गृहमंत्र्यांनी ऊर्जा खात्याच्या भरतीमधील भ्रष्टाचाराची चौकशी करावी : प्रवीण कुंटे
नागपूर : भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळात ऊर्जा खात्यामध्ये झालेल्या भरती प्रक्रियेत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी केला आहे. तेव्हाचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यावेळची भूमिका संशयास्पद राहिलेली आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी कुंटे पाटील यांनी केली आहे.
सन २०१७ मध्ये भरती प्रक्रिया झाली होती. त्यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. त्यांच्या इच्छेने भरती प्रक्रियेत घोटाळा झालेला आहे. मुख्य अभियंत्यांची तीन पदे भरण्यात येणार होती. यासाठी स्थापन केलेल्या निवड समितीमध्ये माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विपिन श्रीमाळी, कार्यकारी संचालक चंद्रकांत थोटवे, श्याम वर्धने, के. एम. चिरुटकर, ए. आर. नंदनवार, विनोद बोंदरे, व्ही. एम. जयदेव. जे. के. श्रीनिवासन हे दिग्गज अधिकारी होते. या अधिकाऱ्यांनी टक्केवारी आणि गुणांचा हिशेब चुकीचा केला होता. या सर्व प्रकाराची सीआयडी चौकशी करण्याची मागणी कुंटे पाटील यांनी केली आहे. लवकरच गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून चौकशीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वीही कुंटे पाटील यांनी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्याला बावनकुळेंनी ‘खुशाल चौकशी करा’ असे प्रत्युत्तर दिले होते. या भरती प्रक्रियेवरून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. आता गृहमंत्री अनिल देशमुख या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देतात का, आणि चौकशीत काय निष्पन्न होते, हे बघणे औत्सुक्याचे राहणार आहे.
(Edited By : Atul Mehere)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.