Sadabhau Khot
Sadabhau Khot 
अकोला

बॅंकांनी उद्दीष्टपूर्ती न केल्यास मीच पीककर्ज प्रकरणे मंजूर करणार : सदाभाऊ खोत 

सरकारनामा ब्युरो

अकोला : खरीप हंगामात शेतकऱ्यांना पेरणीसाठी पीक कर्ज वितरणात दिरंगाई करणाऱ्या राष्ट्रीयकृत बॅंकांसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अकोल्यात चांगलीच खरडपट्टी काढली. 

सरकार शेतकऱ्यांना पैसा देतंय. ते वाटपात कशाला दिरंगाई करता? ज्या बॅंका कर्ज वितरणाची उदिष्टपूर्ती करणार नाहीत, अशा अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर सत्कार करणार असल्याचा टोला सदाभाऊंनी लगावला. आठ दिवसात बॅंकांना दिलेल्या कर्ज वितरणाची उदिष्टपूर्ती न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात बसून मी स्वतःच शेतकऱ्यांना बोलावून बॅंक अधिकाऱ्यांकडून त्यांची पीक कर्ज प्रकरणे मंजूर करेल, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला. 

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात शनिवार (ता.9) कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अमरावती विभागाचा खरीप आढावा घेतला. यावेळी अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार बळीराम सिरस्कार, कृषी आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, "महाबीज'चे व्यस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, लक्ष्मीनारायण मिश्रा, प्रमोदसिंह दुबे, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांच्यासह जिल्हा उपनिबंधक, लिडबॅंक व्यवस्थापक व इतर अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी पीककर्ज वाटपाचा आढावा घेताना प्रत्येक जिल्ह्याला दिलेल्या लक्षांकाच्या तुलनेत कमी पीककर्ज वाटप झाल्याची बाब समोर येताच कृषी राज्यमंत्री खोत यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. 

राष्ट्रीयकृत बॅंका पीक कर्जाचे एक-दोन चार टक्के येवढेच वाटप करतील तर शेतकऱ्यांनी पेरणीसाठी पैसा कोठून आणावा? आधीच हे जिल्हे आत्महत्याग्रस्त आहेत. सरकार त्यांना या गंभीर परिस्थितीतून सावरण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे. 

पेरणीला वेळेत पैसा नाही मिळाला तर सावकाराजवळ जाण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उतरणार नाही. आणि पेरणीची वेळ निघून गेल्यावर कर्ज मिळाले तर त्याचा काय फायदा होणार? हे कर्ज त्यांचे सावकाराच्या व्याजातच जाईल. त्यामुळे पीक कर्ज वितरणाच्या कामात हयगय खपवून घेणार नाही. तातडीने शेतकऱ्यांचे कर्ज वितरणासाठी मेळावे घेऊन सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्ज वितरण करा. ज्या राष्ट्रीय बॅंकांचे कर्ज वितरणाचे एक-दोन टक्के असे असमाधानकारक काम असेल अशांवर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 

अकोल्यात बीज गुणनियंत्रण प्रयोगशाळा उभारणार 
बियाण्यांच्या तपासणीसाठी अमरावती विभागातील कृषी विभागाला नागपूर येथील बीज गुणनियंत्रण प्रयोगशाळेत जावे लागते. मात्र, तेथील अंतर आणि तपासणीसाठी लागणाऱ्या कालावधीमुळे अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे अकोल्यात बीज गुणनियंत्रण प्रयोगशाळा उभारणीचा प्रस्ताव पालकमंत्री डॉ. रणजित पाटील व वाशिमचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी मांडला. या प्रयोगशाळेसाठी आवश्‍यक निधी देण्याची तयारी डॉ. पाटील यांनी दर्शविल्यावर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने प्रस्ताव तयार सादर करण्याचे निर्देश दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT