

मोदींचा 'विकसित भारत' साकारण्यात तरुण पिढीची नवी भजन जॅमिंग कॉन्सर्ट चळवळ महत्वाची ठरतेय असं विधान भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केलं आहे. त्यांनी म्हटलं की, आपल्या देशामध्ये एक वेगळ्या प्रकारची सांस्कृतिक मुव्हमेंट चालू झाली आहे. या मुंबईमध्ये देशाची तरुण पिढी भजन जॅमिंग कॉन्सर्ट या कार्यक्रमात सहभागी होताना दिसत आहेत. आपली प्रथा-परंपरा-संस्कृती हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. आपल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे, भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र झालं पाहिजे. यासाठी आपल्या तरुण पिढीने सुरू केलेली ही एक मुव्हमेंट आहे.
Shivsena-BJP News : जालना जिल्ह्याच्या राजकारणात एकमेकांच्याविरोधात दंड थोपटून असलेले शिवसेनेचे नेते आमदार अर्जुन खोतकर, भाजपाचे नेते रावसाहेब दानवे आता महायुतीमुळे एकत्र आले आहेत. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोघांमध्ये बिनसले होते, त्यामुळे युती होऊ शकली नाही आणि दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. महापालिकेत भाजपाची बहुमतासह सत्ता आली. तर शिवसेनेला सत्तेबाहेर राहावे लागले.
पश्चिम बंगालमध्ये अमित शहांच्या दौऱ्यात गोंधळ झाल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून चार पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. भवानीपूर विधानसभा मतदारसंघात शहांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. या रोडशोला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. भवानीपूर मतदारसंघातून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक लढवत आहेत.
उल्हासनगर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर अश्विनी कमलेश निकम यांनी विद्यार्थिनींसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. शहरातील सातवी ते बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना येत्या शैक्षणिक वर्षापासून दरमहा ५०० रुपयांची ‘लाडकी विद्यार्थिनी शिष्यवृत्ती’ देण्यात येणार आहे. ही शिष्यवृत्ती स्वर्गीय आमदार ज्योती कालानी यांच्या नावाने दिली जाणार आहे.
भारतीय संविधानाने न्यायासाठी आरक्षण दिले आहे. आरक्षण हे गरीबी हटविण्याचा कार्यक्रम नाही. भारत सरकार आरक्षणाची वर्गवारी करुन जातीवाद वाढवित आहेत. सरकारने आरक्षणाची वर्गवारी त्वरीत थांबवावी. बदर समितीचा अहवाल तातडीने रद्द करण्यात यावा. २०२५ सालचे यूजीसीचे बिल जसेच्या तसे लागू करण्यात यावे. विविध सरकारी कार्यालयातील आरक्षणानुसार मिळणारी पदोन्नती दिली जावी. त्यााच निर्णय त्वरीत घेण्यात यावा या मागणीसाटी आरक्षण बचाव समितीतर्फे ८ एप्रिल रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती समितीचे अध्यक्ष प्रा. विलास शेजूळ यांनी दिली आहे.
अकोल्यातील कौलखेड भागात अकोला पोलिसांचा धाक राहिलेला नसून कौलखेड भागातील श्रद्धा नगरमध्ये नशेखोर टोळीने धुमाकूळ घातला आहे. दिवसाधवळ्या तिघांना चाकू मारून भोकसले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. तर हे कृत्य धुरंदर टू चित्रपट बघून केल्याचे आता समोर आले आहे.
मुंब्राचे नाव मुंबादेवी करावी अशी लोकांची भावना असून मी माझ्या भाषणातून व्यक्त केली आहे. आता राज्य सरकारपर्यंत हे नाव पोहोचण्याचे काम माझं असून याची काल भाषणाच्या माध्यमातून सुरूवात केली आहे. यापुढे पाठपुरावा पण करेन, असे म्हणत मुंब्राचं नाव मुंबादेवी करण्याचा निर्धार नितेश राणेंनी व्यक्त केला.
नाशिकमध्ये आणखी एक खरात असल्याचं उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. एका एनजीओ संस्थाचालकावर 121 महिलांचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. आरोपी रवींद्र एरंडे याला नाशिक पोलिसांनी अटक केली असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. तपासादरम्यान आरोपीच्या टॅबमध्ये तब्बल 81 व्हिडिओ आढळून आले असून 4 मोबाईल, 2 पेनड्राईव्ह आणि 1 मेमरी कार्ड जप्त करण्यात आले आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अजून तीन वर्षाचा अवधी असला तरी शिवसेनेने आतापासूनच स्थानिक पातळीवर मेळावे सुरू केले आहेत. आज उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कोल्हापुरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
बारामती आणि राहुरी या दोन्ही विधानसभा पोटनिवडणुका लढवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेसने या दोन्ही विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने बारामती विधानसभा पोटनिवडणुकी बाबत अजून आपले पत्ते उघड केलेले नाहीत.
अशोक खरात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमिनाया यांनी मोबाईल फोनचे सीडीआर रेकॉर्ड बाहेर काढले. ही चांगली गोष्ट आहे. मात्र, विरोधक इतक्यांदा मागणी करुनही त्यांना सीडीआर मिळत नाहीत. मग अंजली दमानिया यांना ही सगळी माहिती कोण पुरवते? विशेष म्हणजे अंजली दमानिया यांनी बाहेर काढलेल्या सीडीआर रेकॉर्डच्या यादीत भाजपच्या (BJP) एका नेत्याचाही समावेश कसा नाही?, असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. त्या शनिवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या
नाशिकच्या दिंडोरीतील अपघातग्रस्त विहीर बुजवण्याचं काम सुरू झालंय. इंदोरे गावात विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर विहीर मालक राजेंद्र राजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या फरार आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून ही अपघातग्रस्त विहीर बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय.
गेल्या तीन दिवसांपासून अंजनगाव खेलोबामधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जागेवरुन सुरू असलेला वाद अखेर मिटला आहे. मंदिर परिसरात असलेला पुतळा इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याची मराठा समाजानं तयारी दाखवलीय. माजी आमदार राजन पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांची मध्यस्थी यशस्वी ठरली. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी एक कोटीचा निधीची पालकमंत्री जयकुमार गोरेंनी घोषणा केली.
भोंदू खरात ऑस्ट्रेलिया, दुबई यासह चार पाच देशात हवालाच्या माध्यमातून Money Laundering करत असल्याची तसंच खरातने भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट राजकीय नेत्यांचे हजारून अधिक कोटी या देशांमध्ये पाठवले असल्याचं कळत आहे. खरात हा केवळ भोंदू नाही तर एक मोठे nexus आहे, त्यामुळे या प्रकरणाची केंद्रीय संस्थानी सुद्धा चौकशी करणे गरजेचं आहे. हा विषय राष्ट्रीय सुरक्षेला सुद्धा आवाहन देणारा असल्याने राज्य सरकारकडे पुरेसे पुरावे आले असतील तर गृह विभागाने देखील या प्रकरणाचा राजकीय गोळाबेरजेसाठी वापर न करता सखोल चौकशी केली पाहिजे.असो! या प्रकरणातही ED सारख्या यंत्रणांना जाग येईल, ही अपेक्षा! असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली. पेट्रोल आणि हाय-स्पीड डिझेलच्या (HSD) किमतीत अनुक्रमे 43 टक्के आणि 55 टक्के, अशी मोठी वाढ करण्यात आली आहे. या निर्णयानुसार, पेट्रोलची किंमत 321.17 रुपयांवरून 137.23 रुपयांनी वाढवून 458.41 रुपये प्रति लिटर करण्यात आली आहे. तसंच हाय-स्पीड डिझेलची किंमत 335.86 रुपयांवरून 184.49 रुपयांनी वाढवून 520.35 रुपये प्रति लिटरवर पोहोचली. हे नवीन दर तातडीनं लागू करण्यात आलेत. यासोबतच केरोसिन तेलाची किंमत 34.08 रुपयांनी वाढवून 457.80 रुपये करण्यात आली.
अहिल्यानगरच्या जेउरमधील AVAADA mskv tenth solar SPV limited सोलार कंपनीचे केबल, काॅपर तारांच्या चोरीचा प्रकरण स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी उघडकीस आणलं आहे. संतोष अशोक जाधव (नेवासा), करण वैश्य भोसले (रा. भेंडाळा ता. गंगापूर), मनोज सुनिल लिंभोरे (रा. नेवासा), परमेश्वर वैश्य भोसले (रा. भेंडाळा, ता. गंगापूर)या टोळी चोरी केली असून, एकूण 9 लाख 91 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती स्थानिकचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी दिली.
विदर्भातील ज्येष्ठ नेते दिवंगत दत्ता मेघे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जामठा इथं सर्वपक्षीय सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला महाराष्ट्रातील राजकारणातील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. मात्र, या शोक सभेला माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह एकत्र आले होते. परंतु या दोघांनी एकमेकांकडे साधे पाहिलेही नाही. दत्ता मेघे यांच्या श्रद्धांजली सभेला सर्वच पक्षांच्या नेत्यांनी उपस्थिती लावली. या प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार आदी उपस्थित होते.
इंडिया स्किल्स 2025-26 या स्पर्धेत महाराष्ट्रातील स्पर्धकांनी दमदार कामगिरी करत 4 सुवर्ण, 8 रौप्य आणि 5 कांस्य अशी एकूण 17 पदकं पटकावली आहेत. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेला वर्ल्ड स्किल्ससाठी रंगीत तालीम मानलं जातं. केंद्रीय कौशल्य विकास मंत्री Jayant Chaudhary यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कौशल्य विकास मंत्री Mangal Prabhat Lodha यांनी 2027 मध्ये राज्यस्तरीय महिला कौशल्य चॅम्पियन्स स्पर्धा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. सुमारे 15,275 नोंदणीकृत उमेदवारांमधून विविध टप्प्यांतील चाचण्यांनंतर 54 सर्वोत्तम स्पर्धकांची राष्ट्रीय स्तरासाठी निवड करण्यात आली होती. आता 2026 मध्ये Shanghai येथे होणाऱ्या वर्ल्ड स्किल्स स्पर्धेसाठी या विजेत्यांच्या प्रशिक्षणाची पुढील फेरी लवकरच सुरू होणार आहे.
कोकणात जाणाऱ्यासाठी महत्त्वाची असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पूर्ववत सुरू करण्यासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या 15-20 दिवसांत मागणी मान्य न झाल्यास उत्तर प्रदेश, बिहारकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या जाऊ देणार नाही, असा थेट मनसेने दिला. पूर्वी दादर ते रत्नागिरी, अशी पॅसेंजर ट्रेन दिव्यावरून सोडण्यात येत असल्याने मुंबईकर कोकणवासीयांची गैरसोय होत आहे.
बिहारमध्ये दारूबंदी असली तरी तिथे अजूनही विषारी दारूमुळे लोकांचा मृत्यू होत आहे. मोतिहारी जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर सात जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यापैकी अनेक लोकांची दृष्टी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बारामती पोटनिवडणुकीच्या अनुषांगाने राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेसने बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याचं निश्चित केलं आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी झाली आहे. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसच्या भूमिकेला पाठिंबा द्यायचा कि, बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विनंतीचा मान ठेवत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यायचा? असा सवाल त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. ठाकरेंची शिवसेना या सगळ्यांमध्ये काय निर्णय घेणार? याकडे लक्ष राहणार आहे.
हार्मुझच्या सामुद्रधुनी परिसरात तणाव आणखी वाढला असून, Iran ने अमेरिकेचं ए-10 लष्करी विमान पाडल्याचा दावा केला आहे. जगातील अत्यंत महत्त्वाच्या सामरिक मार्गांपैकी एक असलेल्या या भागात ही घटना घडल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. दरम्यान, United States च्या एफ-15ई लढाऊ विमानावरही हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या विमानातील एका वैमानिकाला सुरक्षितपणे वाचवण्यात अमेरिकन लष्कराला यश आलं असून, दुसऱ्या वैमानिकाचा शोध अद्याप सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर Iran कडून Israel वर हल्ले सुरूच आहे. मध्यपूर्वेत वाढत चाललेला हा संघर्ष जागतिक सुरक्षेसाठी मोठं आव्हान ठरत आहे.
Oil and Natural Gas Corporation (ONGC) च्या मुंबई हाय क्षेत्रातील SHP प्लॅटफॉर्मवर लागलेल्या आगीमुळे एकूण 10 कर्मचारी किरकोळ जखमी झाले. मात्र, तत्काळ आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सक्रिय करण्यात आल्याने आग वेळीच नियंत्रणात आणण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला.
आम आदमी पार्टीमध्ये सध्या मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. पक्षाचे हायप्रोफाईल खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यात आले असून. पक्षाचे ज्येष्ठ नेते सौरभ भारद्वाज आणि राष्ट्रीय मीडिया प्रमुख अनुराग ढांडा यांनी चड्ढा यांच्यावर थेट आणि अत्यंत तिखट शब्दांत प्रहार केला आहे. अनुराग ढांडा म्हणाले, "राघव, तुम्ही गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधान मोदींना घाबरत आहात. जो घाबरला तो देशासाठी काय लढणार?" संसदेत पक्षाला मिळणारा मर्यादित वेळ देशहिताच्या मुद्द्यांऐवजी "विमानतळ कॅन्टीनमध्ये समोसे स्वस्त करणे" यांसारख्या फालतू कामांसाठी वापरला जात असल्याचा टोला ढांडा यांनी लगावला.
दिंडोरीतील विहीर दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 9 जणांचा बळी गेल्यानंतर आज परिसरात प्रचंड तणाव आणि संतापाचे वातावरण पाहायला मिळाले. मंत्री नरहरी झिरवळ यांनी मृतांच्या कुटुंबीयांची सांत्वन करण्यासाठी रुग्णालयात भेट दिली असता, संतप्त स्थानिकांनी त्यांना घेराव घातला. "या निष्पाप मृत्यूंना जबाबदार कोण?" असा सवाल करत नागरिकांनी क्लास चालक आणि विहीर मालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. नरहरी झिरवळ रुग्णालयात पोहोचताच नागरिकांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. विहिरीला संरक्षण कठडा नसणे, रस्त्याचे अर्धवट काम आणि क्लास व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा यावर स्थानिकांनी झिरवळांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. "जर विहिरीला जाळी असती किंवा कठडा उंच असता, तर आज 9 जीव वाचले असते," असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला.
राहुरी, पाथर्डी आणि नगर या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नगर दक्षिण व उत्तर जिल्ह्यांची संयुक्त बैठक घेऊन अनिल भिकाजी जाधव या आदिवासी तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
ज्येष्ठ माओवादी नेते प्रशांत बोस (वय अंदाजे 80) यांचे शुक्रवारी राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) येथे उपचारादरम्यान निधन झाले. पश्चिम बंगालचे मूळ रहिवासी असलेले बोस यांना नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांच्या पत्नी शीला मरांडी यांच्यासह अटक करण्यात आली होती आणि ते तेव्हापासून कारागृहात होते. पुणे शहर पोलिसांनी 2018 मध्ये दाखल केलेल्या एल्गार परिषद–भीमा कोरेगाव प्रकरणातही बोस हे आरोपींपैकी एक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कथित कटाचा उल्लेख असलेल्या “माओवादी कम्युनिकेशन”शी त्यांचा संबंध असल्याचा आरोप पोलिसांनी केला होता.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देशातील वाढत्या गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. आंबेडकर यांनी पुढे आरोप केला की, ‘आत्मनिर्भर’च्या घोषणा करूनही देशांतर्गत गॅस साठवणूक व पायाभूत सुविधांमध्ये आवश्यक गुंतवणूक करण्यात सरकार अपयशी ठरले आहे.
खेलोबा मंदिर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्थलांतर होणार असल्याने तसेच ही जागा मंदिर देवस्थानची असल्याचे बैठकीत मंजुर करण्यात आले. ही बैठक मराठा समाज प्रतिनिधी आणि प्रशासनामध्ये शुक्रवारी रात्री पार पडली. दोन्ही समाजाने प्रशासनाला सहकार्य करत तोडगा काढल्याने अखेर शुक्रवारी रात्री खेलोबा मंदिराचे पुजारी फरांडे महाराज यांनी आपले आंदोल मागे घेतले.
सांगलीथील राम मंदिर चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. मध्यरात्री विना परवानगी हा पुतळा उभारल्याने सध्या या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. महानगरपालिकेतर्फे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा त्रिकोणी बागेत बसवण्याचे नियोजन होते. आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते रविवारी त्रिकोणी बागेत भूमिपूजन होणार होते. त्यापूर्वीच काही कार्यकर्त्यांनी राम मंदिर चौकात संभाजी महाराजांचा पुतळा बसवला आहे.पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर पोलिसांनी हा पुतळा तेथून हलवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.