यवत : " लहानपणी गावात देवळाच्या भिंत्तीवर रंगवलेल्या चित्रात विठ्ठलाच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या अठरापगड जातीच्या संतांचे चित्र पाहिले होते. आज समाजात जातीपातीचे विष कालवले जात असताना त्या चित्राची आठवण होते. या अठरापगड जाती एकत्र आल्याशिवाय विठ्ठल पावणारच नाही,'' अशी भावना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलबन-डाळिंब (ता. दौंड) येथील विठ्ठलाची महापूजा खासदार डॉ. कोल्हे यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, अशोक पवार, सभापती ताराबाई देवकाते, वैशाली नागवडे, राजेंद्र कांचन, के. डी. कांचन, महादेव कांचन, पूनम दळवी, सुशांत दरेकर, नितीन दोरगे, तात्यासाहेब ताम्हाणे, तहसीलदार बालाजी सोमवंशी, गटविकास अधिकारी गणेश मोरे, अशोक फरगडे, एल. बी. कुंजीर, सरपंच वनिता धीवर उपस्थित होते.
कोल्हे म्हणाले, " यादव साम्राज्यानंतर महाराष्ट्रात प्रभावी राजा नव्हता. या काळात भागवत धर्माच्या भगव्या पताकांनी येथील लढवय्यांची मूठ आवळून ठेवली. या मुठीत जिजाऊ-शिवबाने अलगद तलवारी ठेवल्या आणि स्वराज्य उभे राहिले.''
कुल म्हणाले, " डॉ. कोल्हे यांनी अभिनेता म्हणून संभाजीराजे घराघरांत पोचविले. आता खासदार म्हणून ते घराघरांतील प्रश्न संसदेत पोचवतील.''
माजी आमदार थोरात, पवार यांचेही या वेळी भाषण झाले. या वेळी देवस्थानला मदत करणाऱ्या दानशूर भाविकांचा खासदार कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एकादशीमुळे डाळिंबला जत्रेचे स्वरूप आले होते. देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी प्रास्ताविक केले. एल. बी. कुंजीर यांनी सूत्रसंचालन केले. शंकर कासेकर यांनी आभार मानले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.