मुंबई : दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यासाठी 'मातोश्री'वर भेट दिली होती. त्या वेळी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या पाठिंब्याचे गुपित सांगताना म्हणाले की, 'मराठी वाघाने बंगाल रॉयल वाघा'ला पाठिंबा देणे हे नैसर्गिक आहे,' ही आठवण मुखर्जी यांनी स्वतःच सांगितली होती; मात्र यासाठी त्यांना कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची नाराजीही पत्कारावी लागली होती.
प्रवण मुखर्जी यांनी २०१२ मध्ये राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवली होती. त्याच वेळी भाजपप्रणीत एनडीएने पी. ए. संगमा यांना पाठिंबा दिला होता. शिवसेना तेव्हा एनडीएतील घटक पक्ष असल्याने त्यांनी संगमा यांना पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा भाजपची होती; मात्र त्यापूर्वी झालेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने कॉंग्रेसच्या प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता. तेव्हा शिवसेनेकडून 'मराठी माणूस' असा मुद्दा पुढे केला होता.
प्रणव मुखर्जी यांनी शिवसेनेने पाठिंबा द्यावा म्हणून मातोश्रीवर येऊन बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीचे वर्णन त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केले आहे. ते म्हणतात, 'ठाकरे यांना मी सांप्रदायिक राजकारणी म्हणून ओळखत होतो; मात्र त्यांनी मला त्यांचा मार्ग बदलून पाठिंबा दिला होता. हे विसरता येणार नाही. इतर कॉंग्रेस नेत्यांपेक्षा आपण वेगळे आहात, असे ठाकरे तेव्हा मला म्हणाले होते,' अशी आठवण आत्मचरित्रात नमूद आहे.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.