पुणे : 23 वर्षीय महिलेचे अपहरण केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी साताऱ्यातील नऊ जणांना अटक केली आहे. रविवारी पहाटे उशीरा काही तासातच सदर महिलेची पोलिसांनी टोलनाक्याजवळ सुटका केली आहे.
या प्रकरणी दत्तात्रय रामचंद्र भोईटे (वय 34), संदीप किसन जाध व (वय 28), अक्षय कृष्णा दीक्षित (26), राहुल बाळासाहेब बरकडे (वय 27), सागर अनिल कोळेकर (23), मंगेश राजाराम खांडजोडे (18), शुभम नवनाथ बरकडे (20), मंगेश रमेश शिंदे (वय 21) आणि किरण दिलीप बाबर (वय 23) सर्व (रा. सातारा) असे नऊ जणांना अटक केली आहे.
या महिलेच्या 27 वर्षांच्या सहकाऱ्यांने याबाबत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजता पुण्यातील सेनापती बापट रस्त्यालगत असलेल्या आयसीसी टॉवरजवळ आपल्या सहकाऱ्यासमवेत सदर महिला उभी होती. त्यावेळी एमएच ११ नोंदणी असलेल्या चारचाकीतून आलेल्या दोघांनी स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे सांगितले.
तसेच फिर्यादीसह महिलेला गाडीत बसण्यास जबरदस्ती केली. तेथून ते त्यांना कात्रज घाटात घेऊन गेले. परंतू महिलेसोबतच्या युवकाला तेथेच सोडून ते साताऱ्याकडे गेले. संबंधित युवकाने तातडीने पोलिसांशी संपर्क साधून घडलेली घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने साताऱ्याच्या दिशेने गेलेल्या गाडीचा मागोवा घेतला. त्यावेळी ती गाडी सातारा नजीकच्या टोलनाक्याकडे गेल्याचे समजले.
त्यानंतर पोलिसांनी तातडीने या गाडीचा मागोवा काढत गाडी अडवून दोघांना ताब्यात घेतले आणि यांच्यासोबतच्या महिलेची सुटका केली. तातडीने नाकाबंदी करून जवळच्या पोलिस ठाण्यास संपर्क केल्यामुळे तातडीने गाडी अडविली, त्यामुळे सदर महिलेची आम्ही सुटका करू शकलो, असे पुणे विभागाचे उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले. अपहरणाचे कारण पोलिसांनी स्पष्ट केलेले नाही. या अपहरणकर्त्यांवर चतुरश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.