लातूर ः भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी जिल्ह्यातील ज्या सहा साखर कारखान्याची कागदपत्रे माझ्याकडे दिली आहेत, ती पाहता महाराष्ट्रातील सर्वा महाघोटाळा लवकरच उघडकीस येईल. प्रियदर्शन, बालाघाट साखर कारखान्यासह अन्य शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने खाजगी कंपनीच्या घशात घालण्याचा डाव आहे. या संपुर्ण प्रकरणाचा अभ्यास करून येत्या ३१ डिसेंबरपर्यंत हे प्रकरण चौकशीसाठी आपण ईडीकडे पाठवू, असा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
लातूर जिल्हा बॅंकेची निवडूणक, त्यात भाजपच्या सर्व उमेदवारांचे बाद झालेले अर्ज या पार्श्वभूमीवर आज किरीट सोमय्या लातूरमध्ये दाखल झाले. पत्रकार परिषद घेत त्यांनी जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला. माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, रमेश कराड, अभिमन्यू पवार यांनी या संदर्भातील तसेच जिल्हा बॅंकेतील भ्रष्टाचारीची कागदपत्रे देखील सोमय्या यांना सुपूर्द केली.
किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत जरंडेश्वर, पिंपरी चिंचवड महापालिकेतील घोटाळ्या संदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांनी पाठवलेले पत्र, समीर वानखेडे, आर्यन खान या सगळ्या विषयांवर भाष्य करत महाविकास आघाडी सरकारवर तोप डागली. सोमय्या म्हणाले, जिल्ह्यातील भाजपच्या लोकप्रतिनिधींनी मला लातूर जिल्हा बॅंकेसह सहा साखर कारख्यान्यातील भ्रष्टाचाराबद्दलची कागदपत्रे दिली आहेत. ती पाहिली असता महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा समोर येऊ शकतो.
या कागदपत्रांचा सखोल अभ्यास केल्यानंतर येत्या ३१ डिसेंबरपर्यंत त्याची चौकशी सुरू होईल, असा मला विश्वास आहे. बालाघाट, प्रियदर्शनी या दोन कारख्यान्यांची चौकशी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार सध्या चौकशी सुरू आहे. आता नव्याने समोर आलेल्या सहकारी साखर कारखान्यांची देखील चौकशी लवकरच सुरू होईल.
सहकारी साखर कारखाने हे शेतकऱ्यांच्या मालकीचे असतात. कारखान्यासाठी ते जमीन, पैसा देतात आणि सभासद होतात. नंतर हेच कारखाने तोट्यात दाखवून कवडीमोल भावाने खाजगी कंपन्यांच्या घशात घातले जातात. जरडेश्वरच्या बाबतीत देखील हेच घडले, आता लातूरमध्ये असाच प्रकार होऊ पाहत आहे.
दिवाळीनंतर नांदेडला जाणार
आज सकाळीच मी लातूरमध्ये आलो तेव्हा माझ्या सहकाऱ्यांनी हा प्रकार कागदपत्रांसह माझ्या निदर्शनास आणून दिला. दिवाळीनंतर आपण नांदेडात जाणार आहोत, असेही सोमय्या यांनी सांगितले. दरम्यान, लातूर जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणूकीत पहिल्यांदाच संपुर्ण पॅनल मैदानात उतरवत भाजपने काॅंग्रेसला आव्हान दिले होते. परंतु थकबाकी व इतर कारणांनी भाजपसह सर्वच विरोधकांचे अर्ज छाणनीमध्ये बाद झाले.
त्यामुळे काॅंग्रेस महाविकास आघाडीचे पाच संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. तर उर्वरित माघार घेण्याच्या तयारीत असल्याने जिल्हा बॅंके पुन्हा काॅंग्रेसच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. जिल्हा बॅंकेतील अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावत येऊन भाजपसह इतर विरोधकांचे अर्ज बाद केले असा आरोप करत भाजपचे आमदार रमेश कराड, संभाजी पाटील निलंगेकर यांनी न्यायालयात धाव घेण्याचा तसेच राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचे देखील जाहीर केले.
भाजपने काल जिल्हा बॅंकेत पाच तास ठिय्या आंदोलन देखील केले होते. त्यानंतर चोवीस तासांतच किरीट सोमय्या लातूरात दाखल झाले आणि त्यांनी काॅंग्रेस नेत्यांच्या ताब्यात आलेल्या साखर कारखान्यात घोटाळा झाल्याचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. आता महिनाभरानंतर सोमय्या यांनी दावा केल्याप्रमाणे भाजपच्या आरोपात तथ्य आढळते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.