

Hindu Janakrosh Melava : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा छत्रपती-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या समतावादी विचारसरणीवर असताना, त्यांचे पक्षाचे अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमक हिंदुत्व स्वीकारलं आहे.
हिंदूंनी दिवाळीची खरेदी-विक्री हिंदू व्यापाऱ्यांकडून करा, या वादग्रस्त विधानानंतर आता पुन्हा, मुलं-बाळं शाळेत जात असलेला रिक्षावाला, व्हॅनवाला हा हिंदूच असला पाहिजे, असे विधान आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे. जगताप यांच्या या विधानाचे पुन्हा पक्षांतर्गत आणि राजकीय पडसाद उमटणार असल्याचे चिन्हं आहे.
पाथर्डी इथल्या श्री क्षेत्र मढी देवस्थान कानिफनाथ यात्रेला सुरवात झाली आहे. या यात्रेत मुस्लिम (Muslim) व्यावसायिकांना दुकाने न लावून देण्याची भूमिका मढी ग्रामपंचायतीने घेतली आहे. गेल्या वर्षी ग्रामपंचायतीने तसा ठराव घेतला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या ठरावाला स्थगिती दिली असली, तरी पुन्हा यंदा मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत बंदी असल्याची भूमिका माजी सरपंच संजय मरकड यांनी मांडली.
जिल्हा प्रशासनाकडे याबाबत तक्रारी झाल्यानंतर प्रशासनाने, देवस्थान प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी मुस्लिम व्यावसायिकांना कायदेशीर मार्गाने सहकार्य घेण्याची भूमिका घेतली. यावर माजी सरपंच संजय मरकड यांनी थेट हिंदू जनआक्रोश मेळाव्याचे आयोजन केलं. आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap), आमदार महेश लांडे यांनी मेळाव्यात सहभाग होत, वादाला तोंड फोडणारी विधानं केली. संग्राम जगताप यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केलं.
संग्राम जगताप म्हणाले, "दिवाळीच्या काळात आम्ही सांगितलं होतं की, आपल्या लोकांकडून आपण खरेदी करा. यावर आम्हाला जातीवादी म्हणून टार्गेट केलं गेलं. पण आम्ही आमच्या धर्माचं म्हणून सांगितलं. आम्ही जातीबद्दल काहीच बोललो नाही. फक्त हिंदूनी हिंदूकडून खरेदी करा, एवढं म्हटलं." पुढं जाऊन सांगतो, आपलं मुलं-बाळ शाळेत जात असेल, त्याचा रिक्षावाला, व्हॅनवाला कोण पाहिजे, असा प्रश्न जगतापांनी केल्याबरोबर समोर बसलेल्यांमधून काहींनी हिंदू, असा आवाज दिला. यानंतर जगतापांनी देखील हिंदूच असला पाहिजे, असे ठासून सांगितले.
क्लासला जात असेल, तर तिथला शिक्षक हिंदूंच पाहिजे. खरेदी करणार असेल, तर समोरचा हिंदूच पाहिजे. हे लक्षात ठेवा. पैठण इथल्या कॅम्पुटर क्लास चालवणाऱ्याचा किस्सा जगतापांनी सांगितला. आपल्या एखादा गाडीचालक, वाहनचालक, ड्रायव्हर असेल, शिक्षकाकडे मुलं-बाळं येत असेल, तर तो म्हणतो ही लक्ष्मी आहे. पण हे आपल्या माय-माऊल्यांकडे शोषणाच्या नजरेने बघतात, असे संग्राम जगताप यांनी म्हटले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आमदार जगताप पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक झालेले दिसत आहे. राज्यात हिंदूंच्या मोर्चांना हजेरी लावत आहे. अजित पवार असताना, त्यांनी जगतापांच्या या भूमिकेवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. पक्षांतर्गत अन् समाजिक कार्यकर्त्यांकडून देखील तक्रारी झाल्या होत्या. याची दखल घेत अजित पवार यांनी जगतापांना तंबी देखील दिली होती. यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्ष शिस्तभंगाची कारवाई होईल, अशी नोटीस देखील बजावली होती.
जगतापांनी यानंतर आपली आक्रमक भूमिका काही दिवस शांत ठेवली. पण अजित पवार यांच्या निधनानंतर जगताप पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्यावर राज्यात सक्रिय झाले आहेत. राज्यातील हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक होताना, अजित पवार यांच्या पक्षाच्या विचारधारेला पुन्हा तडा जाताना दिसतो आहे. पक्षाची सूत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हातात आली आहे.
अजितदादांच्या निधनानंतर पक्ष सावरणं कठीण असलं, तरी तो सावरण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यात काहीप्रमाणात यश येत आहे. पण पक्षात राहून जगतापांनी हिंदुत्वाची आक्रमक घेतलेली भूमिका पक्ष विचारधारे विरोधात जाते आहे. यावर पक्षाकडून पुन्हा कारवाई होणार की, सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल दुर्लक्ष करून पाठबळ देणार, याची चर्चा पक्षांतर्गत रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.