मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रादेशिक आणि समाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला असला तरी राज्यातील तब्बल बारा जिल्हे मंत्रीपदापासून वंचित राहिले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्रीमंडळाचा काल विस्तार करण्यात आला. तिन्ही पक्षांचे 32 कॅबिनेट तर 10 राज्यमंत्रयांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला. तिन्ही पक्षांनी आपल्या पक्षाच्या हितासाठी प्रादेशिक आणि सामजिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेसने विदर्भाला झुकते माप दिले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने पश्चिम महाराष्ट्राकडे अधिक लक्ष दिल्याचे दिसून येते. शिवसेनेने देखिल मुंबई ठाण्याला झुकते माप देत ग्रामीण भागालाही ब-यापैकी संधी दिली आहे.
मात्र, राज्यातील तब्बल अकरा जिल्हे मंत्रीपदापासून वंचित राहिल्याचे चित्र आहे. यात पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हयाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळालेले नाही. विदर्भातील अकोला, वर्धा, वाशिम,गडचिरोली,भंडारा,गोंदिया तर मराठवाडयातील उस्मानाबाद, परभणी आणि हिंगोली, कोकणातील सिंधुदुर्ग आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे या जिल्हांना मंत्रीपदापासून दूर राहावे लागले आहे.
मंत्रीमंडळाच्या विस्तारात अनेक नाराज किंवा प्रधिनिधित्व न मिळालेल्या विभागांना संधी मिळण्याची शक्यता असते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रीमंडळाचा 42 मंत्र्यांचा कोटा पूर्ण झाला असून एकच मंत्रीपद शिल्लक आहे. त्यामुळे भविष्यात मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता दुरावल्याने अकरा जिल्हे मंत्रीपदापासून वंचित राहिले आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.