नाथनगर- उत्तर : मराठवाड्यामध्ये अत्यंत कमी पाऊस असतानाही नाशिक आणि नगर जिल्ह्यातून येणाऱ्या गोदावरी आणि प्रवरा नदीच्या पाण्यावर जायकवाडी धरण भरत आले आहे. सोमवारी सायंकाळी 5 वाजता धरणामध्ये 88.53 टक्के जलसाठ्याची नोंद करण्यात आली आहे.
जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून 900 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत असून या पाण्याचा लाभ गेवराई, माजलगावपर्यंत शेतकऱ्यांना होतो. जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यातून 400 क्यूसेस पाणी सोडले जात असून पाण्याचा विसर्ग आणखीन वाढवला जाणार आहे. डाव्या कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा लाभ जालना आणि परभणी जिल्ह्यातील अनेक भागात शेतीसाठी होतो.
याशिवाय जायकवाडी धरणावर असलेल्या जलविद्युत केंद्रात वीज निर्मिती सुरू झाली असून यासाठी धरणातून 1 हजार 500 क्यूसेस पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात येत आहे.
जायकवाडी धरणाची पाण्याची पातळी 1519.87 फूट आहे. धरणातील एकूण जलसाठा 2 हजार 660.246 दशलक्ष घनमीटर एवढा आहे. त्यांपैकी 1 हजार 922.140 दक्षलक्ष घनमीटर जलसाठा हा प्रवाही सिंचनासाठी उपयुक्त आहे.
जायकवाडी धरणात सोमवारी सकाळी 5 वाजता नगर आणि नाशिक जिल्ह्यातून येणाऱ्या पाण्याची आवक 33 हजार 926 क्युसेस एवढी आहे.
जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्याचा ओघ असाच राहिला किंवा वाढला तर धरणाचे दरवाजे उघडून गोदावरीच्या पात्रात पाणी सोडण्यात येईल. कै. विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांनी गोदावरीच्या पात्रात औरंगाबाद ते नांदेड दरम्यान अनेक मोठे बॅरेजेस बांधलेले असून त्यामध्ये आता पाणी साठवता येणार आहे.
त्यामुळे गोदाकाठच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. औरंगाबाद, जालना, पैठण, नेवासा, गंगापूर, वैजापूर, शेवगाव, आदी शहरे आणि अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना जायकवाडी धरणातून करण्यात आलेल्या आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.