नागपूर : नागपूर (Nagpur) जिल्ह्याच्या पारशिवनी तालुक्यातील गुप्ता हिंद मिनरल्स कोल वॉशरीमुळे लोकांचे जगणे अवघड झाले आहे. पिकांची तर पूर्णतः नासाडी झालेली आहे. हाती आलेल्या पिकांवर कोळशाच्या धुळीचे थर जमा झाले आहेत. पीक तर हातचे गेलेच, पण शेतीही खराब होत आहे. जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी काल प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर आंदोलन केले.
येत्या सोमवारपर्यंत कोल वॉशरी बंद करण्याचा इशारा प्रशांत पवार (Prashant Pawar) यांनी दिला आहे. तोपर्यंत ही वॉशरी बंद न केल्यास राज्याचे माजी मंत्री आमदार सुनील केदार (Sunil Kedar) ‘जय जवान’सोबत या आंदोलनात उतरणार असल्याचे पवार यांनी सांगितले. पारशिवनीत सुरू असलेल्या कोल वॉशरीमुळे सहाशे एकरातील पिके काळी पडली. वॉशरीचे पाणी जमिनीत मुरत असल्याने पाणी प्रदूषित झाले. कोळशाची वाहतूक आणि धुळीमुळे या परिसरातील गावे मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली. विशेष म्हणजे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कोल वॉशरी बंद करण्याची नोटीस बजावली होती. तसेच वीज व पाणी पुरवठा कापण्याचेही निर्देश दिले होते.
पंधरा दिवसातच प्रदूषण नियंत्रण मंडळाने वॉशरी सुरू करण्यास परवानगी दिली. ती दिल्यानंतर प्रदूषण होणार नाही, याची खातरजमासुद्धा केली नाही. आमदार आशिष जयस्वाल यांचा या वॉशरीला पाठिंबा आहे. यामुळे रोजगार उपलब्ध झाला आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली असा त्यांचा दावा आहे. पण प्रत्यक्षात अशी परिस्थिती नाही, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात सोमवारी जय जवान जय किसानचे कार्यकर्ते आणि कोल वॉशरीग्रस्त प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर धडकले. त्यामुळे अधिकाऱ्यांची फजिती झाली. सुरुवातीला अधिकाऱ्यांनी आंदोलनाला सामोरे जाण्याचे टाळले. आंदोलक कार्यालयात धडकतील, या भीतीने ते मोर्चाला सामोरे आले. पवार यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर पवार यांनी पुढील सोमवारपर्यंत वॉशरी बंद केली नाही तर आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा दिला.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी अशोक खरे यांनी काही अटी आणि शर्तींवर गुप्ता कोल वॉशरी पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली होती. पण त्या अटी आणि शर्तींचे पालन केले जात नसल्याचा आरोप प्रशांत पवार यांनी केला. त्यामुळे आता पुन्हा वॉशरीची पाहणी करण्यात येईल आणि त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल. सध्याही वॉशरीला सोमवारपर्यंतची मुदत दिली आहे. तोपर्यंत जर अटींची पूर्तता झालेली नसेल, तर पुढील निर्णय घेण्यात येईल. यापूर्वी त्यांची ५ लाख रुपयांची बॅंक गॅरंटी जप्त केल्याचे अशोक खरे यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.