अहमदनगर - देशातील बहुजन उद्धाराच्या चळवळीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी बहुजन चळवळीला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र दिला. हा संदेश बहुजनांच्या चळवळीतील ब्रिदवाक्य बनुन राहिला आहे. हा संदेश त्यांनी कोठे, का, कोणाला उद्देशून दिला यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बहुजन समाज व शिक्षणाकडे पाहण्याची दृष्टी दिसून येते. ( Babasaheb Ambedkar had given the mantra of Learn, Organize, Struggle Tax in this place )
इंग्रजांच्या काळात नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये धोंडिबा संभाजी साठे हे कुक (आचारी) म्हणून काम करत होते. ते व त्यांची पत्नी सईबाई हे नाशिकलाच राहत होते. सईबाई यांची शांताबाई दाणे यांच्यामुळे भाऊराव (दादासाहेब) गायकवाड यांच्या बरोबर परिचय झाला. बहुजन उद्धाराच्या चळवळीत त्या सहभागी होऊ लागल्या. 1930चा तो काळ होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकमधील काळाराम मंदिरात सत्याग्रह सुरू केला. टप्प्या टप्प्याने हा सत्याग्रह आक्रमक स्वरुप धारण करू लागला. याच कालावधीत धोंडिबा व सईबाई साठे या दाम्पत्याचा बाबासाहेब आंबेडकरांशी परिचय झाला.
बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी हे दाम्पत्य भारावले. धोंडिबा साठे यांनी लष्कराची नोकरी सोडली. ते काळाराम मंदिर सत्याग्रहात सक्रिय झाले. ते नाशिकला न राहता त्यांच्या गावी अहमदनगरला आले. धोंडिबांनी नोकरी सोडल्यामुळे त्यांच्या आई जिजाबाई साठे नाराजी व्यक्त करू लागल्या. एकदा जिजाबाई साठे धोंडिबांना म्हणाल्या, "अरे! तुम्ही नवरा-बायको बाबासाहेब म्हणतात त्याला डोळे भरून पाहू तरी द्या." आईचा हट्ट पुरविण्यासाठी व मातंग समाजाला उपदेश व्हावा यासाठी धोंडिबांनी बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली. त्यांना अहमदनगरला येण्याचे आमंत्रण दिले. त्यानुसार 1936 साली बाबासाहेब आंबेडकर अहमदनगरमध्ये आले.
बाबासाहेबांचे धोंडिबांनी स्वागत केले. मातंग समाज हा शिक्षणापासून दूर असल्याने त्यांना उपदेश करण्याची विनंती बाबासाहेब आंबेडकरांना करण्यात आली. अहमदनगर शहराच्या माळीवाडा वेशी जवळील लक्ष्मीआई मंदिराच्या प्रांगणात सभा सुरू झाली. तरुण अस्पृश्य समाजसेवक संस्थेने या सभेचे आयोजन केले. बाबासाहेब आंबेडकरांच्या सुरक्षेसाठी समता सैनिक दलाचे कार्यकर्ते त्यांच्या बरोबर होते. शिवाय अहमदनगर शहरातील इतरही आंबेडकरी कार्यकर्ते उपस्थित होते. जिजाबाई साठेंनी आंबेडकरांना डोळे भरून पाहिले. बाबासाहेब आंबेडकरांनी सभेत सांगितले की, "शिक्षण घेणे आवश्यक आहे. शिक्षण घेतले तरच समाज जागृक होईल. मातंग बंधुंनो, तुम्ही शिक्षण घेत नाही. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा," असा मंत्रच त्यांनी दिला. हा संदेशच पुढे आंबेडकरी चळवळींची घोषणा ठरली. या सभेचा फोटो अजूनही लक्ष्मीआई मंदिराच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर आहे.
या सभेच्या वेळी धोंडिबा साठे यांचा दोन वर्षांचे पूत्र पोपटराव साठे हेही या सभेला उपस्थित होते. ते त्यांच्या आजोबा व आजीने सांगितलेल्या आठवणी अजूनही सांगतात. धोंडिबा साठे यांना बाबासाहेब आंबेडकरांना राजकारणात न जाता समाजकारण करण्यास सांगितले होते. शिक्षण प्रसाराचे व्रत त्यांना दिले. त्यानुसार धोंडिबा साठे व त्यांचे पूत्र पोपटराव साठे यांनी महात्मा विद्यार्थी वसतीगृह सुरू केले. शिवाय मातंग समाजासाठी मातंग समाज हितचिंतक मंडळाची स्थापना केली. या मंडळाला नावही बाबासाहेब आंबेडकरांनीच सुचविले असल्याचे पोपटराव साठे अभिमानाने सांगतात.
काळाराम सत्याग्रहाची आठवण
काळाराम सत्याग्रह 1930 ते 1935 या कालावधीत झाला. या सत्याग्रहात पहिले पाच वर्षे काळाराम मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र 1935च्या सुमारास रामनवमीला रामाचा रथ निघणार होता. म्हणून मंदिराचे द्वार उघडण्यात आले. सत्याग्रहींनी रथ पळविला. बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिरात प्रवेश केला. त्यांच्या मागे काही महिला होत्या. त्यात सईबाई साठे होत्या. मंदिरातून एक खडा आंबेडकरांच्या दिशेने फेकण्यात आला. तो आंबेडकरांच्या डोक्याला लागला. त्यामुळे आंबेडकरांच्या डोक्यातून रक्त आले. हे पाहून सईबाई चिडल्या धावून जाऊ लागल्या हे पाहून आंबेडकरांनी त्यांना थांबण्यास सांगितले होते.
प्रकाश आंबेडकरांची भेट
बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर हे 8 ते 10 वर्षांपूर्वी अहमदनगरला आले होते. त्यावेळी कॉम्रेड अनंत लोखंडे यांनी प्रकाश आंबेडकरांना लक्ष्मीआईच्या मंदिरात नेले त्यांना मंदिराच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर असलेला फोटो दाखविला. बाबासाहेबांचा फोटो व त्या वेळच्या सभेची हकीकत पोपटराव साठे यांनी त्यांना ऐकविली होती.
असा मिळाला सभेचा फोटो
धोंडिबा साठे यांचे भाऊ बाबूराव संभाजी साठे हे भिंगारला एका फोटो स्टोडिओत फोटोग्राफर होते. तेही बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या सभेला हजर होते. त्यांनी त्या सभेतील उपस्थितांचा फोटो काढला होता. तो फोटो अजूनही लक्ष्मीआईच्या मंदिरात व साठे कुटुंबियांच्या ह्रदयात आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.