आढळराव चौकाराच्या तयारीत; राष्ट्रवादीत शांतता! 

राष्ट्रवादी हा शिरूर लोकसभामतदारसंघातील प्रबळ पक्ष असला तरी लोकसभेला कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत अद्याप काहीच हालचाल दिसून येत नाही. पक्षाच्या अनेक कार्यकर्ते आणि आजीमाजी आमदारांनीही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे याबाबत चर्चाकेली होती. आढळराव आधीपासून तयारी करतात. त्यामुळे राष्ट्रवादीनेही उमेदवार आधीच जाहीर करून तगडे आव्हान उभे करावे, अशी या कार्यकर्त्यांची सूचना आहे.
आढळराव चौकाराच्या तयारीत; राष्ट्रवादीत शांतता! 

पुणे : शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज झाले आहे. मात्र, त्यांच्या विरोधात कुणाला उमेदवारी द्यायची याचीच चाचपणी अजून विरोधी पक्षाकडून सुरू आहे. विशेषतः राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी ही लढाई महत्त्वाची असतानाही पक्षाने उमेदवारीचे संकेत दिलेले नाहीत. त्यामुळे नेहमीप्रमाणे आढळराव यांनी आपल्यासमोर लढायला कोणी नाही, असा दावा करत आधीच हवा पेटविण्यास सुरवात केली आहे. 

लोकसभा निवडणूक नऊ महिन्यानंतर होणार आहे. मात्र, आढळराव पाटील यांनी उमेदवारी निश्‍चित असल्याने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. मध्यंतरी त्यांनी कोकणात मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांचा अभ्यास दौरा घेतला. त्यानंतर त्यांनी आता गावभेट दौरे सुरू करून विकासकामांचा धडाका लावला आहे. यानिमित्त ते मतदारांशी संपर्क साधत आहेत. विरोधकांच्या तंबूत शांतता असताना आढळराव यांनी लोकसभेसाठी प्रचाराचा नारळच एक प्रकारे फोडला आहे. 

ते भाजपमध्ये जाणार अशी आवई उठली होती. मात्र, त्यांनी शिवसेनेचीच उमेदवारी गृहीत धरून काम सुरू केले आहे. (अर्थात त्यांचे हा राजकीय धोरणीपणा नेहमीचा असतो. ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार, अशी अफवा निवडणुकीच्या आधीपर्यंत सुरू असते, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे विरोधक गहाळ राहतात. आढळराव तोपर्यंत मतदारसंघाची बांधणी करून घेतात.) त्यानुसार आताही आढळरावांनी गावभेट दौरा आणि विकासकामांची उद्घाटने करण्याचा सपाटा लावला असताना विरोधकांच्या तंबूत शांतता आहे. 

राष्ट्रवादी हा या मतदारसंघातील प्रबळ पक्ष असला तरी लोकसभेला कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत अद्याप काहीच हालचाल दिसून येत नाही. पक्षाच्या अनेक कार्यकर्ते आणि आजीमाजी आमदारांनीही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे याबाबत बोलणी केली होती. आढळराव आधीपासून तयारी करतात. त्यामुळे राष्ट्रवादीनेही उमेदवार आधीच जाहीर करून तगडे आव्हान उभे करावे, अशी या कार्यकर्त्यांची सूचना आहे. मात्र त्याकडे अद्याप लक्ष दिले गेलेले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसची या मतदारसंघात चांगली ताकद आहे. पक्षाने आताच कोण उमेदवार असणार असे संकेत जरी दिले तरी इच्छुकांना मतदारसंघात संपर्क साधणे शक्‍य होईल, असा कार्यकर्त्यांचा दावा आहे. 

या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे बलिष्ठ नेते व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या एकसष्टीच्या समारंभात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना दिल्लीत या असे सुचवले होते. परंतु, त्यांनी ते मनावर घेतलेले नाही. त्यामुळे आढळराव यांच्यापुढे मागील निवडणुकीप्रमाणेच ऐनवेळी कोणाला तरी उभे केले जाण्याची शक्‍यता आहे. 

शिवसेना व भाजप यांची युती मागील निवडणुकीत होती. यंदा ती तुटल्यास भाजपलाही उमेदवार द्यावा लागणार आहे. त्यादृष्टीने भाजपने पावले टाकली आहेत. आमदार महेश लांडगे यांनी सुरवातीला उत्सुकता दाखवली. मात्र त्यांनीही अजून या उमेदवारीसाठी फारसा जोर लावलेला दिसत नाही. त्यामुळे त्यांचेही अद्याप दिल्ली की मुंबई, याबाबत त्यांचे तळ्यात-मळ्यात सुरू असल्याचे सांगण्यात येते. 

आढळराव यांनी या मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक केली आहे. सन 2004 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे अशोक मोहोळ यांचा पराभव केला. सन 2009 मध्ये विलास लांडे यांना मात दिली. तर सन 2014 मध्ये देवदत्त निकम यांचा पराभव केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद पाहता आढळरावांचा पराभव करणे पक्षासाठी अवघड नाही. पण तयारीत पक्ष कमी पडत असल्याचा कार्यकर्त्यांचा अनुभव आहे.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com