मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्याला (सीएए) महाराष्ट्राच्या विधानसभेचा पाठिंबा घेण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी तुमच्या पाठिंब्यावर बिहारमध्ये सरकार चालवणाऱ्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा या कायद्याला पाठिंबा मिळवून दाखवा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला दिले आहे. 'कॅग' अहवालावरुन लक्ष हटवण्यासाठी भाजप नागरिकत्व कायद्याचा मुद्दा आणू पहात असल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
सीएए, एनआरसीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये असलेल्या मतभेदांचा फायदा घेण्याचा भाजप प्रयत्न करत आहेत. नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावर सरकारने आपली भूमीका स्पष्ट करावी, असा आग्रह भाजपने धरला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा या कायद्याला विरोध आहे.
याबाबत नवाब मलिक म्हणाले, "हा कायदा केंद्राचा आहे. त्याची अंमलबजावणी केंद्र सरकारने करावी. हा प्रस्ताव महाराष्ट्राच्या विधीमंडळात आणून उपयोग नाही. या कायद्याला देशातला मोठा वर्ग विरोध करतो आहे. पण भाजप ते मानायला तयार नाही. या कायद्याचा राज्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे या विषयावर भाजपने राजकारण करु नये.''
''फडणवीस सरकारच्या काळातील निर्णयांवर 'कॅग'ने ताशेरे मारले आहेत. सिडकोमध्ये अडीच हजार कोटी रुपयांच्या घोटाल्याचा कॅगचा ठपका आहे. त्यावरुन सभागृहात अडचण होऊ नये म्हणून भाजप नागरिकत्व कायद्याचा मुद्दा पुढे करण्याचा प्रयत्न करत आहे,'' असा आरोपही मलिक यांनी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.