मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस बलात्कारप्रकरणी एसआयटी नेमण्याची घोषणा केली आहे. मात्र, यापूर्वीच्या काही प्रकरणांत त्यांनी नेमलेल्या एसआयटी चौकशीमधून काहीही निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे एसआयटीचा खेळ करण्यापेक्षा त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते रामकिशोर त्रिवेदी यांनी केली आहे.
हाथरस दौऱ्यावर निघालेले राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचाही त्यांनी निषेध केला असून याबाबत कारवाईची मागणीही केली आहे. हाथरसच्या पिडीत मुलीला न्याय देण्याऐवजी मुख्यमंत्री योगी हे सर्व प्रकरण थंड बस्त्यात टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठीच या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशचे गृहमंत्रीदेखील असलेले आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशातील मुलींचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहेत, असेही प्रवक्त्यांनी म्हटले आहे. योगी आदित्यनाथ सत्तेवर असेपर्यंत हाथरसच्या त्या मुलीच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणारच नाही. किंबहुना एसआयटी नेमूनही तिला न्याय मिळणार नाही, त्यासाठी आदित्यनाथ यांनी राजीनामाच दिला पाहिजे.
त्या मुलीच्या मारेकऱ्यांना अटक करण्याऐवजी पोलिसांनी गुपचूप तिच्यावर रात्री अंत्यसंस्कारही करून टाकले. स्वतंत्र भारताच्या इतिहासात सत्तेचा असा गैरवापर कोणीही केला नव्हता, अशी टीकाही त्रिवेदी यांनी केली. यापूर्वीही जन्माष्टमीच्या दिवशी मोठ्याप्रमाणावर झालेल्या वीजकपाती संदर्भात चौकशीसाठी योगी यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले होते.
पाटीदार-मोहाबा प्रकरणीही त्यांनी एसआयटी नियुक्त केली होती. कोरोना किट घोटाळ्याची चौकशी करण्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी हाच मार्ग वापरला होता. त्याचा दहा दिवसांत अहवाल अपेक्षित होता. मात्र, यापैकी कशातूनही ठोस असे काहीही निष्पन्न झाले नाही, असेही प्रवक्त्यांनी दाखवून दिले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.