शिंदेवर काल कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला निलेश घायवळच्या विरोधात दिलेल्या तक्रारीची पार्श्वभूमी आहे.

हेरंब करमरकर यांचा मृतदेह ओमानच्या ताब्यात

हेरंब करमरकर यांचा मृतदेह ओमानच्या ताब्यात असुन पोस्टमॉर्टम करुनच तो हेरंब करमरकर ज्या गॅलेक्सी नौकेवर काम करत होते त्या नौकेच्या कंपनीकडे सोपविण्यात येणार आहे. त्यानंतर तो अंत्यसंस्कारांसाठी पुण्यात आणण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादीकडून ठाण्यात आंदोलनाची घोषणा

बाळकुम येथे प्रस्तावित डेटा सेंटरच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नजीब मुल्ला यांनी १ ते ३ ऑगस्टदरम्यान नागरिकांसोबत व्यापक आंदोलनाची घोषणा केली आहे. डेटा सेंटरमुळे पर्यावरण, आरोग्य, वाहतूक आणि स्थानिक पायाभूत सुविधांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत नागरिकांमध्ये गंभीर चिंता व्यक्त केली. या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन, त्या चिंतेला न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगितले. तसेच, यापूर्वीही या विषयावर आंदोलन केल्याची आठवण नजीब मुल्ला यांनी करून दिली.

Mumbai News : कामोठेत भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; 10 जणांवर हल्ला, मुलांना वाचवताना आजीच्या डोळ्याचा लचका

पनवेलमधील कामोठे सेक्टर-10 परिसरात भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने अवघ्या काही तासांत सुमारे दहा जणांवर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात दोन लहान मुले आणि एक ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात खेळणाऱ्या मुलांवर कुत्र्याने अचानक झडप घातली. मुलांना वाचवण्यासाठी धावलेल्या 64 वर्षीय कृष्णा म्हात्रे यांच्यावरही कुत्र्याने हल्ला केला. त्यांच्या डोळ्याजवळ चावा घेतल्याने डोळ्याला गंभीर दुखापत झाली. याशिवाय एका सहा वर्षीय मुलाच्या गालाला आणि आणखी एका ज्येष्ठ नागरिकाच्या हाताला चावा घेतल्याची माहिती आहे.

होमुर्झच्या सामुद्रधुनीमध्ये जहाजावर हल्ल्यात हेरंब करमरकर यांचा मृत्यू

होमुर्झच्या सामुद्रधुनी मध्ये एका जहाजावर हल्ल्यात पुण्यातील हेरंब करमरकर या अभियंत्याचा मृत्यू झाला. हेरंब करमरकर हे मर्चंट नेव्ही मधे कार्यरत होते.एम व्ही जी एफ एस गॅलेक्सी या नौकेवर काम करत होते. ही नौका ओमानच्या सागरी हद्दीतुन जात असताना रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास या नौकेवर हल्ला झाला. नौकेवरील २४ पैकी २३ जणांची त्यानंतर सुटका करण्यात आली. मात्र हेरंब यांचा मृत्यू झाला.

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत गेल्या दोन वर्षापासून मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना देण्यात येणारे अनुदान यावर्षीही निरंतर सुरू ठेवण्यात आले असून विभागीय आयुक्त पुणे तथा व्यवस्थापकीय संचालक, मुख्यमंत्री वारकरी महामंडळ यांच्या देखरेखीखाली या निधीचे थेट बँक खात्यात वाटप सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत नव्याने स्थापन झालेल्या "मुख्यमंत्री वारकरी महामंडळ" मार्फत तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी वारी सन २०२६ करीता मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना दिलासा देणारा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. २ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार यावर्षी वारीकरीता येणाऱ्या दिंड्यांना प्रत्येकी रु. २० हजार प्रमाणे एकूण रु. २ कोटी ८० लाख रुपये इतके वित्तीय अनुदान वितरित करण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे.

जयंत पाटील CM फडणवीसांना भेटले

 शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल या तीन नेत्यांनी मंगळवारी रात्री अचानक 'वर्षा' बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

सातारा पोलिसांना राज्य मानवाधिकार आयोगाचे समन्स, जिल्हा परिषद सदस्य कथित मारहाण प्रकरणाची गंभीर दखल

सातारा जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि संदीप माडवे यांना पोलिसांकडून झालेल्या कथित मारहाणीच्या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात सातारा पोलिसांनी आयोगाने समन्स बजावले आहे. या प्रकरणी आयोगाने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांना समन्स बजावून २५ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष किंवा अधिकृत प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा सविस्तर चौकशी अहवालही आयोगासमोर पोलिस अधिक्षकांना सादर करावा लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com