छत्रपती संभाजीनगर

ग्रामपंचायत निवडणूकीच्या यशावर दावा पोरकटपणाचे लक्षण - सुप्रिया सुळे 

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका या राजकीय पक्षांच्या चिन्हावर लढल्या जात नसतात. त्यामुळे भाजपचे सर्वात जास्त सरपंच निवडूण आले असा दावा करणे म्हणजे पोरकटपणाचे लक्षण आहे. त्यावर पंतप्रधान कार्यालयाने ट्‌विवट केले याचेदेखील मला आश्‍चर्य वाटत असल्याचा टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केली. 

विजयी उमेदवारांचे स्वागत करायचे आणि ते आमचेच आहे असे म्हणायचे हे योग्य नाही. नाहीतर आम्हीही दावा करू शकलो असतो, पण आम्ही उमेदवार इंम्पोर्ट करत नाही असा टोला देखील सुळे यांनी लगावला. 

जागर जाणिवांचा उपक्रमा अंतर्गत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित युवा संवाद यात्रे निमित्त औरंगाबादेत पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. 

महाराष्ट्राचे सामाजिक स्थान देशात मोठे आहे. पण हुंडाबळी, स्त्रीभ्रुण हत्या, महिलांची छेडछाड हे प्रश्‍न अजूनही शून्यावर येत नाहीत. यासाठी माझ्यासह समाज म्हणून सगळ्यानाच आणखी वीस वर्ष काम करावे लागेल. सरकारने महिला व तरूणांसाठीचे निश्‍चित धोरण आखावे अशी मागणी करतांनाच एकीकडे तुम्ही मेट्रो, बुलेट ट्रेन आणता, त्याला माझा विरोध नाही. पण त्याच बरोबर ग्रामीण भागात जाणारी माझी एसटी देखील सुधारा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. 

मराठा, मुस्लिम, धनगर समाजाला आरक्षण द्या 
शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षण या दोन स्वतंत्र बाबी आहेत. आर्थिक दुर्बल घटकांतील मुला-मुलींना केजी टु पीजी शिक्षण मोफत मिळाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाला देखील आरक्षण मिळाले पाहिजे ही माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले. 

उघड्यावर शौचास बसलेल्या गर्भवती महिलांचा जिल्हा परिषदेच्या सीईओ आणि इतर अधिकाऱ्यांना अपमान केला. यावरील प्रश्‍नावर बोलतांना सुळे म्हणाल्या, उघड्यावर शौचास बसणे चुकीचेच आहे. पण गर्भवती महिलांच्या गळ्यात हार घालून त्यांच्यासोबत फोटो काढण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत हे बसत नाही. स्वच्छतेचा कार्यक्रम चांगला आहे, पण केवळ शौचालय बांधून भागणार नाही, तर त्यासाठी गावात ड्रेनेज लाईन, मुबलक पाण्याची सोय देखील केली पाहिजे. केवळ शौचालय बांधण्यासाठी पैसे दिले म्हणजे गाव स्वच्छ होईल ही अपेक्षा चुकीची आहे. 

महाराष्ट्रात लोडशेडिंग का? 
केंद्र सरकारकडून देशात मुबलक कोळसा असल्याचे सांगितले जाते. दोन महिने पुरेल एवढा कोळसा प्रत्येक राज्यात असल्याचा दावा करण्यात आला होता. मग महाराष्ट्रातला कोळसा कुठे गेला याची माहिती मी माहिती अधिकारात मागितल्याचे सुळे यांनी सांगितले. कर्नाटक, गुजरातमध्ये अखंड वीज आहे, त्याबद्दल आमचे काही म्हणने नाही. पण मग माझ्या महाराष्ट्रात लोडशेडिंग का? आमच्या राज्यातला कोळसा कुठे गेला? कॉंग्रेसच्या काळात कोळसा घोटाळ्यावरून "सारी कॉंग्रेस काली है म्हणणाऱ्यांच्या काळातला काळा कोळसा आता कुठे गेला. विरोधात असतांना आरोप करणे सोपे असते, आज सत्ता आहे, उद्या नाही तेव्हा चौकटीत राहूनच आरोप करावेत असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी सत्ताधारी भाजपच्या नेत्यांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT