नागपूर : ड्रग्ज तस्करांनी आपले जाळे व्यापक प्रमाणावर पसरविले आहे. आपल्या पोलिसांनी केवळ मुंबई आणि महाराष्ट्रातच नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊनही ड्रग्ज तस्कराच्या मुसक्या आवळल्या आहेत, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आज म्हणाले.
एका कारवाईत हिमाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा साठा पकडण्यात आला आहे. तेथूनच मुंबईत ड्रग्जचा पुरवठा केला जातो, अशीही माहिती आहे. मुंबईत सिनेनगरी असल्याने येथे मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा व्यवसाय फोफावला असल्याचेही सांगितले जाते. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर गृहमंत्री देशमुख म्हणाले की, मुंबई पोलिस, महाराष्ट्र पोलिस आणि एटीएस ड्रग्जच्या बाबतीत चांगले काम करीत आहे. महाराष्ट्राच्या बाहेरही यासंबंधीचे व्यवहार होतात. त्यामुळे राज्याच्या बाहेर जाऊनही महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई केलेली आहे.
ज्या राज्यांतून मुंबईमध्ये ड्रग्जच्या खेपा येतात, त्या राज्यांमध्ये जाऊन महाराष्ट्र पोलिसांनी ड्रग्ज माफियांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ड्रग्जच्या बाबतीत केवळ मुंबईला बदनाम करणे योग्य नाही. यापुढे अधिक कठोर कारवाई करण्याचे आदेश मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांना दिले असल्याचेही गृहमंत्र्यांनी सांगितले. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर सिनेसृष्टी आणि ड्रग्ज माफियांमधील संबंधांबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर राज्यातील ड्रग्जचा व्यवसाय उलथवून लावण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली होती.
राज्यातील ड्रग्जचे धंदे उलथवून लावण्यासाठी ज्या राज्यांतून येथे ड्रग्जच्या खेपा येतात, त्या राज्यांवर महाराष्ट्र पोलिसांनी आपले लक्ष केंद्रित केले होते. त्यानंतर मोठमोठ्या कारवाया पोलिसांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. यापुढेही या व्यवसायाला आळा घालण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असे गृहमंत्री देशमुख म्हणाले.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.