

Ajit Pawar News : शिरुर तालुक्यातील हजारो जणांचा कामधेनु असलेला घोडगंगा साखर कारखाना जवळपास 4 वर्षांनंतर पुन्हा सुरु होण्याच्या मार्गावर आहे. दिवंगत अजित पवार यांनी यासंबंधीची फाईल मार्गी लावील होती, त्यानंतर ही फाईल पुढे सरकली असून सध्या एनसीडीसीकडे अंतिम मंजुरीच्या प्रक्रियेत आहे, अशी माहिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी स्वतः माजी आमदार अशोक पवार यांनी दिली आहे.
अशोक पवार म्हणाले, ‘‘घोडगंगा साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याची क्षमता फक्त माझ्यात आहे,’ असे दिवंगत अजित पवार म्हणाले होते. आज त्यांच्या प्रयत्नांमुळेच आचारसंहिता संपल्यानंतर कारखान्यासंबंधी फाईल अंतिम मंजुरीसाठी पुढे सरकली आहे. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून कर्ज मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कारखान्याचे पुनरुज्जीवन म्हणजे स्व. अजित पवार यांना खऱ्या अर्थाने वाहिलेली श्रद्धांजली ठरेल, ’’
‘‘कै. रावसाहेबदादा पवार यांनी आपल्या आयुष्यभराच्या कष्टातून उभा केलेला घोडगंगा कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय व आर्थिक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्व. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरीने संबंधित प्रस्ताव दिल्ली येथे पाठविला असून, तो सध्या एनसीडीसीकडे अंतिम मंजुरीच्या प्रक्रियेत आहे, असेही त्यांनी सांगितले.
या प्रक्रियेत ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही सहकार्य केले आहे. आचारसंहिता संपल्यानंतर फेब्रुवारीत कारखान्यासाठी आवश्यक निधी मंजूर होण्याची शक्यता आहे. कर्ज मंजूर झाल्यानंतर 2 महिन्यांत कामगारांचे प्रलंबित पगार, कारखान्याची देखभाल- दुरुस्ती, तसेच आगामी ऊसगाळपाचे नियोजन करण्यात येणार असून, मेअखेरीस कारखाना गाळपासाठी पूर्णतः सज्ज असेल.’’ असेही पवार यांनी सांगितले.
याबाबत घोडगंगा साखर कारखान्याचे कर्मचारी संदीप फराटे म्हणाले, कामगारांच्या आंदोलनाला संपूर्ण मदत करण्यामागे विरोधकांचा केवळ राजकीय स्वार्थ होता, ही बाब आता कामगारांच्या लक्षात आली आहे. कारखाना दीर्घकाळ बंद राहिल्याने अनेक कामगारांची कुटुंबे रस्त्यावर आली, मात्र आता कामगारांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून, घोडगंगा साखर कारखाना येत्या काही दिवसांत अशोक पवार यांच्या ठोस प्रयत्नांमुळेच सुरू होईल.
‘घोडगंगा साखर कारखाना सुरू करू, ’ असे खोटे आश्वासन देत विरोधकांनी कामगारांची फसवणूक केली. विधानसभा निवडणुकीपुरता कामगारांचा वापर केला. निवडणूक संपताच आश्वासने हवेत विरघळली आणि आज कामगार रस्त्यावर आला. वापर करणाऱ्यांना कामगार कदापी माफ करणार नाहीत. कामगारांनी भूलथापा ओळखून सुजाता पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे, असे दुसरे कर्मचारी महेंद्र काशीद यांनी सांगितले.
कामगार नेते महादेव मचाले म्हणाले, विरोधकांच्या सांगण्यावरून आम्ही घोडगंगा कारखान्याच्या प्रश्नावर गावोगावी फिरलो, हीच आमची कामगार म्हणून सर्वांत मोठी चूक ठरली. कामगारांच्या संपाला जाहीर पाठिंबा देणाऱ्या नेत्यांनी तब्बल दीड वर्ष आमच्याकडे दुर्लक्ष केले. आज सर्व कामगारांची परिस्थिती बिकट आहे. घोडगंगा कारखाना अशोक पवार हेच सुरू करू शकतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.