कऱ्हाड : वारीला बंदी म्हणजे हिंदुस्थानच्या श्वासालाच बंदी घातल्यासारखे आहे. वारीबाबत राज्य शासनाची कृती दुर्योधन व दुःशासनासारखीच आहे, असा आरोप शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी केला. बंडातात्या कऱ्हाडकर यांनी स्थानबद्ध करण्यासह वारीला बंदी घातल्याबद्दलचा निषेध मोर्चा आज कराडात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे काढण्यात आला. Government's action regarding Wari is similar to Duryodhana's misrule: Sambhaji Bhide
दत्त चौकातून मोर्चा थेट तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी संभाजी भिडे, के. एन. देसाई, सागर आमले, केदार डोईफोडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ज्ञानोबा तुकारामाच्या गजरासह छत्रपती शिवराय व छत्रापती संभाजी महाराज यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
हेही वाचा : ओबीसी आरक्षणासाठी सरकारने चौदा महिने काय केले?
तहसीलदार कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर तेथे तहसीलदार अमरदीप वाकडे, नायब तहसीलदार विजय माने, पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील मोर्चाला सामोरे गेले. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे त्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर श्री. भिडे यांनी मनोगत व्यक्त केले. वारीला बंदी घालून शासनाने मोठे अपराधी कृत्य केले आहे, असे सांगून श्री. भिडे म्हणाले, सरकार चालवणारे उद्धव ठाकरे, अजित पवार व डॉ. विश्वजित कदम अत्यंत चांगली माणसे आहेत. ते शासन चालवत आहेत.
आवश्य वाचा : गेहलोत अन् पायलट यांच्यासाठी उद्याचा दिवस महत्वाचा!
पण ते चुकले आहेत. आपण त्यांना क्षमा करू या. मात्र चुक त्वरीत दुरूस्त केली पाहिजे. बंडातात्यासारखा संत सध्या मिळत नाहीत, तयार होत नाहीत. संत पावले साजरी.. या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे वारी होणारच. मात्र आत त्याला बंदी आहे. त्याचा वेगळ्या पद्धतीने निषेध करायला हवा. ज्या ज्या गावात वारीचा मुक्काम असतो. त्या गावात आजूबाजूच्या गावातील लोकांनी एकत्र येवून मुक्कामच्या दिवशी त्या मुक्काम स्थळी येवून त्यांना आदरांजली वाहू या. एकादशी दिवशी प्रत्येक गावात विठ्ठलाची आरती करायला हवी.
यावेळी शासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले की, दीड वर्षांपासून कोरोना महामारीमुळे होरपळलेल्या राज्याला व्यवस्था राखण्यासाठी, कोरोना कमी होण्यासाठी सर्व जनता सहकार्य करीत आहे. प्रशासनाचे सर्व निर्बंध सचोटीने पाळत आहे. मागील वर्षी आषाढी कार्तिकीच्या पायी दिंडी सोहळ्याला शासनाने बंधने घातली आणि पायी दिंडी सोहळा रद्द केला. परिस्थिती पाहता हिंदू बांधवांनी तो निर्णय मान्य केला.
परंतु यावर्षी 2021 मध्ये लसीकरण हा पर्याय उपलब्ध असताना व प्रशासनाचे सर्व नियम अटी शर्ती पाळून काही निवडक वारकऱ्यांसह पायी वारी व्हावी ही परंपरा, खंडीत होऊ नये म्हणून बंडातात्या कराडकर यांनी प्रयत्न केले. मात्र प्रशासनाने त्यांना अटक करून त्यांना स्थानबद्ध केले आहे. पंढरपूर निवडणूक, पुण्यात राजकीय कार्यालयाचे उद्घाटन, मुंबईमध्ये मेट्रोत गर्दी, साखर कारखान्याची निवडणूक, वाढदिवसाला असे सगळ चालते.
मात्र भक्तीभावाने हिंदू धर्मातील धार्मिक परंपरा चालत नाही. ती खंडित करण्याचा शासनास कोणताही अधिकार नाही. शासनाची प्रजेसाठीजी कामे आहेत, ती शासन करत नाही. परंतु हिरहिरीने हिंदू धर्मातील प्रथा परंपरा पालन करणे यासाठी अटकाव-निर्बंध करणे हेच शासनाचे कार्य झाले आहे, म्हणून आम्ही शासनाचा जाहीर निषेध करत आहोत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.