औरंगाबाद ः कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासकीय रुग्णालयाला भाजपचे आमदार अतुल सावे यांनी ३८ खाटा भेट देत मदतीचा हात दिला. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, नाशिक नंतर सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे औरंगाबाद जिल्ह्यात आढळून आले आहेत. साडेतेरा हजारावर कोरोनाचे रुग्ण आतापर्यंत म्हणजे मार्चपासून आढळून आले, तर साडेचारशेहून अधिक रूग्णांना कोरोना संसर्गामुळे आपले प्राण गमवावे लागले.
राज्य सरकारने कोरोना संकटाच्या काळात आमदार, खासदारांना त्यांचा स्थानिक निधी या महामारीच्या उपयायोजना व वैद्यकीय यंत्रसामुग्री साधनांवर खर्च करण्याची परवानगी दिली आहे. त्यानूसार औरंगाबाद पुर्वचे भाजप आमदार अतुल सावे यांनी आज शासकीय रुग्णालयात (घाटी) ३८ खाटा दिल्या.
राज्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा मराठवाड्यातील सर्वाधिक प्रादुर्भाव जाणवला. जिल्हा प्रशासन, महापालिका व आरोग्य यंत्रणा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत असले तरी त्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे.
त्यात शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटी व चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. या शिवाय घाटी रुग्णालयात इतर आजारांवर उपचार घेण्यासाठी मराठवाडा, खान्देश व विदर्भातून हजारो रुग्ण येत असतात. अनेकदा रुग्णांची संख्या जास्त आणि खाटा कमी अशी परिस्थिती निर्माण होते.
अशा वेळी रुग्णांवर जमीनीवर, रुग्णालयांच्या वऱ्हांड्यात गाद्या टाकून उपचार करावे लागतात. घाटी रुग्णालयात असे चित्र अनेकदा पहायला मिळाले. लोकप्रतिनिधी आपापल्या स्थानिक निधीतून अनेकदा घाटीला स्ट्रेचर, ॲम्ब्युलन्स, खाटांची मदत करत असतात. कोरोनाच्या संकटात तर अशा प्रकारच्या मदतीची नितांत आवश्यकता असते.
भाजपचे आमदार अतुल सावे हे घाटीच्या अभ्यागत समितीचे अध्यक्ष देखील होते. त्यामुळे येथील समस्या, रुग्णांचे होणारे हाल याची चांगलीच जाण आहे. त्यामुळे कोरोना संकटात आपल्या स्थानिक निधीचा योग्य वापर करत त्यांनी घाटी रुग्णालयासाठी आज ३८ खाटा उपलब्ध करून दिल्या. खासदार डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्याकडे या खाटा सोपवण्यात आल्या.
पंधरा कोटींचा निधी मिळणार..
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी घाटीतील समस्यांवर चर्चा झाली. घाटीला ३० कोटी पैकी शिल्लक असलेला १५ कोटींचा निधी तात्काळ द्यावा, अशी मागणी घाटी प्रशासन व जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केली होती.
या शिवाय घाटीच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलसाठी डॉक्टर व इतर पदांना मान्यता देऊन तिथे उपचार सुरू करण्यात यावे, या मुद्यावरही चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व वित्त मंत्री अजित पवार यांच्यांशी चर्चा करून लवकरच घाटीचा उर्वरित निधी व पद मान्यतेवर निर्णय घेण्यात येणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.