ठाकरे गटाचे प्रमुख ऊध्दव ठाकरे यांनी भरसभेत शेतकर्यांच्या वीजबिल माफीच्या मागणी संबंधीची आॅडिओ क्लिप एेकवत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर 'जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगा' म्हणत खोचक टीका केली होती. आता ठाकरेंच्या त्याच टीकेवर फडणवीसांनी जोरदार पलटवार केला आहे.
बुलढाण्यातील चिखली येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह फडणवीसांवर सडकून टीका केली होती. याच टीकेला शिंदे गटातील नेतेमंडळींनी देखील आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले आहे. आता देवेंद्र फडणवीसांनी देखील ठाकरेंच्या टीकेचा टिवि्टद्वारे खरपूस समाचार घेतला आहे.
फडणवीस टिवि्टमध्ये म्हणतात, काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही...! 2019 ते 2022 या मधल्या काळातील त्यांचा शेतकऱ्यांप्रति पोकळ कळवळा महाराष्ट्राने अनुभवलाय्...जे बोलतो ते करतो, फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही...महावितरणचा हा आदेश 22 नोव्हेंबर 2022 रोजीच जारी झालेला आहे...शेतकर्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे!
या पोस्टसोबत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारचं वीज वसुलीबाबतच्या आदेशाचं परिपत्रकही जोडलं आहे. तसेच उध्दव ठाकरेंचे दोन व्हिडीओ सुध्दा फडणवीस यांनी प्रसिध्द केले आहेत.
यात पहिला व्हिडीओ हा 2019 चा असून ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयीची भूमिका मांडली होती ते दाखवलं आहे. त्यात ते 25 ते 50 हजार हेक्टरी मदतीची शेतकर्यांची मागणी मी मान्य केलेली आहे असं उद्धव ठाकरे पहिल्या व्हिडीओत म्हणतात. तर दुसऱ्या व्हिडीओत माझ्या शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 50 हजार रुपये इतकी मदत मिळालीच पाहिजे. त्यांच्या मागणीला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
आता एकमेकांचे व्हिडीओ आणि आॅडिअो क्लिप शेअर केल्यानंतर राजकीय वर्तुळात ठाकरे विरुद्ध फडणवीस असा सामना आगामी काळात पाहायला मिळणार आहे. तसेच हिवाळी अधिवेशनात देखील शेतकर्यांच्या वीजबिल माफीच्या विषयावरुन विरोधकांकडून सत्ताधार्यांना घेरले जाण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले होते ठाकरे...
बुलढाण्यातील सभेत उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची जुनी ऑडिअो क्लिप लावून त्यांचं जुनं भाषण ऐकवलं होतं. त्यात फडणवीस यांनी मध्यप्रदेश सरकारने साडेसहा हजार कोटींची तरतूद करून शेतकऱ्यांचे वीजबील माफ केलं होतं. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुध्दा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने देखील मध्यप्रदेश पॅटर्न राबवायला हवा आणि शेतकर्यांचे वीजबिल माफ करावे असं फडणवीस म्हणाले होते. आता राज्यात महावितरणने सुरु केलेल्या वीजबिल वसुलीवरुन देवेंद्रजी, जनाची नाही तर निदान मनाची लाज बाळगा अशा शब्दांत घणाघात केला होता.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.