
कल्याण गौरीपाडा गुरूआत्मन सोसायटीमध्ये उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी राडा घातल्याचे समोर आले आहे. येथील घरात घुसून तोडफोड, शिवीगाळ करत वॉचमनला देखील मारहाण करण्यात आली आहे. सुरज पातकर असे पदाधिकाऱ्याचे नाव असून खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
इराण आणि अमेरिका युद्धामुळे भारतात पेट्रोल डिझेलचा तुटवडा झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून अनेक पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात देखील अशा अफवांमुळे वाहनधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र पेट्रोल कंपन्यांकडे तीन महिने पुरेल इतका मुबलक साठा उपलब्ध असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून पंपांवरती गर्दी करू नये असे आवाहन अहिल्यानगर पेट्रोल डिलर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनी केलं आहे.
वतमाळच्या झरीजामणी तालुक्यातील मुकुटबन येथील एका वाईन बारमध्ये राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला.मारहाणीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बारमध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला वाद झाला त्यानंतर त्याचे रूपांतर धक्काबुक्की आणि हाणामारीत झाले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन्ही गटांतील कार्यकर्ते एकमेकांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे. या मारहाणी मागील नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटीने ई-चलन प्रणालीतील त्रुटी आणि वाढत्या आर्थिक दबावाच्या निषेधार्थ आजपासून राज्यभरात भव्य ‘जनआंदोलन’ सुरू केले आहे. त्यामुळं मुंबईत आझाद मैदान येथे आंदोलन पुकारण्यात येणार असून यासाठी ट्रक, टेम्पो, खासगी बसेस आणि टॅक्सींसह सुमारे १ लाखांहून अधिक वाहने एकत्र येण्याची शक्यता आहे.
बिहारमधील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार केंद्रात जाणार असल्याचे आता निश्चित आहे. नीतीश कुमार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज्यसभेवर जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नीतीश कुमार केंद्रात जाणार असल्याने बिहारमध्ये मुख्यमंत्रिपद बदलणार आहे. बिहारच्या मुख्यमंत्रिपदी भाजप की जेडीयूचा नेता बसणार, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने कृषीमंत्री दत्ता भरणे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी निषेध आंदोलन करण्यात येणार आले. कांदा व दूध दरवाढीबाबत तात्काळ निर्णय घेऊन विधानसभेत हमीभाव जाहीर करावा,तसेच महाराष्ट्राचा दौरा करून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना न्याय द्यावा,या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
राज्यसभा निवडणुकीसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. राज्यसभेच्या 37 जागांपैकी 7 जागा महाराष्ट्रातून निवडून दिल्या जाणार आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाबाबत महायुतीच्या नेत्यांमध्ये एकमत होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये अंतर्गत चुरस सुरू असून जिल्हा परिषदेवर पहिला अध्यक्ष कुणाचा होणार यावरून चढाओढ सुरू आहे. त्या संदर्भात आज राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सर्वच नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत देखील नेत्यांमध्ये मतभेद झाल्याने अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे नाव घोषित करणार आहेत. त्याबाबतचा निर्णय कोल्हापुरातील सर्वच महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी आजच्या बैठकीत घेतला.
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमधील काही उमेदवारांनी ओबीसी आरक्षित जागांवर ओबीसी असल्याचा खोटा दावा करून निवडणूक लढून जिंकले असल्याचा दावा करण्यात आला आहे. या बहुतांश उमेदवार हे मराठा समाजातील असून ओबीसी असल्याचा दावा करत निवडून आल्याचा गंभीर आरोप ओबीसी कार्यकर्ते मृणाल ढोले पाटील यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात जिल्हा जात पडताळणी समिती, पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापौर रवी लांडगे यांच्यासह 20 नगरसेवकांची जात पडताळणीची सुनावणी ६ मार्च २०२६ रोजी सुरू होत आहे.
ठाण्यातील बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी व कॅसिनो बंद करा अशी मागणी करणारं पत्र भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवलं आहे.
गुन्ह्याच्या शिक्षेतून जामीनावर सुटलेल्या गुंडाला पोलिसांसमोरच ठोकण्याचा प्रकार इचलकरंजीत रात्री उशिरा घडला. इचलकरंजी शहरात गोळीबाराची ही पहिलीच घटना आहे. अपर पोलिस अधीक्षक कार्यालयातून पोलिसांसोबत बाहेर पडलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर भररस्त्यात रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडण्यात आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारात ओंकार जितेंद्र कांबळे (वय २२, रा. समता चौक, सांगलीवाडी, जि. सांगली) असे जखमी झाला असून त्याला कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. संबंधित जखमी आणि आरोपीचे काही दिवसापूर्वी प्रेम प्रकरणातून वाद झाला होता. त्यातून ओंकार कांबळे याला अटक करण्यात आली होती.
पुण्यात आज रिक्षा संघटना आणि प्रवासी मालवाहतूक संघटनेच्या आंदोलनामुळे रिक्षा वाहतूक दोन तास बंद असणार आहे. ई चलनाविरुद्ध पुण्यात आज रिक्षा संघटना आणि मालवाहतूकदार संयुक्त कृती समितीकडून निदर्शने केली जाणार आहेत. या आंदोलना दरम्यान दोन तास रिक्षा आणि महार प्रवासी मालवाहतूक बंद असणार आहे.
दुबई, अबू धाबी मधून 111 प्रवासी पुण्यात परतल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. 198 नागरिकांपैकी 111 नागरिकांना पुण्यात सुखरूप आणण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.