औरंगाबाद ः पंधरा दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी हा महत्वाचा सण लोकांना सुरक्षेची काळजी व शासनाने घालून दिलेले नियम पाळत साजरा करता यावा यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. गणेशोत्सवाचा आनंद कमी न होता तो सुरक्षितपणे साजरा व्हावा या हेतूने महापालिकेने प्रत्येक झोनमध्ये गणेश मुर्ती विक्रीची दुकाने थाटण्याची परवानगी दिली आहे.
आतापर्यंत सर्वच धर्मियांनी आपापले सण, उत्सव, महापुरुषांच्या जयंत्या घरात आणि साधेपणाने साजऱ्या केल्या. लॉकडाऊन टु मध्ये नियम व अटी घालून आता बऱ्याच प्रमाणात सुट देण्यात आली आहे. दैनंदिन व्यवहार सुरु करण्याच्या दृष्टीने सरकारने हे पाऊल टाकले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्णय घेण्यात आले. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी या संदर्भात अनेक गोष्टींचा उलगडा केला.
दरवर्षी गणेशोत्सवासाठी औरंगपुरा येथील जिल्हा परिषद मैदान व सिडको भागात मोठ्या प्रमाणात गणेश मुर्ती विक्रीची दुकाने थाटली जातात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांची एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी शहरातील महापालिकेच्या प्रत्येक झोनमध्ये विक्रेत्यांना दुकाने थाटण्याची परवानगी देण्यात आली आहे.
ही परवानगी देतांना जर नागरिकांनी गर्दी केली तर गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधीच गणेश मुर्ती विक्रीची दुकाने बंद करण्यात येतील असा इशारा देखील पांडेय यांनी यावेळी दिला. शिवाय ऐनवेळी गणेश मुर्ती खरेदीला बाहेर न पडता नागरिकांनी टप्प्या टप्याने खरेदी करावी असे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
विक्रेत्यांना चाचणी आवश्यक
गणेश मुर्ती विक्रेत्यांना दुकाने थाटण्याआधी ॲन्टीजन टेस्ट करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे . यासाठी मूर्ती विक्रीच्या प्रत्येक मार्केटमध्ये ॲन्टीजेन चाचणीची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रत्येक मार्केटमध्ये शिबिर देखील भरवले जाणार आहे, जेणेकरून नागरिकांनाही शिबिरात जाऊन स्वत:ची टेस्ट करून घेता येईल, असेही पांडेय यांनी नमूद केले.
ॲन्टीजन टेस्ट करण्याचा महापालिकेने घेतलेला निर्णय चांगलाच परिणामकारक ठरला आहे. १० ते १८ जुलै या दरम्यान शहरात घेण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनमध्ये ॲन्टीज चाचण्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आतापर्यंत एक लाखाहून अधिक चाचण्या करण्यात आल्या. यातून पॉझीटीव्ह रुग्णांना विलगीकरण कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा महापालिकेचा प्रयत्न होता.
मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांना शोधून त्यांना विलगीकरणात ठेवले जात असल्याने कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मदत झाल्याचे दिसून आले. शिवाय कोरोनाचा मृत्यू दर देखील कमी झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. त्यामुळे गणेशोत्सावामध्ये होणारी गर्दी लक्षात घेता विक्रेत्यांची व तिथे येणाऱ्या नागरीकांची देखील चाचणी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Edited By: Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.