राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लक्ष्य मुंबई-ठाणे : सुनील तटकरे

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लक्ष्य मुंबई-ठाणे : सुनील तटकरे

कर्जत : शहरी भागात आम्ही कमी पडलो. आता आम्ही आत्मचिंतन करतोय. आमचे पुढचे 'लक्ष्य' मुंबई-ठाणे अशी शहरे असतील. त्यामुळेच या भागात पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वाधिक भर दिला जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.

कर्जत येथे झालेल्या चिंतन बैठकीच्या पहिल्या दिवशी झालेल्या चर्चांची त्यांनी  पत्रकार परिषदेत माहिती दिली.

तटकरे पुढे म्हणाले की, मुंबई आणि ठाणे मिळून सुमारे 60 आमदार आहेत, त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक जागा कशा मिळतील यासाठी संघटना वाढविण्यासाठी आणि पक्षाचा एक चेहरा निर्माण करण्यासाठी भर दिला जाईल.

दिवसभरात आर्थिक प्रश्न, नोटाबंदीनंतर निर्माण झालेली परिस्थिती, राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफी या विषयावर चर्चा झाल्या.

उद्याच्या बैठकीत सोशल मीडिया, अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यासाठी  निर्माण करण्यात आलेली आणीबाणी आणि वर्षभराच्या कार्यक्रमावर चर्चा होणार आहे. या बैठकीतून पक्षाची पुढची दिशा काय असेल, आघाडीसोबत संबंध कसे असतील त्यावरही भूमिका स्पष्ट होणार आहे. यातून सर्व नेते, पदाधिकारी हे एक उर्मी घेऊन येणाऱ्या आव्हानाला सामोरे जातील असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.

कृषीच्या संदर्भात धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील आदींनी विचार मांडले तर नागरीकरणाच्या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी मार्गदर्शन करत अनेक विषयांना राष्ट्रवादीने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे असे आवाहन केले.

मुंबईत पक्षाचा चेहरा काय आहे, असा सवाल करत सुळे यांनी पक्षाला फेरीवाल्यांच्या प्रश्नावर कानपिचक्या दिल्या. फेरीवाल्यांच्या बाबत पक्षाची भूमिका असली पाहिजे, तसेच आज रेल्वेच्या बाजूला असलेल्या फेरीवाल्यासह, रेल्वे सुरक्षा, पुन्हा सुरू झालेले बार, 24 तास सुरू झालेले हॉटेल, यामुळे जनसामान्यांच्या मनात एक चीड निर्माण झाली आहे, परंतु ती अजूनही पक्ष यावर स्पष्टपाने भूमिका घेत नसल्याने त्यावर सुळे यांनी नाराजी व्यक्त केली.
 
दरम्यान, पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे, पिंपरी-चिंचवड आदी शहरातील नागरिकांच्या खूप समस्या आहेत. त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजे, त्यानुसार आपला पक्ष बदलला पाहिजे, नागरिकांच्या सुविधांसाठी अग्रेसर राहिले पाहिजे. त्याच प्रमाणे सोशल मीडियाचा वापर करून शहरी भागातील तरुणाचे प्रश्न समजून घेण्याची गरज असल्याचे सुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सूत्राकडून देण्यात आली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com