sharad pawar press conference news tuljapur
sharad pawar press conference news tuljapur 
छत्रपती संभाजीनगर

राणा पाटलांची घरवापसी नाहीच, पवार म्हणाले, आहात तिथे सुखी राहा..

जगदीश कुलकर्णी

तुळजापूर ः  विधानसभा निवडणुकीच्या वेळी जे पक्ष सोडून गेले, त्यापैकी अनेकजण पुन्हा राष्ट्रवादीत येऊ पाहत आहेत. त्यांच्याबद्दल आम्ही काही निर्णय घेतले आहेत. जसे की उस्मानाबादच्या बाबतीत आम्ही इथल्या नेत्यांना पुन्हा पक्षात न घेण्याचे ठरवले आहे. जिथे गेलात तिथे सुखी राहा, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भाजपचे आमदार राणाजगजीतसिहं पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला नो एन्ट्री असल्याचे स्पष्ट केले.

अतिवृष्टीमुळे तालुक्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर शरद पवारांनी आज येथील सर्कीट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेतली.  भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील संभाव्य प्रवेश आणि राष्ट्रवादीतून इतर पक्षात गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेणार का, या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देतांना पवारांनी आपला राणाजगजीतसिंह पाटील यांना आपला विरोध अद्यापही कायम असल्याचे दाखवून दिले.

पवार म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर अनेकजण पक्ष सोडून गेले. आता यातील अनेकजण पक्षात येण्यासाठी इच्छूक आहेत. या संदर्भात आम्ही काही निर्णय घेतले आहेत. उस्मानाबाद मधील नेत्यांना पक्षात पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही. आहे तिथे त्यांनी सुखी राहावे, असा टोलाही शरद पवारांनी लगावला. आपत्तीच्या काळात राजकीय मतभेद विसरून काम करायची आपली संस्कृती आहे असेही ते म्हणाले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पदाची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी राज्यपालांची कानउघडणी केली असल्याचेही पवारांनी यावेळी स्पष्ट केले.

शरद पवारांच्या दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्याची सुरूवात शरद पवार यांनी काल राणाजगजीतसिंह पाटील आमदार असलेल्या तुळजापुरातूनच केली होती. या संपुर्ण दौऱ्यात पवारांनी राणापाटील यांचे कट्टर विरोधक असलेले शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना सोबत घेतले. यातून राणापाटलांना त्यांनी सूचक इशारा दिला होता. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात देखील राणापाटील यांचे विरोधक समजले जाणारे काॅंग्रेसचे अमित देशमुख यांनाही पवारांनी सोबत घेत त्यांच्याशी चर्चा केली होती.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राणापाटील यांच्याबद्दल शरद पवार यांच्या मनात असलेला राग अजूनही कायम असल्याचे या दौऱ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले. राष्ट्रवादीमध्ये घरवापसी करू इच्छिनाऱ्या नेत्यांमधून उस्मनाबादला वगळण्यात आल्याचे सांगत शरद पवारांनी राणापाटील व त्यांच्या समर्थकांना या निमित्ताने द्यायचा तो संदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT