Maharashtra Assembly Monsoon Session Live Update : विश्वास नांगरे पाटील नागपूरचे नवे पोलिस आयुक्त

Maharashtra Breaking News Today : Maharashtra Assembly Monsoon Session LIVE Updates on 23 June महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) प्रशासकीय, आर्थिक, शैक्षणिक तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
LIVE Udate
LIVE UdateSarkarnama
Published on
Updated on

प्रॉपर्टी नावावर करण्याच्या वादातून महिलेने तरुणाच्या तोंडावर उकळतं तेल टाकलं, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू...

लातूरच्या उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादाय घटना घडली आहे. अनैतिक संबंध आणि प्रॉपर्टी नावावर करण्यावरू आरोपी महिला आणि मयत उद्धव दहीकांबळे यांच्यात वाद झाला. या वादात आरोपी महिला वंदना मादळे हिने, मयताच्या तोंडावर उकळत तेल टाकून गंभीर जखमी केलं. यामध्ये उपचारदरम्यान मयत उद्धव दहीकांबळे (वय 24 वर्ष) या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी महिलेविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिला सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

धाराशिव मध्ये विकास निधीवरून श्रेयवाद पेटला

धाराशिवमध्ये आता पुन्हा एकदा भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात वाद सुरू झाला असून आता श्रेय वादाची लढाई सुरू झाली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अखर्चित निधीची चर्चा निघताच एकनाथ शिंदेंकडून निंबाळकर यांना मोठा निधी धाराशिवमधील विविध विकास कामांसाठी उपलब्ध करून देण्यात आला. ज्यानंतर 18 कोटीचा निधी एकनाथ शिंदे मार्फत मिळाल्याची ओमराजेंनी फेसबुक पोस्ट केली आहे. यावर शहरातील विविध विकास कामाला सरकारकडून निधी मिळाल्याची राणा जगजीत सिंह पाटील यांच्याकडूनही फेसबुक पोस्ट करत याला पलटवार करत पाठपुराव्याला यश मिळाल्याचे राणाजगजीतसिंह पाटलांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी सरकारचे आभार मानले आहेत.

शेतमालाला भाव नाही कर्ज माफीही फसवी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

भारतातील सर्वसामान्य नागरिक यांच्या सोबतच भारताची लोकशाही आणि संविधान देखील धोक्यात आलेल आहे. मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज निवडणूक आयोगाने बाद केला आहे. एका नोटीस वर अर्ज रिजेक्ट करणे म्हणजे एक प्रकारे लोकशाही आणि निवडणुकीचा कडेलोट आहे. शेतमालाला भाव नाही कर्ज माफी फसवी आहे. खतांचा तुटवडा आहे. डिझेलची टंचाई आहे. परीक्षा आहे तर पेपर फुटतात, डिग्री आहे तर नोकरी नाही. त्यामुळे सरकारच्या विरोधात हा आसूड मोर्चा होता. नांदेड प्रमाणे राज्यभरात काँग्रेसने मोर्चे काढले.

केतन अग्रवाल खून प्रकरणी आरोपींना सात दिवसाची पोलीस कस्टडी...

लोहगड किल्ला खून प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना वडगाव मावळ न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने दोन्ही आरोपींना २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या काळात पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येणार आहे.

बारामतीत स्वर्गीय अजित पवार यांच्या भव्य स्मारकास एकमताने मंजुरी

बारामती नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ३.५ एकर जागेत भव्य स्मारक उभारण्याच्या प्रस्तावास एकमताने मंजुरी देण्यात आली. सभागृहात सर्व सदस्यांनी दादांच्या बारामती, पुणे जिल्हा आणि महाराष्ट्राच्या विकासातील अतुलनीय योगदानाचा गौरव करत हे स्मारक भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरावे, अशी भावना व्यक्त केली.

विश्वास नांगरे पाटील नागपूरचे नवे पोलिस आयुक्त

नागपूरचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांची बदली झाली असून त्यांच्या जागी विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे मुंबईत उभारणार दुसरं शिवसेना भवन !

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून सध्या दुसरं शिवसेना भवन उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वांद्रे बीकेसी आणि दादर या ठिकाणी दोन जागांची पाहणीही करण्यात आली आहे. हे नवं शिवसेना भवन ठाकरेंच्या मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असल्याचे सांगितलं जात आहे.

येत्या पाच ते आठ दिवसांत महाराष्ट्रात सर्वदूर दमदार पाऊस

राज्यातील बहुतांश भागात मॉन्सून व्यापला आहे. येत्या पाच ते आठ दिवसांत महाराष्ट्रात सर्वदूर दमदार पाऊस होईल. मॉन्सून सक्रीय होत असून तो पाऊस सध्या पडत आहे. चांगली ओल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन पुणे वेधशाळेचे एस. डी. सानप यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यात डॉल्बी आणि लेझर लाईट वापरास बंदी

सोलापूर : मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रम व मिरवणुकांमध्ये डॉल्बी सिस्टीम तसेच लेझर लाईटच्या वापरास बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेस धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी आदेश जारी केला आहे.

ओमसकट सर्व खासदारांचं महायुतीमध्ये स्वागत : राणा पाटील; माझा विरोध कायम राहणार : ओमराजे

ओमसकट सर्व खासदारांचं मी महायुतीमध्ये स्वागत करतो. ते आता प्रतिस्पर्धी नाहीत, ते स्वतःहून एनडीएमध्ये आले आहेत, अशा शब्दांत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांचे स्वागत केले. तर ओमराजेंनी मात्र आपण मतदारसंघात जे बोललो आहे, त्यावर मी ठाम आहे. ज्याचा विचार नीच आहे, नीच कृत्य केलं आहे, अशा माणसाला माझा कायम विरोध असणार आहे. तो विरोध तुम्हाला पुढच्या काळातही दिसेल. मी शपथ घेऊनच उतरलो होतो, अशा नालायक लोकांचं राजकारण संपल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असे म्हटले आहे.

महायुतीत स्वागत केल्यानंतरही ओम राजेंनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांना ठणकावलं

धाराशिवचे खासदार ओम राजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. ते आता राज्यातील सत्ताधारी महायुतीचा भाग झाले आहेत. यावर आता भाजप आमदार व त्यांचे कट्टर राजकीय विरोधक राणा जगजितसिंह पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, ‘ओमराजेंसह सहा खासदारांचं महायुतीत स्वागत आहे, ते आता एनडीएत आल्यानं विरोधक राहिले नसल्याचं स्पष्ट केलं. त्यावर ओम राजेंनी पाटील कुटुंबाचा आपला कायमच विरोध राहणार असून ते कोणत्याही पक्षात असले तरी विरोधकच राहणार हेही स्पष्ट केलं.

मी जर बाळासाहेब ठाकरेंचा अवमान केला, तर एकनाथ शिंदे मला पक्षात ठेवतील का? किरण पावसकर

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात सूत्रसंचालन करताना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते किरण पावसकर यांनी केलेल्या एका विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा अवमान केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जात आहे. पण आता यावर पावसकर यांनी आमच्या शिवसेना पक्षातून बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान करण्याचं कोणीही धाडस करणार नाही. मी जर बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान केला तर एकनाथ शिंदे मला पक्षात ठेवतील का? असं स्पष्ट करत बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान केलेला नाही असं पावसकर यांनी यांनी म्हटलं

राज्य परिवहन महामंडळाचा एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय,महागाई भत्ता वाढला

राज्य सरकारच्या परिवहन महामंडळानं आता एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता थेट पाच टक्क्यांची वाढ जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयाचा अनेक हजारो एसटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. अधिवेशनातच परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी याविषयी घोषणा केली आहे.

महाराष्ट्रातील ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांना दिल्ली पोलिसांचं संरक्षण!

महाराष्ट्रातील ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांना दिल्ली पोलिसांचं संरक्षण देण्यात आलं आहे. दिल्लीतील संपूर्ण इमाराच्या बाहेर दिल्ली पोलिसांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. खासदारांच्या निवासात जाण्यासाठीही हवी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. खासदारांच्या परवानगीशिवाय सर्वसामान्य नागरिकांना तिथं आता प्रवेश नसणार.

महाराष्ट्रातही समान नागरी कायद्यासाठी जोरदार हालचाली सुरू, समिती गठीत;मंत्री योगेश कदम यांची माहिती 

तिसरी टर्ममध्ये मोदी सरकारनं समान नागरी कायदा लागू करण्याच्या उद्देशानं मोठी पावलं उचलली आहेत. सध्या उत्तराखंड आणि इतर भाजपशासित राज्याच्या धरतीवर महाराष्ट्रातही समान नागरी कायद्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. या कायद्याच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर राज्यात एक समिती गठीत करण्यात आली आहे. अशी माहिती माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री  योगेश कदम यांनी दिली.

CM Fadnavis news : राज्यात लोडशेडिंग केलेले नाही

राज्यात लोडशेडिंग केलेले नाही, उलट विक्रमी 32,000 मेगावॅट विजेचा पुरवठा केला असून, पुढील 5 वर्षांत ही क्षमता 45,000 मेगावॅटपर्यंत वाढवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Eknath Shinde news : एकनाथ शिंदेंची आदित्य ठाकरेंवर टीका

विधानसभेत आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडून मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर सभागृहात दाखल झालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर टीका केली. झटका बसल्याने मानसिक संतुलन बिघडल्याची टीका त्यांनी केली.

मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून शिवसेना यूबीटी पक्षाचा सभात्याग

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंगळवारी विधानसभेत मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. आमदार आदित्य ठाकरेंसह जयंत पाटील, नाना पटोले, विजय वडेट्टीवर यांनी हा मुद्दा उपस्थित करत सरकारवर टीका केली. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.

Pune Rain पुढील ३ तास महत्त्वाचे; पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट,

हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, तसेच पुणे , रायगड आणि रत्नागिरी येथील घाट क्षेत्रात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटलं आहे.

George Kurian Resignation : केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रीपदाचा दिला राजीनामा

मोदी सरकारमधील केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये भाजपने जॉर्ज कुरियन यांना पुन्हा संधी दिली नाही. त्यामुळे त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती भवनाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारल्याची माहिती दिली आहे.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीला सुरुवात

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर परिसरात पूर्वतयारी सुरू केली आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी मुक्काम स्थळी वारकऱ्यांसाठी प्रशस्त विसावा उभारण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मुंबईत पुढील दोन ते तीन तासांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता

मुंबईत सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून शहरातील बहुतांश भागात पावसाची संततधार सुरू आहे. हवामान विभागाने पुढील दोन ते तीन तासांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

पुण्यात गोळीबार, मंतरवाडी फाट्यावर खळबळ

पुण्यातील फुरसुंगी परिसरातील मंतरवाडी येथे काल रात्री एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खंडणीच्या फोनकडे दुर्लक्ष केल्याच्या रागातून हा गोळीबार करण्यात आल्याचे समोर आले असून, कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगने सोशल मीडिया पोस्टद्वारे या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला आहे. या घटनेमुळे पुण्यातील व्यापारी आणि व्यावसायिक वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तुकाराम मुंढेंचा धसका! व्यवसायिकांची परवान्यासाठी पळापळ

अन्न व औषध प्रशासनाचे नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच आपल्या नेहमीच्या डॅशिंग स्टाईलने कारवाईचा बडगा उगारला आहे. मुंढे यांच्या या कडक कारवाईच्या धसक्यामुळे राज्यातील खाद्यपदार्थ विक्रेते आणि उत्पादकांचे धाबे दणाणले असून, परवाने आणि नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सध्या अन्न व्यावसायिकांची मोठी घाई सुरू झाली आहे.

BJP Politics : 'ज्यांना आमदार व्हायची इच्छा, त्यांनी काळजी करू नये, देवाभाऊंकडे दैवी शक्ती आहे'; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

देवाभाऊंकडे दैवी शक्ती आहे,ती शक्ती सगळ्यांच समाधान करणारी आहे, त्यामुळे ज्यांना आमदार व्हायचे,त्यांनी काळजी करू नये,असे विधान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी मला, धैर्यशील कदम, अतूलबाबा, मनोजदादा, अश्या चौघांना विधानसभेत जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता मी चौघेही आमदार झालोत, प्रामाणिकपणे काम केल्यावर देवाभाऊ पाठीशी ठाम उभे राहतात आणि ज्यांना आता आमदार व्हायचं इच्छा आहे, त्यांनी काळजी करू नये, कारण देवाभाऊंकडे दैवी शक्ती आहे, जी सगळ्यांचा समाधान करणारी आहे, असं विधान मंत्री जयकुमार गोरे यांनी केलं आहे.

Qatar LNG Terminal Explosion : कतारच्या एलएनजी टर्मिनलमध्ये भीषण स्फोट; 13 जणांचा मृत्यू, तर 66 जण जखमी

इराण-अमेरिका युद्धाच्या सावटाखाली असलेल्या पश्चिम आशियातून एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. नैसर्गिक वायू उत्पादनात जगातील आघाडीचा देश असलेल्या कतारमधील 'रास लफान' औद्योगिक शहरातील गॅस प्लांटमध्ये एक भीषण स्फोट झाला. या भीषण अपघातात 13 कामगारांचा मृत्यू झाला असून 66 जण गंभीर जखमी झाले आहेत. कतारच्या ऊर्जा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मृत पावलेल्यांमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे.

Nashik Gokul Gite : शिवसेनेत दाखल होताच, गोकुळ गीतेंनी शिंदेंकडे मागितली पक्ष संघटनेची जबाबदारी

"मतदारांनी माझ्यावर जो विश्वास टाकला, त्या मतदारांचे भविष्यात कामे करण्यासाठी, त्यांच्या काही अडचणी सोडवण्यासाठी शिवसेना पक्षाचा सहयोगी म्हणून काम करण्यास परवानगी दिलेली आहे. भविष्यात पक्ष संघटनेची जबाबदारी दिली तर ती सुद्धा मी पार पाडेन," अशी भूमिका आमदार गोळुक गीते यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेत दाखल होताच मागणी केली आहे.

Sangali News : शक्तिपीठ महामार्गाविरोधात विटा तहसीलदार कार्यालयावर महिलांचा लाटणे मोर्चा

शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा, या मागणीसाठी सांगलीच्या विटा इथं महिलांनी लाटणे मोर्चा काढला. हातात लाटणे घेऊन महिला आणि शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. काही शेतकरी ट्रॅक्टर घेऊन मोर्चाच्या अग्रभागी होते. मोर्चात सहभागी पथनाट्याने लक्ष वेधले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत हालगी ताशाच्या गजरात काढण्यात आला. खानापूर तालुक्यातील जाणाऱ्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग मुळे बागायत शेती उध्वद्स्त होऊन शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार असल्याने शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, ही मागणी घेऊन हातात लाटणे घेऊन थेट सरकारच्या विरोधात महिला रस्त्यावर उतरल्या होत्या.

Farmer News : नाफेडमार्फत शासकीय हमीभावाने ज्वारी खरेदीला चांगला प्रतिसाद; शेतकऱ्यांकडून 44 हजार 68 क्विंटल ज्वारीची खरेदी...

वाशिम जिल्ह्यात नाफेडमार्फत शासकीय हमीभावाने ज्वारी खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 3 हजार 699 रुपये दर मिळत असल्याने बाजारभावापेक्षा अधिक दराचा लाभ मिळत आहे. जिल्ह्यात 3 हजार 467 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांकडून 44 हजार 68 क्विंटल ज्वारीची खरेदी करण्यात आली आहे. यासाठी 16 कोटी 30 लाख 85 हजार रुपयांहून अधिक रक्कम अदा करण्यात आली आहे. खरेदी केलेली ज्वारी शासकीय गोदामांमध्ये साठवून सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे रेशनधारकांना वितरित केली जाणार आहे. ज्वारी खरेदीची अंतिम मुदत 30 जून असल्याने नोंदणीकृत शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर ज्वारी आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Nanded Shivsena UBT : आष्टीकर बापलेकांनी 'ऑपरेशन तुडवाला' जशास तसे उत्तर देणार, थेट शिवसैनिकांना इशारा

बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर काल मुंबईवरून नांदेड विमानतळावर दाखल झाले, त्यानंतर हिंगोली लोकसभेतील हादगावकडे गाड्यांचा ताफा घेऊन निघत असताना आष्टीकरांना ठाकरेंच्या शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवले. गद्दार लिहिलेले फलक झळकावले. त्यानंतर आता खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह त्यांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टीकर यांनी देखील ऑपरेशन तुडवा राबवत असाल, तर जशास तसे उत्तर देऊ,असे म्हणत ठाकरेंच्या शिवसैनिकांना प्रति आव्हान दिले आहे. कुणी आपल्या अंगावर येत असेल, तर आम्ही सोडणार नाही, असं खासदार आष्टीकर हिंगोलीत दाखल झाल्यानंतर म्हटले.

Pune News : FDAच्या कारवाईच्या भीतीने कालबाह्य बिस्किटे, मॅगीसह खाद्यपदार्थ बंधाऱ्याच्या पाण्यात फेकली

पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात एका बंधाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात कालबाह्य बिस्किटे, मॅगी आणि इतर खाद्यपदार्थ पाण्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या संभाव्य कारवाईच्या भीतीने हा साठा विल्हेवाट लावण्यासाठी पाण्यात टाकण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.

Dharashiv Politics : ओम राजेनिंबाळकर यांच्या गद्दारीविरोधात 'रास्ता रोको' अन् प्रतिमेला 'जोडो मारो' आंदोलन

खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आक्रमक झाले असून, नळदुर्ग येथे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. ओम राजेनिंबाळकर यांनी गद्दारी केल्याचा आरोप करत प्रतिमा घेऊन निषेध मोर्चा अन् त्यानंतर जोडे मारो आंदोलन करण्यात आले. गद्दारी करणाऱ्या ओम राजनिंबाळकरांनी सभा घेतल्यास ती उधळून लावू, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Shivsena UBT : उद्धव ठाकरेंनी अधिवेशनापूर्वी घेतलेल्या आमदारांच्या बैठकीत चार जणांची दांडी; पुन्हा 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा.....

संसदेत शिवसेना ठाकरे पक्षाला खिंडार पाडल्यानंतर महायुतीचे नेते आता विधानसभेतही उद्धव ठाकरे यांना एकटे पाडण्याच्या तयारीत आहेत. मात्र, पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर आपले आमदार फुटू नयेत आणि सभागृहात त्यांनी आक्रमक राहावे, यासाठी उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली. या बैठकीला विधानसभेच्या 20 पैकी 16 आमदारांनी आणि विधान परिषदेच्या सर्व 5 आमदारांनी हजेरी लावत उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली. संजय देरकर, राहुल पाटील, सुनील शिंदे, संजय पोतनीस हे चार आमदार या बैठकीला गैरहजर होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com