बीड : राज्यात भाजपचे सरकार असताना जिल्ह्याच्या तत्कालिन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी हजारो कोटींचा निधी मंजूर करुन घेतला. पंकजा मुंडे यांनीच आणलेल्या एकाच रस्त्याचे पुन्हा पुन्हा उदघाटन करून जिल्ह्याचा विकास होत नसतो, आणलेली कामे रद्द करण्यापेक्षा स्वकर्तुत्वाने एखादे विकास काम आणा, असा टोला खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांना लगावला आहे.
महायुती सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री असताना पंकजा मुंडे यांनी जिल्ह्याला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मोठ्या प्रमाणावर रस्ते मंजूर करुन विकास निधी उपलब्ध करुन दिला. परंतु, यातील जिल्ह्यातील १०८ कोटी रुपयांची ३४ कामे रद्द करुन हा निधी पश्चिम महाराष्ट्रात वळविण्यात आला आहे. त्यामुळे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टिका होत आहे. हाच धागा पकडून खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनीही ‘एकाच रस्त्याचे दोनदा उद॒घाटन केल्याने जिल्ह्याचा विकास होत नसतो’ असा टोला लगावला आहे. परळी - अंबाजोगाई रस्ता काम अडीच वर्षांपूर्वी सुरु झाले. परंतु, अद्याप अपूर्ण आहे. दरम्यान, धनंजय मुंडे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी या कामाचे पुन्हा उद॒घाटन केल्याचा मुद्दा पकडून त्यांनी ही टिका केली आहे.
जिल्ह्यातील केज, गेवराई, माजलगाव तालुक्यातील रस्ते विकासासाठी मंजूर करण्यात आलेली १०८ कोटी रुपये किंमतीची ग्रामीण रस्ते विकासाची कामे रद्द करण्यात आली आहेत. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला ब्रेक लागणार असल्याचेही खासदार डॉ. मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांनी यांनी आणलेली विकास कामे रद्द करण्यापेक्षा स्वकर्तुत्वावर जिल्ह्यासाठी विकास कामे आणून दाखवावीत, असे आव्हानही त्यांनी केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.