सिल्व्हर ओकवरील हल्ला : गुप्तचर यंत्रणांनी माहिती लपवली, नांगरे पाटलांना निलंबित करा...

गुप्तचर विभागाचा अहवाल सकाळ, संध्याकाळ मुख्यमंत्र्यांना दिला जातो. त्यामुळे हल्ल्याच्या घटनेचा अहवाल गुप्तचर विभागाने दिला किंवा नाही, हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे, असे ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार (Shrad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak) या बंगल्यावरील एसटी कर्मचाऱ्यांचा हल्ला पूर्व नियोजित होता. याबाबत गुप्तचर यंत्रणांनी हल्ल्याची पूर्वसूचना दिल्यानंतरही कायदा व सुव्यवस्था बघणारे मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी माहिती लपविली. त्यामुळे त्यांना निलंबित करून चौकशी करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी अकोला (Akola) येथे आज पत्रकार परिषदेत केली.

घटनेच्या चार दिवस आधीच म्हणजे एप्रिल २०२२ रोजी हल्ल्याबाबतची शक्यता वर्तविणारा सविस्तर अहवाल गुप्तचर यंत्रणांकडून सहपोलिस आयुक्तांना देण्यात आला होता. या अहवालात मुंबईतील मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा, आझाद मैदान मंत्रालय, सह्याद्री अतिथिगृह, परिवहन मंत्री अनिल परब यांचे शासकीय व वांद्रे येथील खासगी निवासस्थान या ठिकाणी एसटी कर्मचारी आंदोलन करू शकतात, असे नमूद केले होते. हा अहवाल सहपोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांना पाठविण्यात आला होता. गुप्तचर विभागाचा अहवाल सकाळ, संध्याकाळ मुख्यमंत्र्यांना दिला जातो. त्यामुळे हल्ल्याच्या घटनेचा अहवाल गुप्तचर विभागाने दिला किंवा नाही, हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे, असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री व आमदारांमध्ये सातत्याने ठिणग्या पडत आहे. त्यामुळे वैयक्तिक मतभेदांचा दुष्परिणाम सार्वजनिक ठिकाणी होतो आहे की काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अशा पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणेचा स्पष्ट अहवाल सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना मिळाल्यानंतरही त्यांनी योग्य कार्यवाही का केली नाही, असा प्रश्न करून ॲड. आंबेडकर यांनी नांगरे पाटील यांना निलंबित करून चौकशी करण्याची मागणी केली आहे. ज्यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे, त्यांच्याकडेच या घटनेची चौकशी सोपविल्याने त्यांना तातडीने चौकशी समितीच्या प्रमुखपदावरून दूर करण्याची मागणी ॲड. आंबेडकर यांनी केली.

राज ठाकरे यांची भूमिका दंगली घडविणारी..

धर्माचा प्रचार, प्रसार करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. त्यामुळे मंदिरावर भोंगे लागून हनुमान चालिसा लावल्यास कुणालाही आक्षेप नाही. मात्र, मशिदीपुढे भोंगे लावून हनुमान चालिसा लावणे ही राज ठाकरे यांची भूमिका दंगली घडविणारी आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी त्याची तातडीने दखल घेऊन राज ठाकरे यांच्यावर भादंवि अंतर्गत कारवाई करण्याची मागणी ॲड. आंबेडकर यांनी केली.

Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील तिजोरी लुटायचीय...

विजेच्या प्रश्नावरून आघाडी सरकारवर टिका..

सध्या देशातील अनेक राज्यांकडे अतिरिक्त वीज आहे. दुसरीकडे महाराष्ट्र तीन हजार ५४० मेगावॉट वीज तुटवड्यामुळे भारनियमन करीत आहे. वास्तविक नॅशनल ग्रीडमुळे आता कुठल्याही राज्याची वीज क्षणात पोचू शकते. राज्य सरकारने गुजरात, उत्तरप्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेश अशा अतिरिक्त वीज उपलब्ध असलेल्या राज्यांसोबत निगोशिएशन करून प्रश्‍न तातडीने सोडविण्याची गरज आहे. पण हे तीन पायांचे सरकार असल्याने प्रश्‍न सोडवता येत नाहीत. वीज मंत्र्यांनाच नेमका हा प्रश्‍न किती समजतो, असा प्रश्‍न ॲड. आंबेडकर यांनी उपस्थित केला.

युतीचे सर्व पर्याय खुले..

काँग्रेस असो किंवा शिवसेना, युतीसाठी आमचे पर्याय खुले असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट झाली, त्यावेळी त्यांनी युतीसंदर्भात चर्चा केली. मैत्री सर्वांनाच हवी आहे. मात्र, त्यापुढे जाण्याची कुणाची तयारी नसल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com