
BJP Mahayuti Government : 'छावा' सिनेमाच्या प्रदर्शनानंतर राज्यासह देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 'छावा' चित्रपटामुळे तरुणांची माथी भडकवली जात असून दंगली उसळत आहेत. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी मौलाना शाहबुद्दीन रझवी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.
तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील महायुती सरकारला दंगलीवर राज्य करणार का? असा कडक सवाल केला आहे.
'छावा' चित्रपटानंतर राज्यातील औरंगजेबाची छत्रपती संभाजीनगरमधील कबर हिंदुत्ववाद्यांच्या रडारवर आली. भाजप (BJP) सत्ताधाऱ्यांनी ही कबर हटवण्याची मागणी केली. सत्ताधारी पक्षाच्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संघटनांनी ही कबर हटवण्यासाठी 17 मार्चला राज्यभर आंदोलन केले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होम ग्राऊंड असलेल्या नागपूरमध्ये दंगल उसळली. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी छावा चित्रपटावरून देशभर निर्माण होऊ घातलेल्या तणावावरून महायुती सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "'छावा' सिनेमा हा इतिहास आहे. इतिहासातील घटना आहे. म्हणून इतिहास हा आपण आताच्या परिस्थितीमध्ये वेगळ्यापद्धतीने आणायला लागलो, तर देश पुढे जाणार आहे का? जगातील अनेक देश वेगळ्यापद्धतीने पुढे जाताना पाहात आहोत. अशावेळी दंगली सुरू होणे, समाज-समाजात तणाव निर्माण होणे, हे अतिशय दुर्दैवी आहे".
"अशावेळी सरकारची काय जबाबदारी असते, यावर बोलताना असे तणाव न होण्यासाठी, दंगली न होण्यासाठी काम केले पाहिजे. समाजात तेढ निर्माण न होण्यासाठी, कोणताही राज्यकर्ता असताना, समाज आनंदी कसा राहिल, यावर राज्यकर्त्यांनी काम केले पाहिजे. राज्य कशावर करतो आहे, दंगलीवर राज्य करायचे काय? गोळीबार चाललाय, अश्रूधुर चालला आहे, तर वाहा वाहा आम्ही काय राज्य करतो, असे अभिमानाने सांगणार असाल, तर राजधर्म म्हणून ते योग्य नाही", अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी फटकारले.
लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्याच आम्ही नाही म्हटलं नाही, आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही घोषणा करू, सर्व सोंग करता येतात, मात्र पैशांचे सोंग करता येत नाही. आमची परिस्थिती सुधारली की, आम्ही 2100 रुपये देऊ, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये बोलताना स्पष्ट केले. यावर थोरातांनी सरकारची आजची परिस्थिती अशी आहे की संजय निराधार योजनेच्या रकमा सुद्धा लाभार्थ्यांपर्यंत पोचत नाहीत. जो निराधार या अनुदानावर अवलंबून असतो, तो संपूर्ण महिना या रकमेवर काढतो. त्याला सुद्धा अनुदान मिळत नसेल, तर ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे, असे निराधाराला तुम्ही काही देऊ शकत नसाल, तर तुम्ही सरकार म्हणून काम करण्यास योग्य नाही, तुम्ही पालनकर्ते नाही, अशी टीका केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.