बीड : सत्तेत नसताना बांधावर जाऊन शेतक-यांचा कळवळा असल्याचा आव आणणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेत येताच बदलल्याचे राज्य पाहत आहे. त्यामुळे त्यांना मागचे काहीच आठवत नसल्याने त्यांची अवस्था गझनीतील आमीर खान सारखी झालेली आहे. त्यांना शेतकऱ्यांबद्दल चांगले निर्णय घेण्याची सद्बुद्धी येवो, तसेच जुनी आश्वासनं आठवत नसल्याने स्मृती येण्यासाठी च्यवनप्राश घेण्याची गरज असल्याचा टोला माजी मंत्री तथा भाजप किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे यांनी लगावला.
बोंडे यांनी बुधवारी (ता. १४) आष्टी तालुक्यातील चोभा निमगाव, वटाणवाडी येथे शेतकरी संवाद यात्रा घेतल्या. त्यानंतर बीडमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकरी प्रश्नावर सरकार विरोधात हल्लाबोल केला. यावेळी खासदार डॉ. प्रितम मुंडे, आमदार सुरेश धस, माजी आमदार भिमराव धोंडे आदींची यावेळी उपस्थिती होती.
मुख्यमंत्री व महाविकास आघाडी सरकारवर टिका करतांना बोंडे म्हणाले, मागच्या काळात अतिवृष्टीने नुकसानीपोटी दहा हजार कोटींची मदत दिल्यानंतर सत्तेत नसलेले उद्धव ठाकरे बांधावर जाऊन कोरडवाहूसाठी हेक्टरी २५ हजार आणि बागायतीसाठी ५० हजार रुपये मदतीची मागणी करत होते. आता संपूर्ण राज्याला पावसाने झोडपले आहे. कोकणात वादळाने नुकसान केले.
मात्र, संयुक्त पंचनामे नाहीत, विमा कंपन्या फिरकायला तयार नाहीत. मात्र, सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांना त्यांच्याच मागण्यांचा विसर पडला आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यामुळे शेतकरी स्वत: बाजारपेठेत जाऊन माल विकू शकतो. हा कायदा शेतकरी हिताचा आहे. मात्र, महाविकास आघाडीला ते कळत नाही, अशी टिकाही बोंडे यांनी केली.
शेतकरी संवाद यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने पारित केलेल्या कृषी बीलाच्या स्वागतार्ह आष्टी तालुक्यातील शेतक-यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात नरेंद्र मोदींचे अभिनंदन करणारी शेकडो पत्र सोपवली. तर राज्य सरकारने हा कायदा लवकरात लवकर लागू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पञांच्या प्रति देखील बोंडे यांना सुपुर्द केल्या.
डॉ. प्रितम मुंडे, सुरेश धस व भिमराव धोंडे यांनीही राज्य सरकारच्या कारभाराव टिकास्त्र सोडले. दरम्यान, निमगाव चोभा येथे डॉ. प्रितम मुंडे व अनिल बोंडे यांना भिमराव धोंडे यांनी स्वत: ट्रॅक्टर चालवित व्यासपीठावर आणले.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.