

Eknath Shinde Shiv Sena : अमरावतीच्या राजकारणात बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यातील संघर्ष काही नवीन नाही. एकमेकांना राजकीय शह देण्याची एकही संधी दोन्ही बाजू सोडत नाहीत.
बच्चू कडू माजी आमदार झाल्यानंतर रवी राणा आणि नवनीत राणा यांनी त्यांच्यावर सातत्याने टीकेची झोड उठवली होती. शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी उभारलेल्या आंदोलनावेळीही राणा दाम्पत्य त्यांच्यावर आक्रमक भूमिका घेताना दिसले होते.
मात्र आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करत विधान परिषदेवर आमदारकी मिळवली आहे. त्याचबरोबर शिंदे यांनी त्यांच्याकडे विदर्भातील पक्षसंघटनेची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे बच्चू कडू यांचा राजकीय प्रभाव वाढताना दिसत आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्रीपदाची संधी मिळण्याचीही चर्चा रंगली आहे.
दरम्यान, राज्यसभेच्या रिक्त जागेवरून नवनीत राणा (Navneet Rana) यांचे नाव चर्चेत असतानाच त्यांची पुन्हा एकदा निराशा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर नवनीत राणा यांची आणखी एक संधी हुकली.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नवनीत राणा यांनी राज्यातील राजकारणात सक्रिय भूमिका कायम ठेवली होती. विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपसाठीही प्रचार केला. मात्र पक्षातील काही निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून त्यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
राज्यसभेची संधी मिळावी यासाठी नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे त्यांनी सुनेत्रा पवार यांची दोनदा भेट घेतल्याने त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र अखेरीस अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांना उमेदवारी देत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.
राजेंद्र जैन यांच्या उमेदवारीची घोषणा होताच बच्चू कडू यांनी नवनीत राणांवर मिश्किल शब्दांत निशाणा साधला. नवनीत राणा या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर खासदार झाल्या. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्याने निवडून आल्या. त्यांचं मूळ काँग्रेस-राष्ट्रवादीचं आहे. राष्ट्रवादीने विचार करायला पाहिजे होता की एवढं चांगलं व्यक्तिमत्त्व पक्षाला मिळालं असतं तर चांगलंच झालं असतं. हा चान्स राष्ट्रवादीने सोडायला नव्हता पाहिजे, असा टोला बच्चू कडूंनी लगावला.
नवनीत राणा यांनी भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांना संधी मिळू शकते का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता बच्चू कडूंनी आणखी एक राजकीय बॉम्ब टाकला. काय हरकत आहे? शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्रीपदासाठी आम्ही कोणालाही घ्यायला तयार आहोत. आम्ही दोन पावलं मागे घेऊ, पण चांगली व्यक्तिमत्त्वं सोबत घ्यायलाच हवीत, असे म्हणत बच्चू कडूंनी राणा दाम्पत्याला अप्रत्यक्ष आमंत्रणच दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राज्यसभेची संधी हुकल्यानंतर नवनीत राणा यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत तर्क-वितर्क सुरू असतानाच बच्चू कडूंच्या या वक्तव्याने विदर्भाच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.