नवी दिल्ली : राज्यात सुरु असलेल्या शिवसेना-भाजप सत्तासंघर्षाने आता अंतीम टोक गाठले असून शिवसेनेचे केंद्रातील मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. थोडक्यात शिवसेना आता अधिकृतपणे 'एनडीए'मधून बाहेर पडली हे स्पष्ट आहे.
शिवसेना महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन करणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. दुपारी साडेचार नंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. केंद्रात अवजड उद्योग खाते सांभाळणारे मंत्री अरविंद सावंत यांनी सकाळीच आपण मंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
या बाबत बोलताना सावंत म्हणाले, "आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने मी मंत्रीपदाची शपथ घेतली. माझ्याकडे अवजड उद्योग खात्याची जबाबदारी पंतप्रधानांनी दिली. दरम्यान, महाराष्ट्रात निवडणुका झाल्या. लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी युती तोडण्याची घोषणा केली होती. त्यावेळी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी ५० -५० जागा वाटपाचे सूत्र ठेवले होते. पण आज भाजप म्हणते असे ठरलेच नव्हते. आज महाराष्ट्रात भाजपने विश्वासाला तडा दिला. त्यामुळे विश्वासार्हताच गेली. त्यामुळे मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधानांकडे पाठवला आहे.''
शिवसेना एनडीएमधून बाहेर पडली काय, असे विचारले असता माझ्या राजीनाम्यावरून आपण काय तो अर्थ काढू शकता, असे उत्तर सावंत यांनी दिले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.