Never Claimed Ministry to MahaVikasAghadi Claims Raju Shetty
Never Claimed Ministry to MahaVikasAghadi Claims Raju Shetty

महाविकास आघाडीत मंत्रीपद मागितले नव्हते : राजू शेट्टी (व्हिडिओ)

महाविकास आघाडीचा आम्ही एक घटक आहोत, मात्र असे असले तरी आम्ही कधीही त्यांच्याकडे मंत्रीपद किंवा सत्तेतील वाटा मागितला नाही, असा खुलासा राजूशेट्टी यांनी बारामती येथे बोलताना केला

बारामती : महाविकासआघाडीमध्ये आम्ही कधीच मंत्रीपद मागितलेले नव्हते, मात्र माध्यमातून तशा बातम्या पेरल्या गेल्या, शपथविधीला निमंत्रण देण्याची सहिष्णुता तिन्ही पक्षांनी दाखविली नाही, असे असले तरी भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच उदभवत नाही, असा खुलासा खासदार राजू शेट्टी यांनी केला. बारामतीत आज पत्रकारांशी ते बोलत होते. 

महाविकासआघाडीने फसवले आहे का आणि या नंतर आपण भाजपसोबत जाण्याचा विचार करता आहात का, असा प्रश्न विचारल्यानंतर राजू शेट्टी यांनी हा खुलासा केला. ते म्हणाले, ''भारतीय जनता पक्ष ज्या पध्दतीने राजकारण करतो आहे, त्यांना विरोध करण्यासाठी आम्ही त्यांच्या विरोधी भूमिका घेतली होती, भाजप सातत्याने शेतकरी विरोधी धोरण राबवित आहेतच, त्याचसोबत समाजात दुही निर्माण करण्याचेही काम त्यांच्याकडून होत आहे. जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत देशात फॅसिझम आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, म्हणून त्यांना विरोध करतो आहोत.'' 

ते पुढे म्हणाले, "महाविकास आघाडीचा आम्ही एक घटक आहोत, मात्र असे असले तरी आम्ही कधीही त्यांच्याकडे मंत्रीपद किंवा सत्तेतील वाटा मागितला नाही, असा खुलासाही शेट्टी यांनी केला. किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी व्हायला हवी हाच आमचा आग्रह होता. शपथविधीला साधे निमंत्रणही दिले नाही या बाबत आम्ही नाराज आहोत.'' मात्र याचा अर्थ आम्ही भाजपसोबत जाणार असा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत आम्ही अजिबात समाधानी नाही असे सांगून शेट्टी म्हणाले, ''सात बारा कोरा करण्याची ग्वाही निवडणुकीदरम्यान दिली गेली, प्रत्यक्षात मात्र त्यांची ही घोषणा वस्तुस्थितीला धरुन नाही, जी कर्जमाफी जाहीर झाली, त्यात जे आश्वासन दिले होते ते कोठेही दिसत नाही. केवळ थकीत पीककर्ज माफ करण्याचा निर्णय आम्हाला मान्य नाही. अटी व निकष पाहता सात हजार कोटींवर ही कर्जमाफी जात नाही. दोन टप्प्यात कर्जमाफीची भूमिका सरकारने घेतली आहे, एक वेळ त्या बाबत चर्चा करण्याची शेतक-यांची तयारी आहे, मात्र पहिल्या टप्प्यात सरसकट पीककर्ज माफ करायला हवे. पीकच हातातून गेल्यावर त्या पिकावर काढलेले कर्ज शेतकरी कोठून भरणार, ज्या पिकांच महापूर व पावसाने नुकसान झाले आहे, त्यांचे कर्जमाफ झाले तरच शेतक-यांना दिलासा मिळेल.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com