Raju Patil, Eknath Shinde
Raju Patil, Eknath Shinde sarkarnama
ठाणे

पाणावलेल्या डोळ्यांनी थोडं वास्तवाकडं पहा... मनसे आमदाराचे एकनाथ शिंदेंना भावुक पत्र

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : देसलेपाडा येथील पाणी टंचाईमुळे एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींचा जीव गेल्याने त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यावरून कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना भावुक पत्र पाठविले आहे. ''आपण चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असाल, तुम्हाला ही घटना माहित नसावी म्हणून हा पत्रप्रपंच'' असे ट्विट करीत त्यांनी हे पत्र ट्विट केले आहे. ''पाण्यापायी जीव गेला हे ऐकून तुमचे डोळे नक्कीच पाणावले असतील, आता त्याच डोळ्यांतून थोडं वास्तवाकडे पहा,'' असा टोला त्यांनी पालकमंत्री शिंदे यांना लगावला आहे.

कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील हे ग्रामीण भागातील पाणी प्रश्नावर सातत्याने आवाज उठवित आले आहेत. परंतू अद्याप या भागातील पाणी प्रश्न सुटलेला नाही. यावरून आता आमदार पाटील यांनी थेट पालकमंत्र्यांना पत्र व्यवहार केला आहे. एक पत्र त्यांनी ट्विट केले असून यामध्ये त्यांनी विशेष विनंती करत "तुम्ही सध्या वाहिन्यांवर दिसता पण चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने. तुम्हाला कदाचित ही दुर्दैवी घटना माहीत नसेल म्हणून हा पत्रप्रपंच.

पाण्यासाठी वणवण, तहानेने कासावीस होणे, हे सगळं एव्हाना सवयीचे होऊन गेलंय. पण आता पुढची पायरी गाठली गेली हो. पाण्यामुळे मृत्यू झालाय, एक दोघांचा नाही तर 5 निष्पाप जीवांचा. तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, 'पाण्यापायी जीव गेला' हे ऐकून तुमचे डोळे नक्कीच पाणावले असतील. आता त्याच डोळ्यातून थोडं वास्तवाकडे" पहा असा टोला देखील त्यांनी पत्रातून लगावला आहे.

आयुक्तांविषयी देखील झोड उठवली...

या सगळ्याला जबाबदार कोण ? पाणी द्या, पाणी द्या सांगून 27 गावं गेली अनेक वर्षे उर बडवतायत. पण तुम्ही ज्यांना आयुक्त म्हणून नेमलेय त्यांच्या कानाशी तो आवाज पोहोचतच नाहीय. आमच्या नागरीकांच्या डोळ्यात पाणी आणायचं आणि तेच पाणी पिऊन जगा असं सांगायचं. तहान भागवण्यासाठी आयुक्तांनी केलेली योजना तर नाही ना ही ? आता तर रडून भेकून डोळेही कोरडे पडले. आता काय ? अजून काही मृत्यू व्हायची वाट पाहायची का ? म्हणजे आणखी डोळ्यातून पाणी येईल हो,पण नळाला येणार नाही. आमच्या जीवावर उठलेला असा आयुक्त आम्हाला नको शिंदे साहेब…असे त्यांनी म्हटले आहे.

कल्याण ग्रामीण मतदार संघातील रस्ते,पाणी, वाहतूक कोंडी, कचरा व इतर समस्या आपल्याकडे मांडण्यासाठी मी अनेकवेळा आपल्यासोबत संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन बैठक लावावी. यासाठी विनंती केली आहे परंतू यात कोणते राजकारण आडवे येते हे मला समजत नाही आणि जर तसे काही असेल तर राजकारण बाजूला ठेवूया आणि 'मृत्यूकारण' तपासून पाहूया. आणि

म्हणूनच मी आमदार असलो तरी हे पत्र मी एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला पाठवतो आहे. बघू-पाहू-करू हे न करता ताबडतोब कृतीची अपेक्षा आहे. ताबडतोब बैठक घ्या, ताबडतोब निर्णय घ्या, आणि ताबडतोब न्याय द्या. लाथ माराल तिथे पाणी काढणारे तुम्ही. कुठे आणि कशी लाथ मारायची ते तुम्हाला नक्कीच माहिती असणार असे सूचक विधान त्यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT