लग्नपत्रिकांवर नेत्यांची नावे नकोत - नेत्यांच्या विवाहसोहळ्यांतल्या उपस्थितीबाबत आचारसंहिता

विवाह सोहळ्यांना नेत्यांच्या उपस्थितीसाठी ताटकळणारे वधू-वर आणि त्यांचे सगेसोयरे, या नेत्यांच्या मोटारींच्या ताफ्यांमुळे होणारी वाहतुकीची कोंडी याला हळूहळू लोक कंटाळायला लागले आहेत. लग्न सोहळ्यांमध्ये होणाऱ्या अशा प्रकारांमुळे होणाऱ्या दिरंगाईला आळा> घालण्यासाठी पूर्व हवेलीमधील तरुणांनी एकत्र येऊन आदर्श आचारसंहिता तयार करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
लग्नपत्रिकांवर नेत्यांची नावे नकोत - नेत्यांच्या विवाहसोहळ्यांतल्या उपस्थितीबाबत आचारसंहिता

लोणी काळभोर : विवाह सोहोळ्यांना जाताना राजकीय नेत्यांनी वेळेचे बंधन पाळावे, आपल्यामुळे वऱ्ङाडी मंडळींना ताटकळत बसायला लागू नये याची काळजी घ्यावी, लग्नपत्रिकांवर नेत्यांची नांवे न छापता केवळ वधू-वरांच्या कुटुंबातील व्यक्तींचीच नांवे छापावीत.....या सूचना आहेत नेते मंडळींच्या विवाह सोहळ्यांतील उपस्थितीबाबत होऊ घातलेल्या आदर्श आचारसंहितेतल्या... 

....विवाह सोहळ्यांना नेत्यांच्या उपस्थितीसाठी ताटकळणारे वधू-वर आणि त्यांचे सगेसोयरे, या नेत्यांच्या मोटारींच्या ताफ्यांमुळे होणारी वाहतुकीची कोंडी याला हळूहळू लोक कंटाळायला लागले आहेत. लग्न सोहळ्यांमध्ये होणाऱ्या अशा प्रकारांमुळे होणाऱ्या दिरंगाईला आळा घालण्यासाठी पूर्व हवेलीमधील तरुणांनी एकत्र येऊन आदर्श आचारसंहिता तयार करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. 

कदमवाकवस्ती (ता. हवेली, जि. पुणे) येथील तरुणांनी रविवारी एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. आमदार बाबूराव पाचर्णे, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, बाजार समितीचे माजी सभापती प्रतापआण्णा गायकवाड, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष माधव काळभोर, साधना सहकारी बँकेचे संचालक सुभाष काळभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर, माजी बांधकाम आरोग्य सभापती मंगलदास बांदल, पंचायत समिती सदस्य अनिल टिळेकर, युगंधर काळभोर यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी, महिला कार्यकर्त्या, तंटामुक्ती समित्या, सामाजिक संस्था व लग्न समारंभाशी सबंधित व्यक्ती उपस्थित होते. पूर्व हवेली विचार मंचाच्या वतीने कमलेश काळभोर, राकेश काळभोर, शिवदीप उंद्रे, रामदास हरगुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या चर्चासत्राचे आयोजन केले होते.  

लग्न समारंभासाठी येणाऱ्या नेतेमंडळींच्या भाषणांमुळे समारंभात होणारी दिरंगाई व त्यामुळे आलेल्या पाहुण्यांच्या वेळेचा अपव्यय, महामार्गावर पार्किंग होणाऱ्या दुचाकी व चारचाकी गाड्यांच्या पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी, अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. लग्नसोहळ्यामध्ये होणारी दिरंगाई टाळण्यासाठी सोहळ्यामध्ये येताना राजकारण्यांनी वेळेचे बंधन व आलेल्या पाहुण्यांच्या मानसिकतेचा विचार करणे गरजेचे असल्याचे मत आमदार बाबुराव पाचर्णे यांनी व्यक्त केले.  


लग्नसोहळ्यातील बदलांसाठी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांनी सुचविलेले आचारसंहितेचे मुद्दे 

>साखरपुडा घरीच करावा किंवा साखरपुड्यात लग्न केल्यास उत्तम

>लग्नपत्रिका छापताना पुढाऱ्यांच्या नावापेक्षा घरातील मंडळींची नावे असावीत किंवा पत्रिका न छापता लग्नाच्या आमंत्रणासाठी सोशल मिडीयाचाच वापर करावा.

>लग्नसोहळ्यामध्ये केवळ कुटुंबातील प्रमुखांनी प्रवेशद्वारावर पाहुण्याचे स्वागत करावे.

>पुरोहितांनी वेळेत लग्नसोहळा उरकण्यासाठी प्रयत्न करावेत.

>जावई, मामा सन्मान, नेतेमंडळींचा सत्कार, आशिर्वाद व वैयक्तिक स्वागत टाळून वेळ वाया जाणार नाही याकडे लक्ष द्यावे.

>लग्न सोहळ्यासाठी कार्यालयात जाताना आपल्या वाहनांमुळे इतरांना किवा रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी होणार नाही याकडे लक्ष द्यावे.

सामुदायिक विवाह सोहळ्यांना प्राधान्य द्या
विवाह सोहळ्यामध्ये होणारा अनाठाई खर्च टाळून नवविवाहितांच्या भविष्यासाठी त्या पैशाचा उपयोग करावा. सध्या लग्नकार्यात पुढाऱ्यांच्या भाषणांमुळे सोहळ्यात होणारी दिरंगाई कमी करण्यासाठी पुढाऱ्यांनी स्वत: बदलण्याची गरज आहे. तसेच वैयक्तिक विवाह सोहळ्यापेक्षा सामुदायिक विवाह सोहळ्यांना प्राधान्य देणे गरजेचे बनले आहे. येत्या दिवाळीमध्ये भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे नियोजन करणार आहे.
 
- प्रदिप कंद, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद पुणे

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com