औरंगाबाद : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत चार राज्ये जिंकत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. या विजयाने भाजपच्या (Bjp) राज्यातील नेत्यांनाही दहा हत्तीचे बळ आले आहे. तिकडे मुंबईत फडणवीस यांनी मिशन महापालिका हाती घेतली आहे, तर इकडे औरंगाबादेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) यांनी देखील मिशन महापालिकेच्या दृष्टीने मोर्चे बांधणी सुरू केली आहे. (Aurangabad)
नगरसेवक, महापौर राहिलेल्या कराड यांचे शहरातील दलित संघटना व त्यांच्या नेत्यांशी तशे चांगले संबंध आहेत. या संबंधाचा फायदा घेत महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याची तयारी कराड यांनी सुरु केली आहे. ओबीसी आरक्षण रद्दचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्यामुळे राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदेसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
तत्पुर्वी भाजपने या निवडणुका वेळेत होतील हे गृहित धरून राज्यातील ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये महापालिका निवडणुका जाहीर झाल्या होत्या त्या ठिकाणी निवडणूक प्रभारींची नेमणूक केली होती. औरंगाबाद महापालिकेसाठी पुर्वी भाजचे प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल सावे यांच्याकडे महापालिकेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु आता ती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री कराड यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती आहे.
औरंगाबाद महापालिकेच्या प्रभाग रचना व आरक्षणाच्या विरोधातील याचिका नुकतीच निकाली निघाली. परंतु ओबीसी राजकीय आरक्षणाच्या न्यायालयाच्या निर्णयाने आता या महापालिका आणखी पुढे गेल्या आहेत. मात्र सहा महिन्यांनी या निवडणुका होणारच हे गृहित धरून भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. पाच पैकी चार राज्यातील विजयाचा बुस्टर डोस मिळाल्याने या तयारीला अधिकच वेग आला आहे.
गॅस पाईपलाईन योजनेच्या भूमीपूजनाच्या माध्यमातून भाजपने शिवसेनेवर कुरघोडी केल्यानंतर आता कराड यांनी सोशल इंजिनिअरिंगचे प्रयत्न सुरू केले आहेत. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत दलित मतदार, संघटना आणि त्यांच्या नेत्यांची भूमिका महत्वाची ठरते. आतापर्यंत शिवसेना-भाजप युती असल्यामुळे या नेत्यांची व संघटनांची वेळेनूसार मदत होत होती. पण पहिल्यांदाच स्वतंत्रपणे महापालिका निवडूणक लढवणाऱ्या भाजपला आता या दलित संघटना व नेत्यांची गरज भासू लागली आहे.
त्यासाठी कराड यांनी आतापासूनच फिल्डींग लावणे सुरू केले आहे. पक्षातील दलित नेत्यांना सोबत घेत कराडांनी आज पॅंथरचे नेते संजय जगताप यांच्या घरी जाऊन आंबेडकरी चळवळीचे नेते गौतम खरात, रिपाइं (आठवले) चे किशोर थोरात यांच्यासह अनेकांची भेट घेतली.
यावेळी विविध राजकीय विषयांवर चर्चा तर झालीच, पण कराड यांनी या सगळ्या नेत्यांसोबत स्नेहभोजन देखील घेतले. कराडांची ही लंच डिप्लोमसी त्यांना किती फायदेशीर ठरणार हे लवकरच स्पष्ट होईल. एकंदरित कराड यांनी महापालिकेसाठीची तयारी सुरू केल्याचे त्यांच्या या भेटीगाठीतून स्पष्ट होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.