Maharashtra Politics Update : तापमानातील अचानक बदल आणि ओलाव्यामुळे तरकारी पिकांसह भाजीपाल्यावर रोगराई पसरण्याची भीती

Breaking Marathi News live Updates 23 April 2026 : विधान परिषद निवडणूक, बारामती, राहुरीत प्रचार तोफा थंडावल्या, अशोक खरात प्रकरण, TCS प्रकरणाती संशयित जामीनासाठी न्यायालयात यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर..
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

कात्रज कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनाचा तिढा सुटला

पुणे : कात्रज कोंढवा रस्त्याच्या ५० मीटरच्या रुंदीकरणासाठी आवश्‍यक असलेली ४१ हजार ५१७ चौरस मिटर इतकी जागा भूसंपादन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली असून, त्यासाठी महापालिकेने तब्बल २७६ कोटी रुपयांची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा केली आहे. या निर्णयामुळे पुढील एका महिन्यात ही संपूर्ण जागा महापालिकेच्या ताब्यात येणार आहे. त्याचा या भागातील लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आजची बैठक निष्फळ! शासकीय कर्मचाऱ्यांचा संप उद्याही कायम राहणार

शासकीय कर्मचारी गेले दोन दिवस हे संपावर गेले असताना आज मुख्य सचिव यांच्याकडे बैठक पार पडली. मात्र, ही बैठक निष्फळ ठरली असून उद्या देखील तिसऱ्या दिवशी शासकीय कर्मचारी यांचा संप हा सुरूच राहील. उद्या परत शासकीय कर्मचारी आणि मुख्य सचिव यांच्यामध्ये बैठक होईल जर उद्या देखील या बैठकीत तोडगा निघाला नाही तर हा संप असाच सुरू राहील, असे शासकीय कर्मचारी सरचिटणीस विश्वास काटकर यांनी सांगितले.

मल्लिकार्जुन खर्गेंच्या अडचणी वाढल्या! पंतप्रधानांना 'दहशतवादी' संबोधन भोवलं; निवडणूक आयोगानं घेतला मोठा निर्णय

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे याच्या अडचणीत वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहशतवादी संबोधनं त्यांना भोवलं आहे. याप्रकरणी भाजपनं निवडणूक आयोगाकडं तक्रार केली होती. त्यानुसार आयोगानं खर्गे यांना नोटीस पाठवली असून २४ तासांत याचा खुलासा करण्यास सांगितलं आहे.

विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस मधील माझ्या सहकाऱ्यांसोबत माझे चांगले संबंध : खासदार अशोक चव्हाण

राजकारणात मतभेद असतात पण मनभेद नसावेत असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय नुकताच पाहायला मिळालाय. राज्यसभेचे खासदार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीरपणे आज कबुली देत माझे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस मधील माझ्या सहकाऱ्यांसोबत चांगले संबंध असल्याच विधान अशोक चव्हाण यांनी जाहीरपणे केले.जर सरकारने माझ्यावर कुठली जबाबदारी दिली तर ती मी नक्कीच पूर्ण करेल असं सुद्धा अशोक चव्हाण म्हणाले.

तापमानातील अचानक बदल आणि ओलाव्यामुळे तरकारी पिकांसह भाजीपाल्यावर रोगराई पसरण्याची भीती

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात राजुरी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात अचानक गारवा निर्माण झाला आहे… या बदलामुळे दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे… तापमानातील अचानक बदल आणि ओलाव्यामुळे तरकारी पिकांसह भाजीपाल्यावर रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे

शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीम देण्याचे आदेश

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप 2023 चा पिक विमा प्राप्त न झाल्याने हिंगोली येथील शेतकरी अजीत मगर व आमदार चंद्रकांत नवघरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. सदरील याचिकेच्या सुनावणीत न्या. विभा कंकणवाडी व न्या. अजित कडेठाणकर यांनी या प्रकरणात राज्य सरकारने भूमिका बदलल्याने खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जून रोजी होणार आहे.

साताऱ्यात कोंढवे परिसरात अवकाळी पावसाचा दमदार हजेरी

सातारा शहरातील कोंढवे परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्याने काही वेळ नागरिकांची तारांबळ उडाली. दिवसभराच्या कडक उन्हाने आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने मोठा दिलासा दिला.अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावर धावपळ उडाली, तर काही ठिकाणी गारां मोठा पाऊस झाला ढगांच्या गडगडात विजेचा कडकडासह अचानक आलेल्या पावसाने सर्वांची तारांबळ उडवली. मात्र गर्मीने त्रस्त झालेल्या नागरिकांनी या पावसाचा आनंद घेत भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. लहान मुलांसह नागरिकांनी पावसामध्ये भिजण्याचा आनंद लुटला आहे. अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून तापमानातही घट झाली आहे

शेगावातील वाटिका चौकात भीषण आग; सिलेंडर स्फोटामुळे सात दुकाने भस्मसात

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील वाटिका चौक परिसरात सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागून सात दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग अधिक भडकली आणि मोठे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार, शेगाव शहरातील वाटिका चौक येथे एका खाजगी जागेमध्ये लहान व्यावसायिकांसाठी दुकाने उभारण्यात आली होती. दुपारी सुमारे चार वाजताच्या दरम्यान अचानक एका दुकानातून आग लागली. सुरुवातीला ही आग लहान प्रमाणात असली तरी काही वेळातच दोन सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे आगीने भीषण रूप धारण केले आणि एका लाईनमधील सात दुकाने पूर्णपणे जळून भस्मसात झाली.

राज्य सरकारचा अनुसूचित जाती जमातींमध्ये वाद निर्माण करण्याचा कुटिल डाव : भीम आर्मीचा आरोप

अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा शासनाचा निर्णय सामाजिक न्याय व संविधानिक तत्त्वांना बाधक असल्याचा आरोप करत, तो तात्काळ रद्द करण्याची मागणी भीम आर्मीतर्फे करण्यात आली आहे, याबाबत प्रशासनास निवेदन देण्यात आले, त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकारचा अनुसूचित जाती जमातींमध्ये वाद निर्माण करण्याचा हा कुटिल डाव असल्याचे म्हणत, या संदर्भात भीम आर्मीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करीत भाजप सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत निषेध नोंदविला आहे,

इथे कोळसा खरेच धुतला जातो का? : सुधीर मुनगंटीवार

महामाया इन्फ्रा ही कंपनी इथे कोळसा धुण्याचे काम करीत असली, तरी तिथे पाण्याची कायमस्वरूपी सोयच नसल्याचे वास्तवही समोर आले आहे. टँकरने पाणी घेत हे काम केले जात आहे. त्यामुळे इथे कोळसा खरेच धुतला जातो का, हाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाल्मीक कराडच्या गँगची जेलमध्येही दहशत!

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची खंडणी प्रकरणातून अपहरण आणि त्यानंतर झालेल्या निर्घृण हत्या प्रकरणातील वाल्मीक कराड आणि त्याच्या गँगची दहशत जेलमध्येही असल्याचे समोर आले आहे. वाल्मीकसह बीडच्या कारागृहात कैद असलेल्या सुदर्शन, प्रतिक घुले यांनी एका कैद्याला बेदम मारहाण केल्याचा दावा करणारी एक कथित ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. सरकारनामाने या ऑडियो क्लिपची पडताळणी केलेली नाही.

Dhananjay Munde : करुणा मुंडेंच्या उमेदवारीवरून धनंजय मुंडेंना डिवचले

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवर भाष्य करताना बजरंग सोनवणेंनी नाव न घेता धनंजय मुंडेंना टोला लगावला. बाहेरचे हवशे, गवशे, नवशे तिथे गेले असून आमच्या बीडच्या ताई देखील तिथे जाऊन निवडणुकीत उभारल्या आहेत. त्यांनी म्हटले की, माझ्या पतीराजाला विचारुन मी फॉर्म भरला, हा प्रकार नेमका काय? ही भानगड काय? हेच कळत नसल्याचा सवाल बजरंग सोनवणेंनी उपस्थित केला. प्रत्येक पक्षाने सुनेत्रा पवार यांना बिनशर्त पाठिंबा दिला पण निवडणूक ही कुणाची खोडी हे सुद्धा कळायला पाहिजे, असे म्हणत बजरंग सोनवणे यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंना डिवचलं. दरम्यान, करुणा शर्मा, अभिजीत बिचुकले यांच्यासह बारामतीमधील काही उमेदवारांनीही पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे, येथे 23 एप्रिल रोजी मतदाना पार पडणार आहे.

India And UK : भारत-ब्रिटन संरक्षण सहकार्यावर चर्चा; चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांचा ब्रिटन दौरा

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल Anil Chauhan सध्या United Kingdom दौऱ्यावर असून, त्यांनी तेथील संरक्षण उद्योग क्षेत्रातील मान्यवरांशी भेटी घेतल्या आहेत. या भेटींमध्ये संरक्षण क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. दोन्ही देशांमधील तंत्रज्ञान सहविकास आणि सहनिर्मिती (co-development & co-production) याला चालना देण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. संरक्षण क्षेत्रातील सहकार्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकासाला वेग मिळेल आणि भारत-ब्रिटन भागीदारी अधिक मजबूत होईल, असे Anil Chauhan यांनी सांगितले.

Kirit Somaiya : राज्यातील 30 विधानसभा मतदारसंघांमध्ये बांगलादेशी मतदार, सोमय्यांची निवडणूक आयोगाची तक्रार

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्यात बांगलादेशी नागरिकांची बोगस मतदार म्हणून नोंदणी होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी Election Commission of India कडे तक्रार दाखल करून पुरावे सादर केल्याची माहिती दिली.Mumbai येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितलं की, दिल्ली आणि मुंबईतील निवडणूक अधिकाऱ्यांना भेटून हे पुरावे देण्यात आले आहेत. धुळे, मालेगाव, मुंब्रा, छत्रपती संभाजीनगर पूर्व, अकोला पश्चिम, अमरावती, मालवणी, सिल्लोड, भिवंडी, रावेर आणि चिखली, अशा सुमारे 30 विधानसभा मतदारसंघांमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदार नोंदणी झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Rahuri ByPoll : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 374 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. एकूण 374 मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया होणार असून, राहुरी मतदारसंघात तीन लाख 33 हजार 543 मतदार आहेत. मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यंदा मतदान कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य हे थेट मतदान केंद्रावर उपलब्ध होणार आहे. उन्हाचा कडाका लक्षात घेता मतदान केंद्रावर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Girish Mahajan viral video : भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी, संतापली महिला; मंत्री महाजनांची पहिली प्रतिक्रिया समोर...

मुंबईत भाजपच्या कालच्या मोर्चामुळे झालेल्या रस्ता कोंडीवर त्रस्त झालेल्या एका महिलेने थेट राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर जाऊन आपला संताप व्यक्त केला. यावर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, "फार काही झालं नाही. ट्रॅफिकमुळे त्या महिला वैतागलेल्या होत्या. त्यामुळे त्या ओरडत होत्या. तोच विषय आहे. आम्ही या मोर्चासाठी परवानगी घेतली होती. वाहतूककोंडीमुळे सामान्यांना त्रास झाला याची मला कल्पना आहे. मी त्यांना सॉरीदेखील म्हणालो होते. पण त्यांनी जी भाषा वापरली ती योग्य नाही. मोर्चासाठी हजारो महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. अनेक मोर्चे निघतात. सगळ्याच पक्षांचे मोर्चे निघतात. त्यावेळी कोंडी होत असते हे मान्यच करावे लागेल. त्यावेळी एक महिला संतप्त झाल्या आणि काहीही बोलत होत्या. त्यांनी पोलिसांना रितसर तक्रार द्यायला हवी होती. तुम्ही रस्ते बंद कसे करू शकता, असा जाब त्यांनी मला विचारला. त्यावेळी त्यांची भाषा खूपच वाईट होती."

BEST New Buses : मोठी घोषणा, मुंबईकरांसाठी बेस्टच्या ताफ्यात 500 नव्या बेस्ट बसेस

मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल ट्रेन, पण या ट्रेनच्या स्थानकांवरून प्रवाशांना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षित पोहोचवणारी खरी 'लाईफलाईन' म्हणजे 'बेस्ट' बस! आता मुंबईकरांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि गोड बातमी आहे. प्रवाशांची ही रोजची फरफट थांबवण्यासाठी आणि प्रवासाला पुन्हा वेग देण्यासाठी बेस्टच्या ताफ्यात लवकरच तब्बल 500 नव्या 'मिडी' बसेस दाखल होणार आहेत.

Mumbai Local Train News : मुंबईत सीएसएमटी स्थानकात दोन लोकल रेल्वे एकाट ट्रकवर समोरासमोर, मोठी दुर्घटना टळळी

मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकात काल दुपारी तांत्रिक बिघाडामुळे एक थरारक घटना घडली. बदलापूरहून येणारी एक जलद लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक चार ऐवजी चुकीने प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर वळवण्यात आली. विशेष म्हणजे, प्लॅटफॉर्म पाचवर आधीच एक लोकल उभी होती. दोन्ही लोकल एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्याचे लक्षात येताच मोटरमनने तातडीने ब्रेक लावले, ज्यामुळे होणारी टक्कर थोडक्यात टळली. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक पाच आणि आठपर्यंतची रेल्वे वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती.

ShivsenaUBT News : उद्धव ठाकरे निवृत्त झाल्याने, या जागेवर शिवसेनेचाच नैसर्गिक हक्क; अंबादास दानवे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान परिषदेतून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे या जागेवर शिवसेनेचा नैसर्गिक हक्क आहे. महायुतीतील काही पक्ष यावर, आपला दावा करत असतील, तर तोडगा काढला जाईल. मात्र ही जागा शिवसेनेकडे राहील, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला.

Benjamin Netanyahu arrest warrant Hungary : हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हंगेरीची यात्रा केल्यास त्यांना अटक केली जाऊ शकते, असे खळबळजनक विधान हंगेरीचे नवनियुक्त पंतप्रधान पीटर माग्यार यांनी केले आहे. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाच्या नियमांचे पालन करत ही कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ज्या व्यक्तींविरुद्ध आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे अटक वॉरंट जारी आहे, त्यांनी हंगेरीच्या सीमेत प्रवेश केल्यास त्यांना तात्काळ ताब्यात घेतले जाईल, असे माग्यार यांनी स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

Gold Silver Price Today MCX : सोने आणि चांदीच्या किमतीत तेजी, इराण युद्धविरामाच्या मुदतवाढीचा परिणाम

मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर 22 एप्रिल, बुधवार सोने आणि चांदीच्या किमतीत तेजी पाहायला मिळत आहे. जागतिक कमोडिटी बाजारात आज सकाळपासूनच वाढ नोंदवली जात असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या युद्धविरामाला मुदतवाढ दिल्याची घोषणा केल्यामुळे ही दरवाढ झाली. आज MCX वर सोन्याचा भाव 1,53,253३ रुपये प्रति दहा ग्रॅम आणि चांदीचा भाव 2,48,800 रुपये प्रति किलोग्राम झाला.

शेत जमिनीची वाटणी आता फक्त शंभर रुपयांत

ग्रामीण भागात रक्ताच्या नात्यांमध्ये जमिनीच्या तुकड्यावरून होणारे वाद आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने शेतकरी कुटुंबांसाठी अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय घेतला असून, आता वडिलोपार्जित शेतजमिनीची वाटणी अवघ्या १०० रुपयांत होणार आहेत. या निर्णयामुळे सातबारा उताऱ्यावरील नावे वेगळी करण्यासाठी लागणारा मोठा खर्च आणि कायदेशीर कटकटीतून सामान्य शेतकऱ्याची मुक्तता झाली आहे.

राज्यावर यंदा एल निनोच्या संकटांचे ढग, सरकारकडून उपाययोजना

राज्यावर यंदा एल निनोच्या संकटांचे ढग असल्यामुळे सरकारने एल निनोशी लढण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी जलसंपदा विभागाने राज्यातील सर्वच महापालिकांना पत्र पाठवून 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्यासाठी पाणी जपून वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. 'एल निनो'चा परिणाम शेती, उद्योग आणि बांधकामावर होऊ शकतो. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेवरून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

मराठी सक्तीला विरोध करणाऱ्या रिक्षावाल्यांविरोधात मनसे मैदानात

मराठी सक्तीला विरोध करणाऱ्या रिक्षावाल्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे. मनसेच्या वतीने आता, 'मला मराठी येते' अशा प्रकारचे फलक मराठी रिक्षांवर आजपासून लावले जाणार आहेत.

विधान परिषदेसाठी आज भाजपची वर्षा निवासस्थानी बैठक

विधान परिषदेसाठी आज रात्री भाजपच्या कोअर कमिटीची वर्षा निवासस्थानी बैठक पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

खरात प्रकरणात आर्थिक तपासाला वेग; 10 वर्षांतील व्यवहारांचे सखोल विश्लेषण सुरू

अशोक खरात प्रकरणात आर्थिक तपासाला वेग आला आहे. बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये खरातच्या खात्यांमध्ये वर्ग झाल्याचा संशय असल्याने आता अशोक खरात आणि कल्पना खरात ची बँक खाती ईडीच्या रडारवर आहे. यासाठी खरातच्या मागील 10 वर्षांतील व्यवहारांचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांना PM मोदींनी श्रद्धांजली

गेल्या वर्षी याच दिवशी पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात निष्पाप जीवांचा बळी गेला. त्या सर्वांना आज आपण आदरांजली अर्पण करतो. त्यांना कधीही विसरले जाणार नाही. या दुःखद प्रसंगी शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. एक राष्ट्र म्हणून, या शोककाळात आणि आपल्या निर्धारात आपण एकजूट आहोत. भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही, आणि दहशतवाद्यांचे अमानुष मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली.

मे महिन्यात मिसिंग लिंक होणार सुरू

पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर असलेल्या मिसिंग लिंकचे उद्घाटन मे महिन्यात होणार आहे. या मार्गावरून सुरुवातीच्या सहा महिन्य जडवाहनांना प्रवेश असणार नाही. या मार्गावरून फक्त कार आणि बस गाड्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

उपायुक्त कैलास गायकवाड यांना लाच घेताना अटक

कंत्राटदाराकडून लाच घेताना नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांना लाच घेताना रंगेहात पकडले. महापालिकेतील त्यांच्या दालनातच ही कारवाई करण्यात आली. या गायकवाड यांच्या अटकेने प्रशासनात खळबळ उडाली आहे. 42 हजारांची लाच घेताना गायकवाड यांना अटक करण्यात आली.

सामान्य मुंबईकर महिलेने भाजपला आरसा दाखवला - विजय वडेट्टीवार

नारी शक्ती विधेयक विरोधी पक्षांनी मंजूर होऊ दिले नाही म्हणून मुंबईत रस्त्यात भाजपची महिला आघाडी मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थित आंदोलन करत होती. मात्र, रस्ता आडवल्याने आपल्या मुलाला आणण्यासाठी निघालेली महिला अडकून पडली. तिने प्रचंड संताप व्यक्त करत रस्ता मोकळा करण्यास सांगितले. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओवरून भाजपच्या महिला आघाडीला वाटलं असेल की घोषणाबाजीने आसमंत दणाणून सोडला की महिलांचे प्रश्न सुटले! पण भाजपच्या कार्यकर्त्यांना काय माहित, की खरी नारी शक्ती काय असते! त्यांच्या फोकनाड घोषणांपेक्षा सामान्य महिलेचा इथून चालते व्हा हा एकच आवाज जास्त पॉवरफुल ठरला. इव्हेंटच्या कॅमेऱ्यात शक्ती प्रदर्शन शूट होत असताना अचानक सामान्य मुंबईकर महिलेने भाजपला आरसा दाखवला, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक-२०२६ बाबत आढावा बैठक संपन्न

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामान्य निरीक्षक, पोलीस निरीक्षक, खर्च निरीक्षक तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीस सामान्य निरीक्षक डॉ. बिद्या नंद सिंह, पोलीस निरीक्षक एन. कोलंची, खर्च निरीक्षक बनोथ अखिल राम नाईक, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे जितेंद्र डूडी तसेच पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण संदीप सिंह गिल्ल हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. यावेळी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर वाहतूक तात्पुरती बंद

यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग वरील कि.मी. क्र. 58/500 (डोंगरगाव / कुसगाव) येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात आलेल्या पुलाचे शटरिंग काढणे व रंगकाम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही कालावधीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबईकडे जाणारी वाहतूक 23 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून, सर्व वाहने किवळे – देहूरोड–तळेगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून कुसगाव टोल प्लाझा येथे वळविण्यात येतील.

तसेच, पुण्याकडे येणारी वाहतूक दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून, सर्व वाहने कुसगाव टोल प्लाझा मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून देहू रोड – किवळे मार्गे पुण्याकडे वळविण्यात येतील.

TCS प्रकरणातील 6 आरोपींचा जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल

नाशिक TCS प्रकरणातील 6 आरोपींचा जामिनासाठी अर्ज केला आहे. आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. 2 तारखेला त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी केली. यापूर्वी संशयित निदा खान हिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने सुनावणी 27 तारखेपर्यत पुढे ढकलली. दानिश शेख, आसिफ अन्सारी,तौसिफ अत्तार,शाहरुख कुरेशी, रजा मेमन आणि शफी शेख या संशयित आरोपींकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com