मुंबई :" भाजप सरकार तर गंगा सफाईच्या गोष्टी करत होते परंतु त्यांच्या काळात तर बँका सफाई होत आहे. त्यामुळे ही या सरकारची मोठी नामुष्की आहे", अशी टीका आज पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी केली.
हार्दिक पटेल हे आज मुंबई काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमशी संवाद साधण्यासाठी मुंबईत आले होते.
" भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टचार होऊ देणार नाही असे ओरडून ओरडून सांगत होते. परंतु ज्या पद्धतीने विजय मल्ल्या आणि निरव मोदी देशाचे पैसे खाऊन देशाबाहेर पळून गेले. त्यावरून असे दिसते की भाजप सरकार भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देऊन या सगळ्यांना पाठीशी घालत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विजय मल्ल्या व निरव मोदी यांना भारतात कधी आणणार यावर एक शब्दही बोलत नाही," असा आरोप पटेल यांनी केला.
" भाजप सरकार तरुणांना पकोडे विकायला शिकवते. परंतु रोजगार द्यायचा विचार करत नाही. शेतकऱ्यांच्या, दलितांच्या मूलभूत गरजा व प्रश्नांचा विचार करत नाही. म्हणूनच या सरकार विरोधात लोकांना जागरूक केले पाहिजे. मी शंभर टक्के भाजप विरोधी आहे. मी काँग्रेसी नाही, परंतु काँग्रेसला मदत व पाठिंबा देणार आहे. यासाठी मी वारंवार मुंबईत येत राहणार आहे. त्यासाठी हे सरकार मला त्रास देईल. अनेक अडचणी निर्माण करेल. परंतु मी न घाबरता हे काम सुरूच ठेवणार आहे, "असेही पटेल यांनी यावेळी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.