मुंबई: राज्यामध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे . राज्याच्या सर्व महसूल विभागामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून टाकलेले आहे . जर शेतकरी या आपत्तीने मोडून पडला तर सरकारही मोडेल . एवढेच नव्हे तर राज्यही मोडून पडेल , असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी सरकारला दिला आहे .
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी संध्याकाळी राज्यपालांची भेट घेऊन राज्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीबाबत त्यांना निवेदन सादर केले. त्यानंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय मुंडे ,सुनील तटकरे, छगन भुजबळ, काँग्रेसच्या राज्य कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर, अमित देशमुख , नसीम खान आदी नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजित पवार पुढे म्हणाले, काळजीवाहू सरकारने जाहीर केलेली दहा हजार कोटी रुपयांची मदत तुटपुंजी आहे . किमान पंचवीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मदती साठी मिळायला हवे. सध्या अतिवृष्टीमुळे कामे वेगाने होत नाहीत. त्यामुळे पंचनाम्याची मुदत सहा नोव्हेंबरच्या ऐवजी वाढवून देण्यात यावी .
संत्रा द्राक्ष डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले असून अशा शेतकर्यांना हेक्टरी दीड ते दोन लाख रुपये मदत शासनाने केली पाहिजे . तूर, ज्वारी ,मका ,खरिपाची पिके वाया गेली आहेत. त्यामुळे या पिकासाठी शेतकऱ्यांना एकरी किमान एक लाख रुपये देण्यात यावेत अशी मागणी श्री. पवार यांनी केली .
अजित पवार पुढे म्हणाले , इन्शुरन्स कंपन्या शेतकऱ्यांना दाद देत नाहीत. शासकीय यंत्रणा पाहिजे तशी सक्रिय नाही . त्यामुळे राज्यपालांनी हस्तक्षेप करण्याची वेळ आलेली आहे . राज्यपालांनी शासकीय यंत्रणेला कामाला लावून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून द्यावी राज्य सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले पाहिजे. विज बिल देखील माफ केले पाहिजे.
मच्छिमारांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेताना अजित पवार म्हणाले की अतिवृष्टीमुळे आणि वादळांमुळे मच्छीमारांची मोठे नुकसान झालेले आहे . त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित झालेला आहे . सरकारने मच्छीमारांना सुद्धा मदत करायला हवी .
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापुरामुळे लोकांचे आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं त्याचे पैसे सरकारने जाहीर केले परंतु अजून ते शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना मिळालेले नाहीत ,असेही अजित पवार म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.