Nagpur : मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाची प्रतीक्षा करीत आहे. आता तो क्षण जवळ आला आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवरायांच्या प्रतिमेपुढे शपथ घेतलीय. अख्खं मंत्रिमंडळ त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचं पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी नमूद केलं. (Minister Abdul Sattar appeals to the Maratha community not to commit suicide)
उपराजधानी नागपूरच्या दौऱ्यावर आलेल्या सत्तार यांनी गुरुवारी (ता. २६) सांगितलं, की छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर शपथ कुणी खोटी घेऊच शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील महाराष्ट्रात आले आहेत. त्यांनाही मराठा आरक्षणासंदर्भात सविस्तरपणे माहिती आहे. सुमारे ७५ वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी थांबला आहे, असं सांगितलं जातं. आता केलेल्या श्रमाची फळं चाखण्याची वेळ जवळ आली आहे. त्यामुळे मराठा समाजातील कुणीही आत्मघाती मार्गाचा अवलंब करू नये, असं आवाहन सत्तार यांनी केलं.
कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता नव्यानं आरक्षण देताना अनेक अडचणी असतात. कायदेशीर बाबी असतात. आरक्षणाचा मुद्दा हा कायदेशीरदृष्ट्या अत्यंत किचकट आहे. त्यामुळे घाई करून उपयोग होणार नाही. मंत्र्यांना, नेत्यांना गावबंदी न करण्याचे आवाहन त्यांनी केलं. सामाजिक सुख-दु:खाच्या प्रसंगात राजकीय मंडळींना जावे लागत असते. अशात गावबंदीच्या निर्णयाचे वाद चिघळत जातो, असं मत सत्तार यांनी व्यक्त केलं.
लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन स्वातंत्र्य आहे. परंतु कुणाचाही जीव जाईल, असं पाऊल कुणीही उचलू नये असं आवाहन त्यांनी केलं. मंत्रिमंडळातील २७ मंत्री एकवटले आहेत. एकाही मंत्र्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून दुमत नाही. उलट हे आरक्षण दिलच पाहिजे यावर सर्वांचं एकमत आहे. कुणी कितीही खोडा घालण्याचा प्रयत्न केला तरी राज्य सरकारने यंदा कायमस्वरूपी टिकेल, असं आरक्षण मराठा समाजाला देण्याचा ठाम निश्चय केलाय, असा दावाही सत्तार यांनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कायदा आपलं काम करेल
आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या आधारावर सुनावणी सुरू आहे. आम्ही आमची बाजू मांडत आहोत. कायदा आपलं काम नक्कीच करेल व योग्य तो न्याय मिळेल, असा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांचं हित जपणार
सरकार शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी वचनबद्ध आहे. एमएसपीचा दर ठरवून देण्यात आलाय. कृषिमाल खरेदी होताच २४ तासांत रक्कम देण्याचे आदेश काढणार आहोत. अडत बंद करण्याचाही निर्णय सरकारनं घेतला आहे. सूतगिरण्यांची पाहणीही आपण करीत आहोत. गिरण्यांबाबत असलेल्या अडचणी माहिती करून घेणे हा त्यामागील हेतू असल्याचे सत्तार यांनी सांगितले.
(Edited by : Prasannaa Jakate)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.