जळगाव : जिल्ह्यात संचारबंदी लागू असताना रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांकडून लाठ्यांचा "प्रसाद' दिला जात आहे. अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, पत्रकार, स्वच्छता कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे. मात्र, गडचिरोली येथे कार्यरत पोलिस उपनिरीक्षक खासगी वाहनाने जात असताना चौकात अडविल्याने सोबत असलेल्या चालकाने अरेरावी केली. त्यामुळे बंदोबस्तावरील पोलिसांनी दोघांना खाली उतरवून दंडुक्याची बरसातच केली. साध्या वेशातील 'त्या' उपनिरीक्षकाला आपली चूक लक्षात आल्यावर मात्र दोघांचा पारा खाली उतरला.
जळगाव शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. असे असताना संचारबंदीचे सर्रास उल्लंघन करणाऱ्यांना मात्र लाठ्या खाव्या लागत आहेत. गडचिरोली येथे कार्यरत असलेले एक पोलिस उपनिरीक्षक त्यांच्या खासगी कारने जात असताना शहरातील शास्त्री टॉवर चौकात रात्री साडेआठच्या सुमारास बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी वाहन थांबविले. कारच्या काचेवर लाल रंगात 'पोलिस' लिहिलेले होते. त्याचक्षणी आतून आवाज आला.."गाडीवर पोलिस लिहिलेलं दिसत नाही का?'....
.....हा आवाज ऐकताच पोलिसांनी दोघांना खाली उतरण्यास सांगितले. कोण साहेब...कुठले साहेब, आणि खासगी वाहन घेऊन कुठे जाताय, अशा चौकशीच्या फैरी झडल्यावर उपनिरीक्षकाचा मित्र असलेल्या तरुणाने या पोलिस कर्मचाऱ्यांनाच अरेरावीची भाषा केल्याने 'साहेबां'सह दोघांना बंदोबस्तावरील पोलिसांनी लाठ्यांचा 'प्रसाद' दिला. चक्क गडचिरोली येथे कार्यरत असलेल्या उपनिरीक्षकालाच फटके बसल्याने दोघेही टाळ्यावर आले. ओळखपत्र दाखविल्यानंतर पोलिसांनी त्यांना समज देत जाऊ दिले. मात्र, फौजदार झाल्यावरही प्रसाद खावा लागू शकतो..हे त्या फौजदाराला शेवटपर्यंत आठवणीत राहील, हे मात्र निश्चित
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.