पुणे : एल्गार परिषदेप्रकरणात पुणे पोलीसांनी आधिकाराचा दुरूपयोग केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची विशेष चौकशी आयोगामार्फत त्रयस्थपणे चौकशी करण्यात यावी तसेच तोपर्यंत संबंधित पोलीस आधिकाऱ्यांना या केसपासून दूर ठेवण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली.
पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना पवार यांनी तत्कालिन राज्य सरकार व पुणे पोलिसांच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली आहे. पुणे पोलिसांनी केलेल्या कायद्याच्या दुरूपयोगामुळे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर देशद्रोहासारखे आरोप ठेऊन त्यांना तुरूंगात डांबून ठेवण्यात आले आहे. माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्यासारख्या विधी क्षेत्रात काम केलेल्या मान्यवर व्यक्तीनेदेखील पोलिसांच्या कामाबाबत आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणात स्वतंत्रपणे चौकशी करण्यात यावी, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी केली होती. ही सारी पार्श्वभूमी लक्षात घेता राज्य सरकारने या संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायमूर्ती किंवा कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी पवार यांनी केली.
एल्गार प्रकरणात पुणे पोलीस सूड भावनेने वागल्याचे दिसत आहे. त्यांनी कायद्याचा दुरूपयोग केला आहे. त्यामुळे चौकशी आवश्यक असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. कोरेगाव भीमा प्रकरणात संभाजी भिडे गुरूजी व मिलींद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ही बाब निदर्शनास आणून दिली असता, मागच्या काळात काही लोकांना घरजावई असल्यासारखे वागवण्यात येत होते, अशी टिपण्णी पवार यांनी केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.