खळखट्ट्याकडून मनसेचा प्रवास उपोषणाकडे?

ठाण्यातील फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेऊन थेट फेरीवाल्यांच्या कानाखाली वाजवणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिस कारवाईनंतर आता सबुरीने वागण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच खळखट्ट्याकची भाषा करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मराठी पाट्यांच्या प्रकरणी कारवाई करा अन्यथा धरणे आणि उपोषणाचा मार्ग अवलंबण्याची घोषणा केली आहे. कामगार उपायुक्तांची भेट घेऊन पदाधिकाऱ्यांनी हा इशारा दिल्यामुळे शहरामध्ये आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे.
खळखट्ट्याकडून मनसेचा प्रवास उपोषणाकडे?

ठाणे : ठाण्यातील फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेऊन थेट फेरीवाल्यांच्या कानाखाली वाजवणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिस कारवाईनंतर आता सबुरीने वागण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच खळखट्ट्याकची भाषा करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मराठी पाट्यांच्या प्रकरणी कारवाई करा अन्यथा धरणे आणि उपोषणाचा मार्ग अवलंबण्याची घोषणा केली आहे. कामगार उपायुक्तांची भेट घेऊन पदाधिकाऱ्यांनी हा इशारा दिल्यामुळे शहरामध्ये आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे. 

मनसेच्या स्थापनेपासून परप्रांतीयांविरोधात आक्रमक पवित्रा घेऊन खळखट्ट्याकची भाषा करणाऱ्या मनसेने रेल्वे भरती, टोल वसुली, मराठी पाट्यांसाठी खळखट्ट्याक आंदोलने उभारून आपली आक्रमक ओळख निर्माण केली आहे. मनसेच्या या आक्रमक स्वभावामुळे मनसे पदाधिकाऱ्यांवर दंगल, सरकारी कामामध्ये अडथळा, मारहाण सारख्या अनेक गुन्ह्यांची भर पडली. 

एल्फिस्टन दुर्घटनेनंतर राज ठाकरे यांनी स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना 15 दिवसांमध्ये हटवण्याची घोषणा केली आणि त्यानंतर ठाण्यामध्ये आंदोलनाची ठिणगी उडाली होती. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरून फेरीवाल्यांना हुसकावून लावत प्रसंगी मारहाणही केली. 

मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि त्याच्या सहकाऱ्यांनी स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना बेदम चोपल्यानंतर या प्रकरणी त्यांच्यावर नौपाडा आणि ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्यांना दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात पोलीसांनी आक्रमक कारवाई करत एक कोटीच्या जामिनाची मागणी केली होती. 

या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ठाण्यामध्ये सभा घेऊन पोलीस आयुक्तांविरोधातही टिका केली होती. तसेच मराठी पाट्यांविरोधात पुन्हा आंदोलन उभारण्याची घोषणा केली होती. 

ठाण्यातील सभा संपल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी अनेक दुकानांमध्ये जाऊन तेथील दुकानदारांना पंधरा दिवसांमध्ये मराठी पाट्या लावण्याच्या सुचना केल्या होत्या. त्याची गंभीर दखल पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आली. तसेच पुन्हा सर्व पदाधिकाऱ्यांना नोटीसा देऊन या आंदोलनात सहभागी झाल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलीसांकडून देण्यात आला होता. 

या नोटीसांमुळे काहीसे दबावाखाली आलेल्या मनसैनिकांनी अखेर ठिय्या आणि उपोषणाचा मार्ग अवलंबण्याचे ठरवले आहे. मंगळवारी कामगार उपआयुक्तांची भेट घेऊन एका महिन्यात शहरामध्ये मराठी पाट्या लागल्या नाहीत तर कार्यालयासमोर ठिय्या मांडून उपोषण करण्याचा इशारा मनसैनिकांनी दिला आहे. मनसेचे ठाण्यातील नेते अविनश जाधव, रवी मोरे, संदीप पाचंगे यांनी हा इशारा दिला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com